रविवार, ५ ऑक्टोबर, २०२५

युद्धार्थं : भाग ८


 



=====================

युद्धार्थं : भाग ८    

=====================

मणिमतीच्या विनाशाला कारणीभूत ठरलेल्या त्या भयंकर युद्धाला जवळजवळ पाच सहस्र वर्षे होऊन गेली होती. निवातकवचांच्या कित्येक पिढ्या उलटून गेल्या होत्या. 

त्यांनी त्यांच्या इतिहासात ते युद्ध आणि त्यातून मिळालेला धडा, पिढ्यांपिढ्या आणि जाणीवपूर्वक त्यांच्या दीर्घ स्मृतींमध्ये जपला होता. प्रत्येक पिढीला त्या युद्धाची भीषणता आणि त्यामागची कारणे उमगणे आवश्यक होते, त्यांच्या स्वत:च्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी, विलुप्ततेच्या काठावर पोहोचून परत येण्यासाठी करावा लागलेला संघर्ष सुद्धा, प्रत्येक नवीन पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यकच होते. पण तरीही त्यांच्या मनावर उमटलेले ते आघात आता बरेच पुसट होऊ लागले होते. 

त्यांचा नोंदवलेला इतिहास त्यांना असे सांगत होता की आरंभीच्या काळात त्यांनी समुद्रतळाखाली जाण्याचा जो निर्णय घेतला, तो त्यावेळेच्या परिस्थितीनुसार योग्यच होता. पण विवरे आणि भुयारांमध्ये जगणे, त्यांच्या अपेक्षेपेक्षा त्यांना बरेच कठीण गेले होते. त्यांच्या मूळ आराखड्यानुसार निर्मिलेल्या अनेक संरचनांमधील त्रुटी त्यांना कालांतराने जाणवू लागल्या होत्या. कित्येक ठिकाणी नियमित स्वरूपातील देखभाल सुद्धा पुरेशी ठरत नव्हती, हे त्यांना लवकर उमगले.  

----

तिथे राहण्यास आल्यापासून साधारण चार शतके झाली असतील;  तेव्हांच भिंतींना सूक्ष्म तडे जाऊ लागले होते. त्या वेळी नव्याने दिलेले लेपनाचे असंख्य थरही पुरेसे ठरत नव्हते. मग त्यांनी विपरीत परिस्थितीतही टिकाव धरू शकणार्‍या सूक्ष्मजंतूंचा (extremophile microbes) वापर करून, अशी खनिज संयुगे विकसित केली, ज्यांच्यायोगे  भिंतींना जाणारे तडे आपोआप भरले जातील. (८)

पण जसजशी त्यांची संख्या वाढत गेली, तसतशी त्यांना नवनवीन विवरांची, भुयारांची आवश्यकता जाणवू लागली.  आरंभीच्या काळात जाणवलेले कालबंधन नसल्यामुळे, नवीन विवरे, भुयारे, गुंफा अधिक सुधारित संरचना योजून, अधिक वेळ घेऊन निर्माण केल्या गेल्या होत्या. स्वाभाविकच त्या मूळ गुंफांपेक्षा अधिक चांगल्या होत्या, सुविधांनी परिपूर्ण होत्या. जुन्या गुंफांत राहणार्‍या बहुसंख्य  निवातकवचांनी नव्या गुंफांत स्थलांतर केले. त्यापूर्वी जुन्या गुंफांतील भिंतींवर त्यांनी त्यांचा इतिहास चित्रित करून ठेवला; जेणेकरून दीर्घ कालावधीनंतर त्या जुन्या गुंफा, निवातकवचांच्या प्राचीन इतिहासाचा एक दृश्य ठेवा ठरावा.  

उष्णता नियमनासाठी वापरलेल्या सहकेंद्रित आवरणे असलेल्या नलिकांवर आता आणखी आवरणे चढली होती. तसेच तिथे आवश्यकतेनुसार उघडझाप करणार्‍या झडपा (adaptive valve) बसविण्यात आल्या होत्या. केवळ समुद्रतळाशी सुप्त अवस्थेत असलेल्या ज्वालामुखींवर आणि पर्यायाने त्याच्या निकट असलेल्या स्थानांवर अवलंबित्व राहू नये, म्हणून त्यांनी भूकंपनांचा आणि सम्पीडविद्युत्‌रत्नाचा (Piezoelectric crystal) वापर करून स्पन्दविद्युत (Piezoelectric Energy ) निर्माण करण्याची क्षमता प्राप्त केली होती. ही ऊर्जा अल्प प्रमाणात निर्माण होत असल्याने ती पूरक स्वरूपात वापरली जात असे, मुख्य स्रोत म्हणून नव्हे. (९)

आरंभीस त्यांनी त्यासाठी मूळ आराखड्याचाच, त्याच्या अनेक स्तरीय रचनेचाच वापर केला होता. नवीन विवरे खोदताना, प्रत्येक वेळेस सुप्त ज्वालामुखीचे उगम शोधून, तिथे उष्णता कशी उपलब्ध होऊ शकेल ह्याचा विचार करूनच मग त्या आराखड्यातील अनेक स्तरीय कक्षांची, गुंफांची रचना केली जात असे. मात्र नंतरच्या पिढ्यांमधील अनेकांनी मूळ जागेपासून दूर जाण्यापेक्षा, अधिक खोलवर पण सुरक्षित ठिकाणी भुयारे खणण्याला प्राधान्य दिले होते. समुद्रतळाच्या खाली आता भुयारांचे, उपविवरांचे प्रचंड जाळे होते आणि ते दूरपर्यंत पसरले होते. 

ह्या दीर्घकाळात आरंभीचा काळ केवळ तगण्याचा होता. पण काही पिढ्यांनंतर, त्यांची प्रगती वेगाने झाली होती. अर्थात ह्या स्थितीला पोहोचण्यासाठी त्यांनी बराच मोठा त्याग करावा लागला होता. त्यांची शारीरिक संरचना , शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता, वर्षानुवर्षे रुजलेल्या सवयीं, अन्न आणि अन्नभक्षण ह्या सर्वांमध्ये आमूलाग्र परिवर्तन होत गेले. 

----

मणिमतीच्या विनाशानंतर विस्कटलेल्या लिंग गुणोत्तरामुळे त्यांची सामाजिक रचना पूर्णपणे अस्ताव्यस्त झाली होती; आणि ती एका पुरातन संघर्षाला आणि मोठ्या असंतोषाला कारणीभूत ठरण्याची शक्यता होती. पण ह्या संदर्भात, त्यांच्या नेतृत्वमंडळाने अत्यंत चतुराईने, किरणोत्सर्गाच्या आपत्तीचा वापर करून घेतला. नेतृत्वमंडळाच्या हे लक्षात आले होते की शरीरात भिनलेला आणि पर्यावरणात असलेला किरणोत्सर्ग, असंतोष आणि संघर्ष टाळण्यासाठी, लैंगिक असमतोलाच्या समस्येसाठी इष्टापत्ती ठरू शकतो.  तेव्हां त्यांनी जाणीवपूर्वक उर्वरित प्रजेची अशी धारणा होऊ दिली की आपल्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी लैंगिक प्रजननापेक्षा, जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करूनच आपले अस्तित्व टिकवावे आणि वाढवावे लागणार आहे. अन्यथा पुढील पिढ्यांवर किरणोत्सर्गाचे परिणाम अत्यंत तीव्र असतील. ह्या मुळे प्रजनासाठी अनेक स्त्रियांमध्ये योग्य जोडीदार मिळविण्यासाठी जी स्पर्धा सुरू होऊ पाहत होती, ती अकस्मात कमी झाली आणि अनियंत्रित लैंगिक प्रजननाला एका प्रकारे आळा बसला. 

जेव्हां ही धारणा प्रजेत रुजली, पसरली आणि ती स्वीकारली गेली, तेव्हां त्यांनी त्यांच्या जैवतंत्रज्ञानातील ज्ञानाचा पूर्ण उपयोग करून घेतला. शिवाय त्या क्षेत्रात नवीन संशोधनाला सुद्धा विशेष उत्तेजन दिले, चालना दिली. किरणोत्सर्गामुळे झालेल्या उत्परिवर्तनांचा अभ्यास करून नियंत्रित जैवतंत्रज्ञान विकसित केले गेले. त्यांनी त्या वेळी जे कठोर निर्णय तातडीने घेतले आणि राबवले, त्यामुळे त्यांना त्यंच्या संख्येतील लैंगिक असमतोलाला अल्पावधीतच आटोक्यात आणणे शक्य झाले. 

----

पण तरीही मोठ्या प्रमाणात झालेला किरणोत्सर्ग संसर्ग आणि नंतर लगेचच समुद्रतळाखाली खोलवर, अत्यंत भिन्न पर्यावरणात वास्तव्य करावे लागल्यामुळे अमरारिंनी जे जैवशास्त्रीय भाकित केले होते, ते टळले नाहीच. निवातकवचांच्या शारीरिक संरचनेत प्रत्येक पिढीत सूक्ष्म परिवर्तन होतच गेले. काही अंशी त्यात जैव तंत्रज्ञानाशी संबंधित प्रयोगांचाही हातभार लागला होता. नंतरच्या पिढ्यांमध्ये, विशेषत: जे अधिक खोलवर राहत होते, त्यांच्यात त्या परिवर्तनाचे परिणाम तुलनेने लवकर आणि अधिकाधिक दृग्गोच्चर होऊ लागले.  आणखी अनेक गोष्टी त्यांच्या त्या अतिवेगाने होणार्‍या उत्क्रांतीला कारणीभूत ठरल्या.

त्यातील एक प्रमुख होती अन्न व अन्नभक्षणाच्या सवयी. 

समुद्रतळाच्या अन्नसाखळीवर आधारित अशी मणिमतीमधील त्यांची शेते आणि अन्नप्रक्रिया केंद्रे उद्ध्वस्त झाली होती. पण तरीही संचयित केलेले, प्रक्रिया केलेले काही अन्न शिल्लक होते. त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात घटली होती; त्यामुळे त्या संचयित अन्नावर त्यांना काही महिने काढणे शक्य झाले होते, पण त्यावर प्रचंड नियंत्रण असल्यामुळे त्यांना काही प्रमाणात अन्नाचे दुर्भिक्ष जाणवले होते. नंतर शैवालकक्षांचा व त्यात उत्पादित होणार्‍या  अन्नाचा नियमित वापर होऊ लागल्यानंतर, अन्नाचे दुर्भिक्ष कमी होत गेले. पण काही पिढ्यांनंतर तो पर्याय सुद्धा अपुरा पडू लागला होता. मूळात समुद्रतळात खोलवर वास्तव्य केल्यामुळे, त्यांच्या अन्नभक्षणाच्या सवयीत जे आमूलाग्र बदल होत गेले, ते आधीच्या काही पिढ्यांनी स्वीकारले होते. 

पण कालांतराने नवीन पिढ्यांतील विद्रोही वृत्तीच्या काही निवातकवचांनी, पूर्वीप्रमाणे समुदतळावर जाऊन जलचरांची शेती करण्यास आरंभ केला. त्याचे परिणाम विलक्षण वेगाने झाले. त्यांच्यात शारीरिक रचनेत इतरांपेक्षा अधिक वेगाने परिवर्तन झाले.  तिथे उपलब्ध असणार्‍या खनिजांचा, वायुंचा सुयोग्य वापर करत, त्यांनी  तिथल्या वातावरणाला, पर्यावरणाला,  पूरक असणारी आणि तिथे साचणारे उत्सर्जित पदार्थ, त्याज्य पदार्थ, तिथे असणारे सूक्ष्मजंतू , तिथे उपलब्ध असलेले काही अपृष्ठवंशी प्राणी (invertebrates), तिथे वावरणारे, राहणारे काही मासे आणि इतर काही छोटे व नियंत्रित करता येतील असे मोठे जलचर, ह्या सर्वांची जीवनचक्रे एकत्र गुंफत, त्यांच्या वाढत्या संख्येला  दीर्घकाळ नियमित स्वरुपात आणि पुरेसे अन्न प्राप्त होईल; अशी एक नवीन आणि गुंतागुंतीची नवीन अन्नसाखळी त्यांनी निर्माण केली होती, त्यांच्यापुरता त्यांनी अन्नाचा प्रश्न सोडविला होता.

पण ह्या अन्नभक्षणाच्या पद्धतींने सुद्धा, त्यांच्या शारीरिक संरचनेत होणार्‍या विलक्षण परिवर्तनात, मोठ्या प्रमाणात हातभार लावला होता. 

एकंदर सर्वच निवातकवचांच्या शरीरांतर्गत असणार्‍या बहुसंख्य इंद्रियांनी त्या पर्यावरणातील  गंधकाच्या, मिथेनच्या आणि अन्य काही घटकांच्या वाढलेल्या परिणामांशी जुळवून घेतले होते. पण ह्या नवीन जलचरांच्या शेतीमुळे, त्या जलचरांच्या शरीरात असणारा आणि रासायनिक संश्लेषणास हातभार लावणारा एक उपयुक्त जीवाणू , त्या निवातकवचांच्या पचनसंस्थेत नांदू लागला.

----

त्या खोल विवरात त्यांच्या शरीरावर पडणारा दाब प्रचंड अधिक होता (१०),  शिवाय त्यांच्या नगरीतील प्रकाश मणिमतीच्या तुलनेत अंधुकच होता. आरंभीच्या काळात त्यांना, त्यांच्याकडे असलेली युद्ध-कवचे वापरूनच सतत वावरावे लागे. एका अर्थाने ते कवच त्यांच्या शरीराचा भाग होऊन गेले होते.  

तिथल्या अतिअंधूक प्रकाशामुळे, त्यांच्या डोळ्यांचा आकार हळूहळू वाढत गेला. डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी, डोळ्यातच एक पटलही काही पिढ्यांनंतर विकसित झाले. 

तिथल्या दाबापासून संरक्षण व्हावे त्यांना हालचाल करणे सोपे व्हावे आणि चयापचयासाठी कमीत कमी ऊर्जा वापरली जावी, म्हणून कदाचित त्यांच्या शरीरातील सापळ्याची, हाडांची घनता वाढली पण तरीही अनेक हाडांची संरचना अधिकाधिक लवचिक होत गेली, कूर्चांचे प्रमाणही वाढले.  (११)

मणिमतीत सुद्धा पाण्यात विरघळलेला प्राणवायू (Oxygen) मूळातच कमी होता, पण तिथे त्यांच्या कानामागील कल्ल्यांमधून, त्यांना जो प्राणवायू मिळत होता, तो त्यांची प्राणवायूची गरज भागवत होता. पण आता समुद्रात अधिक खोल गेल्यावर, जेव्हां प्राणवायूचे प्रमाण आणखी कमी झाले आणि संपूर्णपणे निर्माण केलेल्या प्राणवायूवर त्यांना विसंबून राहावे लागले, तेव्हां त्यांच्या शरीरात हळूहळू बदल होऊ लागले. समुद्रतळावर जाण्यची वेळ फारशी येत नसल्याने, ज्यांच्या कानामागच्या कल्ल्यांचा वापर होत नसे, त्यांच्या पुढच्या पिढींमध्ये त्या कल्ल्यांचा हळूहळू लोप होत गेला. पण त्या व्यतिरिक्त एक अनपेक्षित आणि निर्णायक परिवर्तन त्यांच्या नंतरच्या पिढ्यांत होत गेले. ते होते अवायूश्वसन (Anaerobic Respiration) (१२). 

पूर्वीसुद्धा क्वचितप्रसंगी ते अवायूश्वसन (Anaerobic Respiration) करत असावेत, कारण त्यांच्या दीर्घस्मृतीत, तसे तुरळक उल्लेख होते. त्यावेळी त्या क्षमतेचा विशेष वापर करण्याची वेळ येत नसावी. पण आता ती क्षमता अधिक कार्यक्षम होऊ लागली होती.  कल्ल्यांचा लोप होऊ लागल्यावर, त्यांच्या शरीरात सुप्तावस्थेत असणारी काही जनुके (genes) सक्रिय होऊ लागली. त्यानंतर त्यांच्या अंतर्श्वसनयंत्रणेत आणि श्वसनासंबंधीच्या त्यांच्या बाह्य इंद्रियातही पुन्हा एकदा विलक्षण परिवर्तन होत गेले. त्यांच्या नाकाचे कार्य गौण होऊ लागले होते आणि नाकाचा आकार लहान होत गेला. काही पिढ्यांनंतर तर त्यांच्यातील कित्येकांच्या नाकाच्या जागी केवळ दोन छिद्रे उरली होती. 

शरीरात भिनलेला आणि आरंभीच्या काळात सहावा लागणारा किरणोत्सर्ग आणि नंतर पर्यावरणात झालेल्या प्रचंड परिवर्तनाचा अटळ परिपाक, अनुवंशिक उत्परिवर्तनात (Genetic mutations) होणे अस्वाभाविक नव्हते. कित्येक पिढ्यानंतर त्यांच्या अनेक गुणसूत्रात आणि शारीरिक आणि आंतरिक संरचनेत, जे स्थायी स्वरुपाचे परिवर्तन झाले, ते त्या परिस्थितीत अटळच होते. 

त्यांच्या रक्ताचा रंग आणि रक्तातील घटकही पालटत गेले. सुरुवातीस त्यांच्या रक्ताच्या रंगात फिकटशी जांभळी छटा आली (१३) . विरघळलेला प्राणवायू वाहून नेण्याची त्या रक्ताची क्षमता प्रचंड वाढली होती. 

त्यांच्या त्वचेचा रंग सुद्धा बदलत गेला आणि त्यात निळसर-काळसर झाक वाढू लागली. त्यांच्या शरीरावर, शरीराला घट्ट चिकटून असणारे जे कवच सदैव असायचे, त्यामुळे कवचातील प्रथिनांचे व खनिजांचे संश्लेषण त्यांच्या त्वचेच्या पेशींमध्येच होऊ लागले. आणखी काही शतकांनी ते कवच जणू त्यांच्या शरीराचा अविभाज्य भागच झाले होते. काही पिढ्यांनंतरची संततीच्या त्वचेवर जन्मत:च कठीण थर दिसू लागले. कदाचित त्यामागे जैवतंत्रज्ञानाचा हात असावा, पण त्याची माहिती गुप्त ठेवली गेली होती. 

त्यांच्या शरीरावरील केस हळूहळू नाहीसे होत गेले. आता त्यांच्या त्वचेला एखाद्या धातूसारखा गुळगुळीतपणा आला होता. 

त्यांच्या डोक्याचा, चेहर्‍याचा आकार बदलला. जबड्याची, दातांची रचना बदलली. सर्वांचीच शारीरिक उंची कमी होत गेली होती, पण जे कधीही विवर सोडून बाहेर पडले नाहीत, त्यांची शारीरिक उंची तर अधिकच वेगाने कमी होत गेली. 

मर्यादित टेलीपथी (दूरमनोसंप्रेषण) ची क्षमता त्यांच्यात पूर्वीपासून सुप्त स्वरूपात असावी. पण त्यांच्या नव्या नगरीत संपर्क साधण्याची प्रभावी यंत्रणा नसल्याने आणि त्यांच्या मेंदूत, चेतासंस्थेत जे परिवर्तन होत गेले त्यानंतर, ती शक्ती आता अधिक वेगाने आणि तीव्र पद्धतीने विकसित होऊ लागली होती. ह्याच काळात त्यांच्या मेंदूतील संवेदन व संप्रेषणाशी निगडित भाग अधिक विकसित झाला आणि मेंदूचा आकारही काही प्रमाणात वाढू लागला. वाढत्या मेंदूला सामावून घेण्यासाठी, स्वाभाविकच त्यांचे डोकेही बरेच मोठे होऊ लागले. 

काही निवातकवचांची टेलीपथी तर इतकी विकसित झाली होती की त्यांना संवाद साधण्यासाठी बोलावे लागत नसे. त्यांच्या मनातील विचार ते थेट दुसर्‍याच्या मनात प्रक्षेपित करू शकत होते. 

ह्याच सुमारास एक विलक्षण गोष्ट घडली. त्यांच्यातील एक विद्रोही तरुणांचा गट, कुतुहलापोटी समुद्रात विविध ठिकाणी आणि विविध स्तरांवर भ्रमण करून आणि काही काळ व्यतित करून परत आला. त्यानंतर, गेल्या पाच सहस्रकांमध्ये न घडलेली गोष्ट घडली....  

---------------------------------------

सहलेखक : विकास द. बापट आणि बिंग को-पायलट

=======================

अवांतर : 

(८)  Self Healing Concrete आणि Biomineralization किंवा Microbial mineralization ह्या विषयी इंटरनेटवर सविस्तर माहिती उपलब्ध आहे. ज्यांना स्वारस्य आहे; ते ती शोधू शकतात. 

(९) Piezoelectric crystal चा वापर करून सर्वसाधारणत: अल्पप्रमाणात ऊर्जानिर्मिती होऊ शकते. अशा 'रत्नाचा' प्रकार कोणता आहे, त्यावर किती दाब पडत आहे, त्यावर निर्माण करता येणार्‍या ऊर्जेचे मान ठरत असले, तरीही सर्वसाधारणत: त्या ऊर्जेचे मान माईक्रोज्यूल्स मध्ये मोजता येईल इतकेच असते. अर्थात अधिक मोठ्या स्तरावर ऊर्जानिर्मिती करण्यासाठी, त्या 'रत्नांचे' सतत आकुंचन, प्रसरण आवश्यक आहे. शिवाय अशा 'रत्नांचा' एक विशेष विन्यास (e.g. 3D arrays / Stacked structures) निर्माण करावा लागेल आणि निर्माण झालेली ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी तितक्याच उत्तम प्रकारची साधने (e.g. Supercapacitors) लागतील. अधिक माहिती इंटरनेटवर. 

(१०)  सर्वसाधारणत: (अर्थातच पृथ्वीवर) समुद्रसपाटीवर वातावरणाचा भार (दाब --> एकक bar) एक असे धरले, तर जसजसे आपण समुद्रात खोल जातो, तसतसा साधारण प्रत्येक १०.३  मीटरनंतर  हा भार १ एककाने वाढतो, असे निरीक्षण आहे. अर्थात अन्य काही घटक ह्या गणितावर परिणाम करतात (उदा. तापमान, क्षारता, स्थानिक गुरुत्वाकर्षण आदि). 

अधिक कुतुहल असणार्‍यांसाठी :  

१ bar (बार) = १,०१,३२५ Pa (पास्कल) = ७६० mm Hg (पारा) = १४.६९६ psi (Pounds per Square Inch). 

१  पास्कल = १ N/m^2  (न्यूटन प्रति चौ.मी.) 

उपलब्ध माहितीनुसार, समुद्रातील दाब पुढीलप्रमाणे आहे :  

भरतखंडालगत ३०० ते ४०० बार, 

अमेरिकेजवळ कित्येकदा ६०० बार पर्यंत, 

Mariana Trench च्या मुखाजवळ साधारण ६०० बार,  

'Challenger Deep' ह्या नावाने ओळखल्या जणार्‍या Mariana Trench मधील सर्वात खोल ठिकाणी १०८६ बार, 

Tonga Trench मधील सर्वात खोल ठिकाणी तो १०८० बार इतका आहे,

Philippine Trench मध्ये १०५४ बार

Kuril–Kamchatka Trench : १०५० बार

Kermadec Trench : १००५ बार आदि. 

'Challenger Deep' पर्यंत काही जण विशेष 'जलयाना'त बसून जाऊन आले आहेत; मात्र Scuba Diving चा विक्रम केवळ ३३२.३५ मीटर्सचा, (अर्थात दाब साधारण ३० बार) चा आहे.  कोणतेही साधन न वापरता, श्वसननियंत्रणाचे विशेष कौशल्य वापरून २५३ मीटर्स, (साधारण २४.५६ बार) इतक्या खोल समुद्रात जाऊन आल्याचे केवळ एक उदाहरण आहे; आणि त्यांचे दुष्परिणाम काय झाले त्यांची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. 

ह्यावरून निवातकवचांच्या नव्या नगरीत किती दाब सहन करावा लागत असावा ह्याची साधारण कल्पना येऊ शकते. थोडक्यात, विवरात राहणाऱ्या निवातकवचांवर पृथ्वीवरील सर्वात खोल समुद्राइतका भार सातत्याने पडत होता. 

(११) समुद्रात खोलवर राहणार्‍या जीवांमध्ये घडणारे परिवर्तन (अर्थात Deep-sea adaptations ) ही एक सर्वसामान्य गोष्ट आहे. ह्या मध्ये जैवप्रकाश, मोठे डोळे, लवचिक शरीर, शरीरातील सापळ्यात होणारे परिवर्तन, तात्पुरते छद्मरुप (Camouflage) आदि अनेक गोष्टींचा समावेश होतो. तिथला दाब, तापमान, प्रकाशाचा अभाव आदि गोष्टींमुळे हे घडते; असे सध्याचे विज्ञान सांगते. समुद्रतळापेक्षाही अधिक खोल जागी गेल्यावर जी उत्क्रांती झाली त्यात ह्या पैकी काही गोष्टी निवातकवचांमध्ये घडल्या असे इथे दाखविले आहे. 

(१२) अवायूश्वसन (Anaerobic Respiration) : प्राणवायू विरहित श्वसनास ‘अवायु-श्वसन’ असे म्हणतात. श्वसनासाठी जेव्हां उपलब्ध प्राणवायू पुरेसा पडत नाही, तेव्हां चयापचय क्रियेसाठी अतिशय प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे चयापचय क्रियेसाठी आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्याचे काम काही पेशी करतात. ह्या प्रक्रियेत पेशीतल्या साखरेचे (ग्लुकोजचे) विघटन करून ही ऊर्जा मिळवली जाते. ह्याविषयी इंटरनेटवर भरपूर माहिती उपलब्ध आहे. ही प्रक्रिया सामान्यतः सूक्ष्मजीवांमध्ये आढळते, पण विपरीत परिस्थितीमुळे कदाचित, पण मोठ्या जीवांमध्ये दुर्मिळ असणारी ही क्षमता निवातकवचांनी आत्मसात केली.  

(१३) Hemocyanin (Coppe based) नावाचे एक प्रथिन अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये आढळते. ह्याच्यामुळे रक्ताला काहीशी जांभळी छटा येते. ह्या प्रथिनाची प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता हिमोग्लोबिनपेक्षा कमी आहे, पण Hemocyanin रक्तातील विशिष्ट पेशींमध्ये असण्याची गरज नसल्याने, अर्थात ते रक्तद्रवात थेट सामावू शकत असल्याने, अतिशीत तापमानात आणि जिथे प्राणवायू मर्यादित प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो, अशा ठिकाणी ते हिमोग्लोबिनपेक्षा अधिक उपयुक्त ठरते. त्याचे काही लाभ असले तरीही एकंदर त्याचे तोटे अधिक आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे अशा प्रण्यांच्या हालचाली तुलनेने संथ असतात. 

========================

=====

क्रमश: 

=====

गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५

युद्धार्थं : भाग ७



=====================

युद्धार्थं : भाग ७ 

=====================

कित्येक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर विवराच्या भिंतींमध्ये अनेक स्तरांवर खोदलेल्या भुयारांची आणि त्यात निर्माण केलेल्या गुंफांची नगरी अखेर पूर्णत्वास आली होती.

अमरारिंना आणि महाधीला अपेक्षित होते; त्या प्रमाणेच ही नगरी पूर्ण होताना अनंत अडचणी आल्या होत्या. उध्वस्त मणिमतीमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणावर साधनसामग्री उपलब्ध होती. तिथल्या ज्या ज्या गोष्टींचा पुनर्वापर शक्य होता, त्या त्या गोष्टी वापरात आणल्या गेल्या होत्या. पण तरीही साधनसामग्रीच्या पलीकडे अनेक आव्हाने होती आणि परिस्थितीचा तसेच काळाचा रेटा हा निर्णायक घटक ठरत होता. 

नवीन नगरीसाठी वेळापत्रक आखताना, अमरारिंनी  नेतृत्वमंडळाच्या सूचनेचे पालन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पण तरीही अपेक्षित असलेल्या कालावधीच्या जवळजवळ दीडपट वेळ लागला होता.  ह्या विलंबाचे एक प्रमुख कारण होते की विचकांनी त्यांचे काम चोख बजावले होते !  कित्येक भावी संकटे निव्वळ त्यांच्या डोक्यातील शंकासुरामुळे वेळीच उघडकीस आली होती आणि वेळीच त्यावरील उपाययोजना करणे शक्य झाले होते.

मोठ्या यंत्रांच्या सहाय्यामुळे कामाचा वेग अनेक पटींनी वाढला. भुयारे आता अधिक वेगाने खोदली जाऊ लागली; तसेच मोठ्या गुंफाची निर्मिती सुद्धा सोपी झाली होती. त्या भुयारांच्या व गुंफांच्या भिंतींमधून विविध आकाराच्या नलिका फिरवताना, भुयारांच्या, गुंफांच्या भिंतींना काही ठिकाणी तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यावर वेळीच उपाययोजना केली गेली होती. पण तरीही भुयारांच्या आणि गुंफांच्या भिंतींना विशिष्ट प्रकारचे लेपन करण्याची आवश्यकता होती, जेणेकरून त्या भिंती त्यांच्यावर पडणारा भार सहन करू शकतील. तसेच आत राहणार्‍या निवातकवचांच्या शरीरावर पडणारा दाब त्यांना सहन करता यावा, ह्यासाठी विचकांच्या सततच्या आग्रहामुळे काही काही भुयारांमध्ये नि गुंफांमध्ये ह्या लेपनाचे कित्येक थर द्यावे लागले होते.

जलशुद्धीकरण प्रक्रियेचे काम तुलनेने थोडे सोपे होते; कारण त्या यंत्रणेचा कित्येक शतकांचा अनुभव निवातकवचांकडे होता. तरीही इथेही त्यांना त्यांच्या मूळ संरचनेत विविध सुधारणा कराव्या लागल्या. कारण इथे प्रश्न केवळ क्षारांचे प्रमाण तुलनेने अधिक असण्याचा नव्हता; तर तिथल्या पाण्यात विरघळलेला कर्बवायूचे (Carbon Dioxide) आणि मिथेनचे प्रमाण सुद्धा, समुद्रतळाच्या तुलनेत अधिक होते. स्वाभाविकच  विवरातील पाण्याची घनता ही क्षारता व विरघळलेल्या वायूंमुळे, समुद्रतळाच्या पाण्यापेक्षा किंचित अधिक होती.

विवराच्या तळाशी सुप्त अवस्थेत असणारा शिलारस, त्यांची उष्णतेची नड भागविण्यासाठी अत्यंत चतुराईने वापरला होता. एका मोठ्या चक्राकार नलिकेतून कमी उत्कलन बिंदू असलेला एक विशिष्ट द्रव भरला होता. हा द्रव जेव्हां विवराच्या तळाशी जात असे; तेव्हां त्याचे वायूत रुपांतर होत असे. त्या नलिकेच्या वरच्या भागात, त्या वायूला वेगाने थंड केले जात असे. ह्या उष्णता विनिमयातून (Heat Exchange)  जी उष्णता प्राप्त होत असे; ती इतकी अधिक असायची की तिचा वापर भुयारांमध्ये आणि गुंफांमध्ये करण्यापूर्वी त्यांना ती विविध मार्गांनी नियंत्रित करावी लागत असे. पण ह्या नियंत्रणामुळे बरीच उष्णता वाया जात होती. त्यामुळे उष्णता नियंत्रण कक्षातील तापमान बरेच अधिक असे. विचकांना ही गोष्ट खटकली नसती तरच नवल ! 

त्यांनी तिथल्या वैज्ञानिकांना त्यावर उपाय शोधायला आणि त्यानुसार यंत्रणेला नवीन रुप देण्यास सांगितले होते. त्यानुसार अमरारिंशी चर्चा करून, त्या वैज्ञानिकांनी त्या नलिकेला तीन सहकेंद्रित आवरणे दिली होती. सर्वांत आतील नलिकेत कमी उत्कलन बिंदू असलेला द्रव भरला जात असे. तो तळाशी पोहोचल्यावर वायूत रूपांतरित होई, आणि वरच्या थरात उष्णतेचे उत्सर्जन करून पुन्हा द्रवरूप धारण करी. मधल्या आणि बाह्य थरांत टप्प्याटप्प्याने उष्णता शोषली जात असे, त्यामुळे उष्णतेचा प्रवाह अधिक नियंत्रित झाला आणि वाया जाणाऱ्या उष्णतेचे मान लक्षणीयरीत्या कमी झाले. पण ह्यामुळे प्रत्यक्ष यंत्रणा कार्यांवित होण्याचा काळ बराच वाढला होता. 

समुद्रतळाशी प्रकाश जितक्या दूरपर्यंत प्रवास करत होता, त्या तुलनेत त्या विवरात प्रकाश दूरपर्यंत जात नव्हता; त्याचे महत्वाचे कारण होते त्या विवरातील पाण्यात असणार्‍या सूक्ष्म कणांचे व वायूंचे प्रमाण. त्यामुळे खरंतर त्यांना त्यांच्या ऊर्जागोलकांची सुधारित आवृत्ती निर्माण करणे आवश्यक होते; पण मूलभूत संशोधनापेक्षा वेळ वाचविणे, ह्या गोष्टीला प्राधान्य देऊन त्यांनी त्यांच्या आराखड्यापेक्षा अधिक ऊर्जागोलकांची तिथे व्यवस्था केली होती. पण तरीही  तिथला प्रकाश मणिमतीपेक्षा अंधुकच होता. विचकांच्या निरीक्षणाच्या वेळी त्यांनी ह्या गोष्टीवर नेमके बोट ठेवले. 

त्यावर उपाय म्हणून प्रथम, 'जीवदीप्ति (Bioluminescence) असलेल्या काही जलचरांचा वापर करावा का' ह्या विषयावर सांगोपांग चर्चा झाली होती, पण त्या चर्चेअंती हा उपाय सध्या व्यवहार्य नाही; असा अभिप्राय अनेकांनी नोंदविल्यामुळे, भविष्यात करावयाची उपाययोजना म्हणून तो उपाय राखून ठेवण्यात आला . तत्पश्चात सर्व भुयारे आणि गुंफांच्या भिंतीवर स्फुरदीप्ती (Phosphorescence) असलेल्या एका विशिष्ट पदार्थाचा आणखी एक लेप देण्यात आला. हा लेप ऊर्जागोलकांतून निघणारा प्रकाश शोषून घेत असे आणि नंतर बराच काळ मंद प्रकाश उत्सर्जित करत असे. त्यामुळे ऊर्जागोलकांना सतत पूर्ण क्षमतेने चालविण्याची आवश्यकता उरली नाही आणि तिथली   दीप्ती सुद्धा थोडीशी वाढली. 

शैवालकक्षातून अन्न आणि प्राणवायू ह्या दोन्हींची दीर्घकाळ पूर्तता होईल आणि जैवकचरा पुरेपुर वापरात येईल, अशा रितीने त्यांची रचना आणि निर्मिती करण्यात आली होती. हा कक्ष इतका परिपूर्ण झाला होता की निवातकवचांच्या पुढच्या काही पिढ्यांसाठी सुद्धा पुरेशा अन्नाची साठवणूक करून ठेवण्याची क्षमता त्या स्तरात होती. शिवाय शैवालकक्ष व साठवणुक कक्ष ह्या दोन्ही ठिकाणी, आवश्यकतेनुसार विस्तार करण्यासाठीही व्यवस्था करण्यात आली होती. 

सर्व यंत्रणांची निर्मिती करताना एक दक्षता आवर्जून घेतली गेली होती; ती म्हणजे पर्यायी यंत्रणा (Backup). त्यामुळे एखादी यंत्रणा कोणत्याही कारणाने बिघडली, तर तशाच दुसऱ्या पर्यायी यंत्रणेचा तात्काळ वापर करता येईल; अशाच प्रकारची रचना सर्वत्र करण्यात आली होती.  

अमरारि सर्व परिस्थितीवर, सर्व कार्यांवर, त्यांच्या प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवून होते; जिथे आवश्यक असेल तिथे ते सक्रिय सहभाग घेत. अखेर विचकांकडून ती नगरी पूर्ण झाल्याचा निरोप मिळाला, तेव्हां विचकांना सोबत घेऊनच त्यांनी मणिमती गाठली आणि नेतृत्वमंडळाला नगरी पाहण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले.

विपरित परिस्थितीतही टिकाव धरण्याच्या, निवातकवचांच्या अस्तित्वाच्या, पुढचा अध्यायाचा प्रारंभ आता दूर नव्हता. 

---------------------------------------

सहलेखक : विकास द. बापट आणि बिंग को-पायलट

=======================

अवांतर : 

इथे वापरलेली अनेक तंत्रे ही आपल्याला ज्ञात विज्ञानाशी सुसंगत आहेत. 

विवराच्या तळाशी असलेल्या शिलारसातून उष्णता मिळविण्याची पद्धत ही heat‑pipe या तंत्राशी साधर्म्य दाखवते. उपग्रह किंवा अवकाशयान यांना थंड ठेवण्यासाठी अशा नलिका वापरल्या जातात असे उल्लेख वाचले होते. त्यात कमी उत्कलन बिंदू असलेला द्रव भरलेला असतो. उष्णतेच्या संपर्कात आल्यावर तो वायूत रूपांतरित होतो, वरच्या थंड भागात पोहोचल्यावर पुन्हा द्रवरूप धारण करतो, आणि अशा रीतीने उष्णता एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वाहून नेतो. उष्णतेचा अपव्यय कमी करण्यासाठी देखील ह्याचा उपयोग होऊ शकेल असे इथे दाखविले आहे.

पाण्याची घनता ही केवळ क्षारतेवर अवलंबून नसते. तापमान, दाब आणि त्यात विरघळलेले वायू यांचाही त्यावर परिणाम होतो. विवरातील पाण्यात कार्बन डायऑक्साइड आणि मिथेनचे प्रमाण जास्त असल्याने त्या पाण्याची घनता  समुद्रतळाच्या पाण्यापेक्षा किंचित अधिक होते आणि अशा पाण्यात प्रकाशाचा प्रसारही मर्यादित होतो. कारण पाण्यातील सूक्ष्म कण आणि वायू प्रकाश शोषून घेतात किंवा त्याचे scattering करतात. म्हणूनच विवरात ऊर्जागोलक असूनही प्रकाश मणिमतीपेक्षा अंधुक होता.

जीवदीप्ती म्हणजे काही जीव स्वतः प्रकाश निर्माण करतात, जसे की समुद्रातील जेलीफिश किंवा खोल समुद्रातील मासे. पण त्यांना नियंत्रित करणे, वाढवणे आणि दीर्घकाळ टिकवणे कठीण होते. म्हणून तातडीच्या उपायासाठी त्यांनी स्फुरदीप्तीचा मार्ग निवडला, असे दाखविले आहे. हा पदार्थ बाह्य प्रकाश शोषून घेतो आणि नंतर मंद प्रकाश सोडतो. त्यामुळे नगरीत एक सौम्य, स्थायी स्वरुपाचा प्रकाश निर्माण करता आला.

पृथ्वीवरही शैवालांचा वापर प्राणवायू निर्मितीसाठी आणि जैवकचऱ्याच्या पुनर्वापरासाठी केला जातो. इथे नगरीच्या दीर्घकालीन स्वयंपूर्णतेसाठी अन्न, प्राणवायू आणि कचऱ्यावरची पुनर्प्रक्रिया या तिन्ही गोष्टी एकाच प्रणालीत गुंफल्या आहेत.

अभियांत्रिकीतील एक मूलभूत नियम म्हणजे redundancy—म्हणजेच कोणतीही यंत्रणा बिघडली तर तिचा पर्याय तत्काळ उपलब्ध असणे. अवकाश मोहिमा, पाणबुड्या किंवा अणुऊर्जा प्रकल्प यांमध्ये हा नियम काटेकोरपणे पाळला जातो. इथेही तीच संकल्पना वापरली गेली आहे. 

========================

=====

क्रमश: 

=====

मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५

युद्धार्थं : भाग ६


अमरारिंच्या चेहर्‍यावरचा तणाव एव्हांना निवळला होता. 

नव्या नगरीचा आराखडा नेतृत्वमंडळापुढे नेण्यापूर्वी त्यांनी काय बोलायचे, कसे सांगायचे ह्याची अनेकवेळा मनात उजळणी केली होती. पण त्या आराखड्याला होकार मिळविणे त्यांना तुलनेने सोपे गेले होते. त्यांनी जसा तो आराखडा समजाविण्यास आरंभ केला, तेव्हां त्या सभाकक्षात जमलेल्या सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. 

नंतर जसजसे ते तांत्रिक गोष्टींवर बोलू लागले, तेव्हां आरंभीस अनेक शंका व प्रश्नांचे मोहोळ उठले होते. त्याच्या प्रत्येक  उत्तरासोबत, परिस्थितीचा अटळ रेटा बहुतेकांच्या लक्षात येऊ लागला, तशी त्या उत्साहाला ओहोटी लागली. 

शेवटी त्यांना स्पष्टपणे सांगितले गेले "आमचा सर्वांचा तुमच्यावर विश्वास आहे; आता अधिक वेळ न दवडता प्रत्यक्ष कामाचा आरंभ करा."  

ते तिथून निघणार, तितक्यात नेतृत्वमंडळातील त्यांच्या इतकाच वृद्ध असलेल्या प्रकेतूंनी त्यांना अधिकारवाणीने सांगितले "तुम्ही दहा प्रवाहचक्रात (७) ही नगरी पूर्ण होईल असे म्हणालात; पण आपल्याकडे तितका वेळ आहे असे मला वाटत नाही. पाच-सहा प्रवाहचक्रात आपण तिथे स्थलांतर करू शकलो; तर ते अधिक योग्य ठरेल. आरंभीच्या काळात समान स्तरावरचे अनेक निवातकवच मोठमोठ्या गुंफांत एकत्र राहतील. आम्ही सुद्धा एका मोठ्या कक्षात एकत्र राहू."  

उध्वस्त मणिमतीतील वाढत असलेला असंतोष, प्रकेतूंच्या कानावर आला होता. त्यामुळे प्रकेतूंच्या त्या सूचनेत केवळ अधिकार नव्हता, तर मणिमतीत त्यांनी बघितलेल्या, अनुभवलेल्या आक्रोशाची कंपने होती.

ह्या अनपेक्षित मागणीमुळे अमरारि थोडे गोंधळले, पण त्यांचे विचारचक्र वेगाने धावू लागले. त्यांनी योजलेले वेळापत्रक तर बदलणार होतेच, पण आराखड्यातही परिवर्तन करावे लागणार होते. एकतर गुंफांचा आकार मोठा करावा लागणार होता, शिवाय काही ठिकाणी त्या गुंफांना आतून एकमेकाशी जोडावे लागणार होते. अर्थात गुंफांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याने, वेळही तितकाच वाचणार होता.  त्यांनी सर्वांकडे बघितले, प्रकेतूंच्या मागणीशी सर्वजण सहमत आहेत; असे त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते. त्यांच्या मान्यतेशिवाय पुढे जाणे अशक्य होते. अमरारिंनी मानेनेच रुकार दिला आणि सभाकक्षातील तणाव जणू एका क्षणात विरून गेला. नेतृत्वाचा अंतिम आदेश स्पष्ट होता.  “आता वेळ न दवडता प्रत्यक्ष काम सुरू करा...." 

त्यानंतर सगळी मरगळ झटकून अमरारि पुन्हा विलक्षण वेगाने कामाला लागले. पुन्हा एकदा त्या सभाकक्षात वैज्ञानिकांचा तो गट एकत्र जमला. त्यांनी सर्वांना नेतृत्वासोबत झालेल्या चर्चेसंदर्भात कल्पना दिली. सर्वप्रथम त्यांनी मूळ  आराखड्यात तातडीने आवश्यक ते परिवर्तन करण्यासाठी महाधीला सूचना दिल्या.  भुयारे खोदणे, प्राणवायूची निर्मिती, जलशुद्धीकरण आणि ऊर्जानिर्मिती ह्या चार प्रमुख कामांसाठी सविस्तर आराखडा आखणे  आणि त्यासाठी पथके निर्माण करण्याचे दायित्व, त्यांनी त्या गटातील चौघांवर सोपवले. छिद्रान्वेषी स्वभावाच्या विचकांना त्यांनी सर्व कामांवर लक्ष ठेवण्याची, तसेच आवश्यक त्या प्रत्येक ठिकाणी वेळीच सूचना करण्याचे दायित्व दिले. तसेच आणखी दोघांवर आवश्यक त्या साधनसामग्रीची जमवाजमव आणि यंत्रांचे व्यवस्थापन सोपवले. 

महाधी आणि तिच्य सहकार्‍यांनी आराखड्यात आवश्यक ते परिवर्तन करेपर्यंत, सर्व पथके निर्माण झाली होती.त्यानंतर सविस्तर आराखडे सुद्धा निर्माण केले गेले आणि पथके कामाला लागली. ठरविल्याप्रमाणे अनेक छोटे खोदक विवराच्या निकट आधीच आणले गेले होते. खोदक पथक छोट्या खोदकांसह विवरात खोल उतरले. आराखड्यानुसार विवराच्या भिंतीवर एक प्रचंड मोठे प्रकाशमान वर्तुळ कोरण्यात आले. त्या वर्तुळाच्या परिघाजवळ एकाच वेळी अनेक खोदकांनी त्यांचे काम सुरू केले. 

खोदकांच्या टोकांवरून निघणारे निळसर ऊर्जाकिरण पाण्यात पसरत होते. खोदकांच्या प्रत्येक आघातासोबत पाण्यात सूक्ष्म कंपनलहरी निर्माण होत होत्या आणि विवराच्या भिंतींवर आदळून परतत होत्या. पाण्यात सातत्याने पसरणार्‍या त्या कंपनांमुळे, त्या निळाईला काहीसे गूढत्व लाभले होते. ती निळाई सजीव असल्याचा भास होत होता. कामाचा वेग मंद होता, पण प्रत्येक आघात आणि भुयाराची वाढत जाणारी लांबी म्हणजे नव्या नगरीच्या स्वप्नाकडे एक पाऊल होते.

अथक परिश्रमानंतर अखेर पहिले लांबलचक भुयार निर्माण झाले. भुयाराचे दुसरे तोंड विवरापासून बर्‍याच दूर अंतरावर समुद्रतळाच्या दिशेने उघडले गेले. त्या क्षणी तिथल्या पाण्याचे भारसंतुलन बिघडले. तिथला पाण्याच्या  प्रवाहाचा वेग आणि दिशा अकस्मात बदलली . आता त्या मार्गातून मोठ्या यंत्रांना भुयाराच्या आत आणण्याचा मार्ग पूर्ण झाला होता.

जेव्हा पहिली मोठी यंत्रे त्या भुयारातून आत सरकली, तेव्हा त्यांच्या हालचालींनी वेगवान प्रवाहलहरी निर्माण झाल्या. त्या प्रवाहलहरी विवराच्या भिंतींवरून परावर्तित झाल्या आणि तिथली निळाई पुन्हा खळबळली. ह्यावेळी त्या लहरींची कंपने विवराच्या वरपर्यंत पोहोचली. 

मोठ्या यंत्रांचे काम सुरू झाले हे कळताच, अमरारिंनी आणि महाधीने एकमेकांकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यांत थकवा होता; पण मनात समाधान दाटून आले होते. आता कामाचा वेग अनेक पटींनी वाढू शकणार होता. नव्या नगरीचे स्वप्नाचे पहिले पाऊल पडले होते.

---------------------------------------

सहलेखक : विकास द. बापट आणि बिंग को-पायलट

=======================

अवांतर : 

(७) समुद्रतळाशी दीर्घकाळ राहणार्‍या संस्कृतीची कालगणनेची परिमाणे आपल्याप्रमाणेच असण्याचे कोणतेही कारण नाही. तिथल्या पर्यावरणाशी सुसंगत अशी त्यांची कालगणना असणे अधिक सयुक्तिक आहे. समुद्रात असंख्य प्रवाह असतात आणि त्यातील प्रत्येकाचे एक चक्र असते. त्यामुळे मणिमतीच्या जवळ असलेल्या एखाद्या प्रवाहच्या चक्रावर निवातकवचांची कालगणना आधारलेली असणे, अतर्क्य नाही. 

========================

=====

क्रमश: 

=====

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५

युद्धार्थं : भाग ५



=====================

युद्धार्थं : भाग ५     

=====================

नेतृत्वाशी संवाद साधून अमरारि आपल्या कक्षाकडे परतत असताना, अकस्मात महाधी सुहास्य मुद्रेने त्यांच्याकडे आली. तिच्या चेहर्‍यावरून तिच्यावर सोपवलेले कार्य तिने पार पाडले आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ सभेसाठी सर्वांना निमंत्रण देण्याची व्यवस्था केली. 

त्या पहिल्या सभेनंतर अमरारिंनी  बराच कालावधी अस्वस्थ मनस्थितीत घालवला होता. नेतृत्वाशी विचारविनिमय करणे, हताश झालेल्या निवातकवचांना, स्त्रियांना धीर देणे, तात्पुरत्या पुनर्वसनाच्या कामात सहभागी होणे आदि गोष्टींमध्ये त्यांचा बराच वेळ जात असला, तरी त्यांचे मन महाधीकडून येणार्‍या निरोपाकडे लागले होते. एकीकडे त्यांना विश्वास वाटत होता की महाधी आणि तिचे सहकारी आखत असलेला नव्या नगरीचा आराखडा हा परिपूर्ण असेल, पण दुसरीकडे, त्यांना त्यावर उमटणार्‍या संभाव्य प्रतिक्रियांचे थोडे भय देखील वाटत होते. त्यात गेल्या सभेत कित्येकांनी केवळ निरुपायाने होकार दिला होता; ही गोष्ट त्यांना भेडसावत होती.  

अमरारिंकडून सभेसाठी सूचना मिळाली आणि त्याच सभाकक्षात उत्कंठा, चिंता, तणाव, आत्मविश्वास अशा विविध भावना उमटलेले चेहरे पुन्हा एकत्र आले. सभाकक्षात तसाच निळसर- हिरवट प्रकाश पसरला होता. महाधीने तिच्या हातात असणारा एक गोलक त्या मेजाच्या एका कोपर्‍यात ठेवला आणि त्यावर स्वत:चा हात ठेवला. त्या मेजाच्या  पृष्ठभागावर असलेल्या काचेवर संभाव्य नगररचनेचे एक रेखाचित्र उमटले. 

अनेकांनी ते रेखाचित्रे नीट बघितल्यानंतर, स्पष्टीकरणाच्या अपेक्षेने महाधीकडे बघितले. महाधीने सावकाश पण ठाम स्वरात बोलण्यास आरंभ केला. : 

"गेल्या वेळेसच मी सुचवले होते की आपल्याला समुद्रतळावर राहणे शक्य नाही. त्या ऐवजी विवरात उतरून, विवराच्या  भिंतींमध्ये  काटकोनात भुयारी मार्ग खणले, तर त्यात आपण राहण्याची व्यवस्था करू शकतो आणि विवराचा अवाढव्य आकार पाहता वेगवेगळ्या दिशांना हे भुयारी मार्ग खणले जाऊ शकतात. हा आराखडा, केवळ एका दिशेला खणलेल्या भुयाराची अंतर्गत रचना कशी असेल हे दाखविण्यासाठी आहे."

तो आराखडा सविस्तर समजावण्यासाठी महाधी त्या आराखड्यावर थोडीशी झुकली आणि पुन्हा तिने बोलण्यास आरंभ केला. 

"प्रत्येक भुयारात ही रचना अनेक स्तरीय असेल. तुमच्या सर्वांच्या लक्षात असेलच की विवराच्या तळातून भू-रस उफाळला होता, अर्थात तिथे प्रचंड उष्णता आहे. ह्या उष्णतेचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. प्रत्येक भुयारी मार्गात आपण त्या उष्णतेचा उपयोग करून घेऊ शकू, ती उष्णता आपल्या अस्तित्वासाठी संकट ठरणार नाही;  इतकेच आपण खोल जाऊ. त्यामुळे प्रत्येक भुयारी मार्गात किती स्तर असतील; हे आत्ता सांगणे कठीण आहे. पण सर्वसाधारणत: सर्व भुयारी मार्गात  बहुस्तरीय रचना असेल."  

इतके बोलून महाधी प्रतिक्रिया पाहण्यासाठी थांबली. अनेकांच्या चेहेर्‍यावर अजूनही प्रश्नचिन्हे होती. 

ते पाहून तिने त्या आराखड्यामागची कारणे देण्यास आरंभ केला. "इथे तुम्हाला अनेक स्तर दिसत असले, तरी आम्ही त्याचे चार प्रमुख भाग पाडले आहेत."

सगळ्यांची दृष्टी त्या आराखड्यावर असली, तरी त्यांचे कान आपल्या बोलण्याकडे आहेत हे तिला जाणवले. ती पुढे म्हणाली : 

"सर्वात वरती वावरण्याच्या व राहण्याच्या जागा, त्या खाली प्राणवायू व अन्न उत्पादनासाठी आणि साठवणूकीसाठी व्यवस्था, त्या खाली जल शुद्धीकरण आणि तापमान नियंत्रण कक्ष आणि  सर्वात तळात भूगर्भातील उष्णता आत घेण्याची, नियंत्रणाची आणि ऊर्जा उत्पादनाची व्यवस्था अशी ढोबळमानाने रचना आहे. आत घेतलेली उष्णता आपण आवश्यकतेनुसार जिथे आवश्यक असेल तिथे तापमान नियंत्रण करून पुरवू शकू. तसेच आपल्याला विविध प्रकल्पांसाठी जी ऊर्जा लागेल, त्याची निर्मिती सुद्धा इथेच होईल." 

ती क्षणभर थांबली. सर्वजण उत्सुकतेने ऐकत होते. ती पुढे म्हणाली "आजही पाण्यातून आपण जो प्राणवायू मिळवतो, तो आपल्याला पुरेसा ठरत नाही, त्यामुळे आपल्याला अतिरिक्त प्राणवायू निर्माण करण्याची आवश्यकता भासणारच आहे." 

विचकांना  मान डोलावताना तिने पाहिले आणि तिच्या स्वरात थोडा उत्साह आला. : 

"अन्न उत्पादनासाठी आरंभी आपण शैवाल उत्पादन करावे. त्या शैवाल उत्पादनातून आपली प्राणवायू देखील मिळवता येईल. सध्या आपण जलचरांची शेती करू शकणार नाही; कारण त्यांच्यावर सुद्धा किरणोत्सर्गाचे परिणाम झाले असणार आहेत. पण कालांतराने ह्या स्तरावरील काही कक्षात आपल्याला पूर्वीप्रमाणेच जलचरांची शेती सुद्धा करता येईल. शैवाल उत्पादनाच्या वरच्या थरात, अतिरिक्त उत्पादन साठवून ठेवण्याची व्यवस्था करता येईल. जिथे हिरवे त्रिकोण दिसत आहेत तो उत्पादनाचा आणि शुभ्र त्रिकोण दिसत आहेत, तो साठवणुकीचा स्तर आहे." 

तिने मान वर केली. अमरारिंच्या चेहर्‍यावर समाधान आहे; असे तिला वाटले. :

"त्याच्या वरच्या स्तरात राहण्याची व्यवस्था आणि सर्वात वरती आपल्याला  ज्या ज्या कारणांसाठी एकत्र यावे लागते, अशा कारणांसाठी व्यवस्था करता येईल.  शिवाय ज्या स्तराच्या आपल्या गरजा वाढतील, तसतसे त्या स्तरावर विस्तारीकरणही करता येईल. त्यासाठी अर्थातच नव्याने भुयारी मार्ग खणावे लागतील."  

महाधी बोलत असताना अमरारिंना जाणवत होते की तिने व तिच्या सहकार्‍यांनी किती खोलवर विचार केला आहे. त्यांनी उपस्थितांच्या चेहर्‍यावरून दृष्टी फिरवली. कित्येक चेहर्‍यांवरचा तणाव कमी झाला होता. काही चेहरे चिंतातूर आणि विचारमग्न सुद्धा होते. 

नेहमीप्रमाणे पहिली शंका विचकांच्या डोक्यात आली. 

"आपण जितके खोल जाऊ, तितका शरीरावर पडणारा दाब वाढणार आहे, तो आपण कसा सहन करणार आहोत ?"

महाधीने ह्या प्रश्नाचा विचार आधीच केला असावा. तिने तात्काळ उत्तर दिले. "हो, दाब वाढेल हे खरे, पण आपण पूर्ण  नगर दाब‑प्रतिरोधक मिश्रधातू व सेंद्रिय तंतूंच्या आवरणाने सुरक्षित करू शकतो. त्यामुळे आपले शरीर थेट दाबाला सामोरे जाणार नाही. मात्र, दीर्घकाळात आपल्यात सूक्ष्म बदल होत जाणारच आहेत. आपल्या हाडांची घनता वाढेल, आपले शरीर लहान व हलके होई भुयारातील गुंफांमध्ये सतत वावरल्यानंतर कालांतराने आपली  उंची घटत जाण्याची शक्यता आहेच. ही उत्क्रांती अटळ आहे, पण ती आपल्याला नगराबाहेर वावरण्यासाठी सुद्धा अधिक सक्षम करेल."

चेहर्‍यावर चिंतेचे जाळे पसरलेल्या आणखी एका वृद्धाने दोन प्रश्न विचारले. खोलवरच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण अधिक असेल, त्यांचा प्रभाव कसा कमी करणार ?, दुसरी गोष्ट म्हणजे नगर उभारणीसाठी लागणारी सामग्री आणि यंत्रे विवराच्या आत कशी नेणार आहोत ?"

ह्या प्रश्नांचा सुद्ध महाधीने विचार केला होता. "खोल पाण्यातील क्षारांचे प्रमाण आपल्या शरीरावर परिणाम करेल. पण कालांतराने आपल्या शरीराच्या उत्सर्जन व पचन यंत्रणेतील सूक्ष्मजीव हे क्षार संतुलित करतील. सुरुवातीला मात्र जलशुद्धीकरण कक्ष आवश्यकच राहील."

ती क्षणभर थांबली आणि तिने दुसर्‍या प्रश्नाचेही उत्तर दिले. : 

आरंभीची विवरे खणताना आपल्याला जी सामग्री लागेल, ती नड आपल्याकडे आत्ता शिल्लक असलेले धातू व इतर पदार्थांचे साठे भागवतील. नंतर विवरांच्या भिंतीमधून, खणलेल्या भुयारांतून आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळवण्याची यंत्रणा आपल्याला विकसित करावी लागेल. तिथे आपली मोठी यंत्रे नेणे हे सध्या तरी निश्चितच कठीण आहे. त्यामुळे आपल्या जुन्या नगरात खाणींमध्ये खोदकाम करण्यासाठी, जे छोट्या आकाराचे खोदक आपण निर्माण केले होते; ते खोदक वापरून आरंभीचे मोठे भुयारी मार्ग आपण निर्माण करू शकतो."

अजूनही काही चेहरे तणावातच होते. महाधीने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती पुढे बोलू लागली : 

"त्या छोट्या खोदकांमुळे आरंभीच्या कामास थोडा अधिक वेळ लागेल हे आम्ही गृहित धरले आहे. पण एकदा पुरेशा लांबीचे आणि उंचीचे भुयार पूर्ण झाले की त्या भुयारातून वरती समुद्रतळाच्या  दिशेने आपल्याला दुसरे मार्ग निर्माण करावे लागतील. ह्या मार्गांचा वापर करून आपली मोठी यंत्रे आत येऊ शकतील. एकदा ती यंत्रे आत आली की नंतर कामाचा वेगही वाढेल. शिवाय, भुयारी मार्गातून बाहेर पडण्यासाठी आणखी एक पर्यायी मार्ग सुद्धा आपसूकच निर्माण होईल."

महाधी बोलायची थांबली आणि त्या सभाकक्षात तणावपूर्ण शांतता पसरली.काही जणांच्या चेहर्‍यावर अनामिक भीती आहे; असे तिला वाटले. काही क्षण असेच गेले; कुणीच काही बोलेना. 

मग विचकांचा प्रश्न आला "म्हणजे हा आराखडा वापरल्यानंतरही आपल्यात, आपल्या पुढील पिढ्यांमध्ये जे परिवर्तन होणार आहे, ज्या अटळ उत्क्रांतीला आपण सामोरे जाणार आहोत; ते आपण टाळू शकणार नाहीच आहोत. कारण ह्या आराखड्यात कुठेही जुन्या पद्धतीच्या नगररचनेकडे पुन्हा परत जाऊ शकू; असे काहीही नाही." 

विचकांचा आक्षेप अगदी योग्य होता. त्यामुळे तिथे थोडीशी कुजबूज सुरू झाली  आणि ती थांबण्याचे नाव घेईना. 

तेव्हां अमरारिंनी त्या चर्चेची सूत्रे हातात घेतली. "सर्वांनी इकडे लक्ष द्या आणि मी काय सांगतो आहे ते पुन्हा नीट लक्ष देऊन ऐका. आपण गेल्यावेळी ह्या विषयी सविस्तर बोललो आहोत, पण तरीही पुन्हा सांगतो. आपण झेललेल्या आणि ह्यापुढेही कमी-अधिक प्रमाणात झेलाव्या लागणार्‍या किरणोत्सर्गाचे परिणाम आपल्यावर होणारच आहेत. ते परिणाम आपल्या पुढील पिढ्यांमध्येही उतरणार आहेत. त्यात आता आपण पूर्णपणे वेगळ्या पर्यावरणात राहणार आहोत, वावरणार आहोत. जनुकांमध्ये, गुणसूत्रांमध्ये  उत्परिवर्तन (Mutation in genes, Chromosomal Mutation) अटळ आहे. त्याचा वेग कदाचित आपण नियंत्रित करू शकू. पण परिस्थितीनुसार, पुढील पिढ्यांमध्ये  तो वेग कमी  करण्याऐवजी आपण तो वाढविण्यासाठीच प्रयत्न करू, ही शक्यता आहे. तेव्हां पुन्हा एकदा सांगतो; ही संभाव्य उत्क्रांती मनोमन स्वीकारा."

सभाकक्षातील  तणाव अजूनही तसाच होता. मग त्यांनी निर्वाणीचा आधिकारिक स्वर लावला. : 

"ह्या पलिकडे कुणाला काही शंका असल्यास वा नंतर काही गोष्टी लक्षात आल्यास माझ्याशी अवश्य बोला. पण ह्या आराखड्याप्रमाणे आपण पुढे जावे; असे मला वाटते. तुम्हा सर्वांची मान्यता / आक्षेप मला लेखी कळवा. आता ही सभा संपली आहे. आवश्यकता वाटल्यास आपण पुन्हा भेटू."

सभाकक्ष रिकामा झाला तरी अमरारि त्यांच्या जागेवरच बसून होते. त्यांच्या लक्षात आले की हा आराखडा नेतृत्वाला समजावून, त्यांचा अंतिम होकार घेऊन आणि त्यांच्याकडून  सर्व प्रकारच्या साधनसामग्रीची उपलब्धता कळल्यानंतरच, अंतिम वेळापत्रक ठरवता येईल. 

मेजावरील ऊर्जागोलकावर त्यांनी दोन बोटांनी अलगद स्पर्श केला. त्या कक्षातील प्रकाश मंदावला. 

काहीशा जड पावलांनी ते उठले. नव्या संस्कृतीचा पाया रचण्याचे महत्कार्य त्यांना आता पार पाडायचे होते. 

त्यांच्या पावलांचा आवाज, त्या रिकाम्या सभाकक्षाला, मोठ्या परिवर्तनाची जाणीव करून देत होता.     

---------------------------------------

सहलेखक : विकास द. बापट आणि बिंग को-पायलट

=======================

अवांतर : 

मी इथे अधिक तांत्रिक गोष्टी टाकू शकलो असतो; पण मी ते जाणीवपूर्वक टाळले आहे. 

========================

=====

क्रमश: 

=====


मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५

युद्धार्थं : भाग ४



 =====================

युद्धार्थं : भाग ४  

=====================

काही सहस्र वर्षांपूर्वी

....

निवातकवचांच्या नगरीत हल्लकल्लोळ माजला होता. 

इतक्या कमी वेळात होत्याचे नव्हते होणे, हे युद्धात न उतरलेल्या, नगरातच निवास करणार्‍या अनेक ज्येष्ठ असुरांच्या पचनीच पडले नव्हते. आक्रंदणार्‍या स्त्रियांना, रडणार्‍या बालकांना धीर देण्याचे प्रयत्न, अनेकदा व्यर्थ ठरत होते. पुढची मार्गक्रमणा कशी करावी ह्या विषयीचा संभ्रम सार्वत्रिक होता. सर्वत्र एकच गोंधळाचे वातावरण होते. 

काही काळाने सावरलेले अनेक ज्येष्ठ दानव आणि युद्धाच्या ज्वरातून बाहेर पडलेले, प्रत्यक्ष युद्धात सहभाग नसलेले अनेक शहाणे दानव एकत्र आले. त्यांच्यातून एक नवीन सामुदायिक नेतृत्व उदयास आले. तीन कोटींवरून त्यांची संख्या, अवघ्या काही लाखांवर आली होती. त्यातही वृद्धांचे प्रमाण अधिक असल्याने, काही काळानंतर ती संख्या आणखी घटण्याची शक्यता होती. 

तरीही एक आशेचा किरण होता. प्रत्यक्ष युद्धात न उतरलेले, परंतु त्यांच्या नगरीसाठी, सुविधांसाठी , युद्धासाठी मागच्या फळीत काम करत असलेले बरेच अभियंते, वैज्ञानिक, तंत्रज्ञ व इतर क्षेत्रातील अनेक निवातकवच वाचले होते. त्यामुळे त्या विध्वंसानंतर, आवरण्याच्या आणि सावरण्याच्या प्रक्रियेचा आरंभ तात्काळ झाला. 

आघात आणि आक्रोशाचा पहिला भर ओसरल्यानतर काही काळाने, त्यांच्या नवीन सामुदायिक नेतृत्वाने दीर्घकाळ विचारविनिमय केला. अनेक पर्यायांवर खल झाला. शेवटी बहुमताने असे ठरले की ह्या उद्ध्वस्त झालेल्या नगराचे पुनर्निर्माण करण्यापेक्षा, अधिक सुरक्षित अशी एखादी जागा शोधून तिथे नव्याने आपली संस्कृती वसवावी. 

त्यांच्या नवीन नेतृत्वाच्या पुढे असणारी एक मोठी समस्या होती, लिंग गुणोत्तर (Gender Ratio). ते आता पूर्णपणे विस्कटले होते. त्या भीषण युद्धात, त्यांच्यातील पुरुष मोठ्या प्रमाणात मारले गेले होते आणि  मागे राहिलेल्या स्त्रियांची संख्या प्रचंड अधिक होती. ह्या समस्येवरचा उपाय, शक्य तितक्या लवकर शोधणे अत्यंत आवश्यक होते. 

आत्तापर्यंत त्यांनी जी सामाजिक व्यवस्था, अर्थव्यवस्था निर्माण केली होती, जोपासली होती; ती पूर्णपणे उन्मळून पडली होती. निदान सुरुवातीच्या काळात तरी, त्यांना एका संपूर्ण नव्या संरचनेची आवश्यकता होती. अशी संरचना जी सर्व प्रकारच्या आव्हानांना तोंड देऊ शकेलच, पण त्याचसोबत. त्यांच्या प्रजातीच्या अस्तित्वाला निर्माण झालेल्या आणि भविष्यात निर्माण होऊ शकतील, अशा सर्व संकटांचे निराकारणही करू शकेल. 

एकूणच, अगदी सामाजिक स्तरापासूनच, त्यांना त्यांच्या संपूर्ण संस्कृतीचा पाया नव्याने रचावा लागणार होता. नंतर त्याच पायावर, त्यांना त्यांची वैज्ञानिक प्रगती सुद्धा साधणे आवश्यक होते. 

स्वाभाविकच अनेक पर्यायी जागांचा शोध सुरू झाला, पण त्यावर नेतृत्वस्तरावरच  एकमत होत नव्हते.  

शेवटी नवीन नेतृत्वाने, त्यांच्यातील एका वैज्ञानिक गटावर अशी जागा शोधण्याचे दायित्व सोपविले. त्या गटाचा नेता होते'अमरारि'. 

अमरारि आता अतिशय वृद्ध झाले होते, पण निवातकवचांचे सागरातले साम्राज्य विस्तारताना, आवश्यक ते सर्व तंत्रज्ञान विकसित करताना, त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती.

ह्या युद्धापूर्वी, ते जेव्हां जेव्हां निवातकवचांचा इतिहास वाचत, तेव्हां प्रत्येक वेळी त्यांना खटकणारी एकच गोष्ट होती; ती म्हणजे  निव्वळ अहंकारापायी ,जुन्या शत्रुत्वाचा दाखला देत, इंद्राशी कायमस्वरुपी घेतलेले शत्रुत्व. देवांच्या स्वामित्वाखाली असणारे ते नगर बळकाविण्याची आस आणि त्यावेळी  तरुण असलेल्या अनेक असुरांची त्या वेळेची भूमिका, त्यांना तो इतिहास पुन्हा पुन्हा वाचूनही कधीच पटली नव्हती. पण त्यांच्यासारखा विचार करणार्‍या निवातकवचांची संख्या अत्यल्प होती

त्यात, देवांशी युद्धात जिंकलेले निवातकवच आणि त्यांचे नंतरच्या कित्येक पिढ्यांचे नेतृत्व आणि प्रजा, परंपरेने देवांवरील विजयाच्या उन्मादात जगत आले होते. त्यामुळेच कदाचित, त्यांनी त्या विषयावर कधीही ब्र सुद्धा काढला नव्हता. ह्या विषयात त्यांनी स्वत:च्या मनाला असा बांध घातला होता की त्यांच्या पूर्वायुष्यात सुद्धा कोणत्याही नेतृत्वाच्या, समूहाच्या कित्येक आततायी, आत्मघातकी निर्णयांच्या विरोधात जाण्याचे धैर्य, ते कधीच दाखवू शकले नव्हते. पण आता झालेला संहार आणि त्यातून उद्भवलेला त्याच्या संस्कृतीचा र्‍हास, त्यांच्या वृद्ध डोळ्यांना आणि त्यांच्या उद्विग्न मनाला टोकाचा खुपत होता. 

एका अर्थाने, नियतीने त्यांच्यावर पुन्हा तेच दायित्व टाकले होते. पण आता परिस्थिती अशी होती, की एकेकाळी जे धैर्य ते दाखवू शकले नव्हते, ते धैर्यच आता निवातकवचांच्या भविष्याचा पाया ठरणार होते. 

विध्वंसातून वाचलेल्या एका कक्षात, अमरारिंनी त्या वैज्ञानिकांच्या गटास चर्चेसाठी एकत्र आणले. त्या कक्षातील वातावरणात असह्य तणाव होता. अमरारिंना तो तणाव जाणवत होता. झुकलेले खांदे, गंभीर, तणावग्रस्त मुद्रा, भविष्याच्या चिंतेने होणार्‍या अस्वस्थ हालचाली, तर काही चेहर्‍यांवर निर्धार अशा खुणा कमीअधिक प्रमाणात, तिथे जमलेल्या सर्वांच्यात दिसत होत्या.  

हिरवट-निळसर प्रकाशाने न्हालेल्या त्या प्राचीन कक्षात, एका मेजाभोवती तो गट बसला होता. अमरारि मुख्य आसनावर बसले होते. मेजावर मध्यभागी असलेला आणि त्यांच्याच एका शोधाचे फलित असलेला एक उर्जागोलक, त्या मेजावर पुरेसा प्रकाश पुरवत होता. 

ही सभा त्यांच्या संस्कृतीच्या नव्या प्रवासाची पहिली पायरी ठरणार होती. त्यामुळेच कदाचित चर्चेला आरंभ करताना, त्यांनी ह्यापुढे कुठल्याही प्रकारचा अंतर्गत संघर्ष टाळण्याची भूमिका मांडली. त्यांच्या विचारांशी सर्व सहमत आहेत, ह्याचा प्रत्यय त्यांना इतरांच्या चेहर्‍यावरील भाव पाहून आला. 

मग त्यांच्या आठवणीत खोलवर गेलेला आणि त्यांच्या मनात अनेक वर्षे सुप्त अवस्थेत राहिलेला प्रस्ताव त्यांनी मांडला : 

"माझ्या मते, निदान निकटच्या भविष्यकाळात तरी, केवळ अंतर्गतच नव्हे, तर आपल्याला अन्य कुणाशीही कुठलाही संघर्ष करावा लागू नये, अशा पद्धतीने आपण योजना आखली पाहिजे ." 

ते क्षणभर थांबले, तोवर अनेक माना डोलल्या होत्या. " त्यामुळे कुठल्याही देवांशी, इतर दानव संस्कृतींशी, असुरांशी, मानवाशी वा इतर दिव्य योनिजांशी, कोणताही संघर्ष टाळण्यासाठी, नव्या नगरीसाठी असे स्थान निवडावे की ज्याचा शोध कुणालाही लागू नये आणि कुणालाही आपल्या नगरीमुळे उपद्रवही होऊ नये. ह्या पृथग्वासाविषयी (self-isolation) मी नव्या नेतृत्वाशी ओझरते बोललो होतो, त्यांनी हा प्रस्ताव तुमच्यासमोर मांडण्याचे सुचवले, त्यामुळे तुम्हां सर्वांना मान्य असेल, तरच ही गोष्ट पुढे जाईल."

भीषण विध्वंसाच्या पार्श्र्वभूमीवर, त्या गटातील सर्वांचा ह्या प्रस्तावाला विरोध असण्याचे काही कारणच नव्हते. त्यामुळे तो प्रस्ताव तात्काळ मान्य झाला. मात्र चर्चेच्या ओघात अमरारिंच्या असे लक्षात आले की सुरुवात कुठून करावी, कशी करावी, नवीन नगर कुठे वसवावे  ह्या विषयांवरून  काही मतभेद आहेत. 

ही चर्चा सुरू असतानाच, त्या गटातील एक तरुण स्त्री वैज्ञानिक अतिशय अस्वस्थ दिसत होती. तिचे हात नकळत एकमेकांत गुंतले होते आणि ते ती सारखे हलवत होती. तिला काहीतरी बोलायचे होते, पण इतके सर्व ज्येष्ठ आपापले विचार मांडत असताना, बोलावे की न बोलावे ह्या संभ्रमात असल्यासारख्या, तिच्या हालचाली होत होत्या. तिची अस्वस्थता ताडून अमरारि तिला म्हणाले "महाधी, तुला काही बोलायचे असल्यास, नि:संकोच बोल."

प्रत्यक्ष अमरारिंचे पाठबळ मिळाल्यावर ती काहीशी शांत झाली आणि ठामपणे तिने स्वत:ची मते मांडण्यास सुरुवात केली.:

"आपल्याला, आपल्या सध्याच्या नगरीपासून जवळचे स्थान शोधणे आवश्यक आहे. अन्यथा नवीन नगरीचे स्थान दूर असल्यास, उरलेल्या सर्व मणिमतीवासियांचे स्थलांतर करण्याचा अधिक भार आपल्यावर पडेल. सध्यातरी अशा प्रकारचे स्थलांतर, आपल्याकडे शेष असलेल्या वाहनांसाठी, यंत्रसामग्रीसाठी आणि इंधनासाठी अतिरिक्त भार ठरेल. शिवाय ह्या स्थलांतराची कोणतीही सूचना इंद्राला मिळाली वा नवीन वसतीस्थान इंद्राला समजले; तर आपल्या अस्तित्वावर पुन्हा एकदा नवीन संकट ओढवण्याची शक्यता आहे."

"तुझे म्हणणे योग्य आहे, पण असे स्थान आपल्या निकटच शोधणे; म्हणजे सुद्धा आणखी एका आक्रमणाची शक्यता वाढविणे नाही का ?" त्यांच्यातील अन्य एक ज्येष्ठ वैज्ञानिक 'विचक' म्हणाले. 

कुठलाही प्रयोगातून निष्कर्ष काढताना प्रत्येक गोष्ट, पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या निकषांवर तपासून घेणे, ही विचक ह्यांची जुनी सवय होती. त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चेतही त्यांची सवय डोकावणे, अस्वाभाविक नव्हते. अमरारिंना त्यांची ही सवय व्यवस्थित माहीत असल्याने, अमरारिंच्या मुखावर किंचित हास्य उमटले.  

"अर्थातच." आता उत्तर देताना महाधीच्या चेहर्‍यावर आत्मविश्वास दिसत होता. 

"म्हणूनच मी एक वेगळा उपाय सुचवत आहे. त्या इंद्रपुत्राने, त्याचे शेवटचे अस्त्र वापरल्यानंतर, आपल्या नगरीच्या पूर्वेला, समुद्रतळात एक अवाढव्य आणि खोल विवर निर्माण झाले आहे (६). तिथून सुरुवातीस बराच भू-रस बाहेर आला, पण तो आता थांबला आहे. त्या विवरात खोलवर आपण सहन करू शकणार नाही, असे तापमान असेल, त्यामुळे तिथे आपण राहू शकणार नाही."

"आपण जर त्या विवरात शिरून, एका ठराविक उंचीवर भुयारी मार्ग खणले, तर तिथे अनेक गुंफा आपण निर्माण करू शकतो. भविष्यकाळातही आवश्यकतेनुसार,आपण त्या भुयारी  मार्गांची आणि गुंफांची संख्या आणि भुयारी मार्गांची लांबी वाढवत नेऊ शकतो. त्या भुयारांमधील तापमान नियंत्रित करणे आपल्याला शक्य आहे. शिवाय, त्या भुयारी मार्गांमधून बाहेर येण्यासाठी, अन्य ठिकाणी सुद्धा मार्ग निर्माण करता येतील. आवश्यकतेनुसार आपल्याला राहण्यासाठीच्या गुंफा आणि विविध कामांसाठीची भुयारे व गुंफा वेगवेगळ्या स्तरावर ठेवता येतीलच, पण त्यांची क्षमता आणि सुरक्षाव्यवस्था सुद्धा वेगवेगळी ठेवता येईल. जेणेकरून भविष्यकाळात एखाद्या गुंफेत वा भुयारीमार्गात काही दुर्घटना घडली, तरीही इतर भुयारांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहणार नाही." 

" त्यातून कालांतराने निकटच्या समुद्रतळावरही, आपण राहू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली; तर आपण पुन्हा नव्याने विचार करू शकतो."

.... 

महाधी बोलायची थांबली आणि त्या कक्षात  प्रगाढ शांतता पसरली. विवराच्या आतमध्ये, विवराशी काटकोनात असणारी भुयारे आणि त्यात असणाऱ्या गुंफा सुरक्षितता आणि गुप्ततेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार होत्या; हे सर्वांच्याच लक्षात आले. शिवाय आवश्यकतेनुसार त्यांची क्षमता वाढवत नेता येणार होती. शिवाय अशी भुयारे निर्माण करण्यासाठी, आवश्यक असणारे तंत्रज्ञान आणि यंत्रे त्यांच्याकडे आधीपासूनच होती. त्यामुळे निकटच्या काळात कुठे लपायचे, हा प्रश्नही तुलनेने सोपा झाला होता. 

अमरारिंनी सर्व कक्षात त्यांची दृष्टी फिरवली. अनेक चेहर्‍यांवरचा ताण निवळला आहे, असे त्यांना जाणवले. "मला वाटते, सद्यपरिस्थितीत हा सर्वात सोपा आणि उत्तम उपाय आहे, कुणाला ह्या पेक्षा अधिक चांगला पर्याय  सुचतो आहे का ? किंवा ह्या पर्यायात काही त्रुटी दिसत आहेत का ?" 

"होय." पुन्हा एकदा विचक म्हणाले, त्यांच्या डोक्यातील शंकासुर त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. "आपण जितके खोलवर जाऊ, तितका आपल्या शरीरावरचा दाब वाढत जाणार आहे, शिवाय तिथल्या पाण्यात, आपल्या नगराभोवती असणार्‍या पाण्यापेक्षा अधिक क्षारद्रव्ये असतील, त्यांचा प्रभाव आपण कसा कमी करणार आहोत ? शिवाय नगर-उभारणीसाठी जी काही सामग्री लागेल, ती आपल्याला इतरत्र शोधून, तिथे वाहून न्यावी लागेल."

त्यांचे आक्षेप ऐकून अमरारिंच्या चेहेर्‍यावर थोडे गंभीर भाव आले आणि त्यांनी शांतपणे बोलण्यास सुरुवात केली :

"ह्या गोष्टीवर मी ह्या आधीही  विचार केला होता आणि ह्या संदर्भात नवीन नेतृत्वाशी माझा सविस्तर संवाद झाला आहे. त्यांनी कुठलाही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मला दिले आहे. पण आपणा सर्वांना आपापल्या क्षेत्रात दीर्घकाळाचा अनुभव आहे. त्यामुळे ह्या पुढचे माझे कथन तुम्ही सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐकावे; त्यावर विचार करावा, असे माझे तुम्हा सर्वांना आवाहन आहे. आपण सर्वांनी एक गोष्ट ध्यानात ठेवायला हवी की सध्याचे शीर्षस्थ प्राधान्य तगण्याला आहे, पूर्वीच्याच पद्धतीने जगण्याला नाही. "

अमरारि अतिशय सावकाश आणि काही शब्दांवर विशेष आघात करत बोलत होते. "आपण तगून राहिलो तरच आपण पुन्हा वाढू. जशी आपली संख्या वाढेल, तसतसे आपले बळ वाढेल; आणि जसजसे बळ वाढेल, तसतशी आपली क्षमताही वाढेल. मग अनेक गोष्टी साध्य होऊ शकतील."

अमरारि एक क्षणभर बोलायचे थांबले आणि मग एक दीर्घ श्वास घेऊन त्यांनी पुन्हा बोलण्यास सुरुवात केली :  

"एक गोष्ट आपण सर्वांनी स्वत:च्या मनात बिंबवणे आवश्यक आहे की आपले जीवन आता पूर्वीसारखे होणे, अत्यंत अवघड आहे. त्या अस्त्राच्या किरणोत्सर्गाचे परिणाम, आपल्या सर्वांच्या शरीरावर तर होणारच आहेत, पण ते आपल्या पुढील पिढ्यांमध्ये सुद्धा उतरतील. त्यामुळे काही पिढ्यांनंतर आपले शरीर पूर्वीसारखे राहणार नाही. तसेच आपली संरक्षित नगरी उद्ध्वस्त झाली आहे, आणि तशीच्या तशी पुन्हा उभारणे, आणखी काही शतके आपल्याला शक्य होणार नाही. हे सत्य आपण जितक्या लवकर स्वीकारू तितके बरे."

"समुद्रतळावर स्वतंत्र निवासस्थाने उभारून राहण्यापेक्षा, महाधीने सुचविलेला उपाय अधिक सुरक्षित आहे आणि सद्यपरिस्थितीत तो उत्तम मार्ग आहे. पण तरीही तो उपायही  आपल्यात होणारे बदल टाळण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे मला वाटत नाही. प्रत्येक नव्या पिढीत, आपल्या शरीररचनेत सूक्ष्म बदल होत जाणार आहेत आणि आपल्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी ही उत्क्रांती स्वीकारणे, क्रमप्राप्त आहे."

"मी आधी सांगितले त्याप्रमाणे, मी नवीन नेतृत्वाला ह्या अटळ उत्क्रांती संदर्भातही पूर्ण कल्पना दिली आहे आणि त्यांनी ही गोष्ट स्वीकारली आहे. पण आपण आत्ता ही गोष्ट ह्या कक्षात उपस्थित असणार्‍यांपुरतीच ठेवणार आहोत. उर्वरित जनतेवर आणखी एक आघात होऊ नये असे नेतृत्वाला आणि मलाही वाटते. आपण सर्व अतिशय ज्ञानी आहात, तेव्हां मी जे सांगतो आहे, त्यावर खोलवर विचार केलात तर तुम्हा सर्वांना ही गोष्ट पटेल, अशी आशा आहे." 

इतके बोलून अमरारि थांबले, तोपर्यंत अनेकांच्या माना होकारार्थी डोलल्या होत्या. काही जण अतिशय गंभीर झाले होते. पण परिस्थितीने ओढवलेली असहाय्यता, त्यांनी निरुपायाने का होईना, स्वीकारली होती;  हे उशिरा आलेल्या त्यांच्या प्रतिक्रियांवरून अमरारिंच्या उमगले.

"तर मग आता महाधीच्या सूचनेनुसार, सविस्तर आराखडा आणि वेळापत्रक, शक्य तितक्या लवकर आपण आखणार आहोत." इतके बोलून अमरारिंनी ती सभा संपल्याचे घोषित केले. 

आराखडा ठरवला तरी त्याचे कार्यान्वयन (Implementation) ही वेगळी गोष्ट आहे. प्रत्यक्ष कार्यवाही करताना कोणत्या कोणत्या समस्या येऊ शकतील, ह्या विचाराने अमरारिच्या चेहर्‍यावर पुन्हा तणाव आला.....    

---------------------------------------

सहलेखक : विकास द. बापट आणि बिंग को-पायलट

=======================

अवांतर : 

(६) हे विवर एकाद्या समुदगर्तेसारखे (Trench) सारखे असावे, असा विचार मी केला होता. पण निदान ह्या कथेपुरता विवर हा शब्द वापरण्यास अधिक सोपा आहे. 

शंकासुरांसाठी विशेष टीप : 

ह्या कथेद्वारे, निवातकवचांचे उदात्तीकरण करण्याचा कोणताही हेतू नाही वा तसा प्रयत्नही मी करत नाही आहे. प्रचंड विध्वंसानंतर झालेली स्वाभाविक प्रतिक्रिया, ह्या दृष्टीने ह्या भागाकडे पाहावे. 

आढ्याचे पाणी शेवटी वळचणीलाच जातेच. 

========================

=====

क्रमश: 

=====

सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

युद्धार्थं : भाग ३

 



=====================

युद्धार्थं : भाग ३  

=====================

काही सहस्र वर्षांपूर्वी

....

परतीच्या प्रवासात अर्जुनाला काहीतरी अत्यंत तेजस्वी, प्रकाशमान अशी गोष्ट दिसली. 

हे काय आहे असे तो मातलीला विचारणार तोच त्याच्या दिसले की ते एक विशाल नगर आहे आणि ते अवकाशात भ्रमण करत आहे. 

त्या नगराकडे अर्जुनाचे लक्ष  खिळलेले पाहून, मातलीने त्या नगराचा इतिहास अर्जुनाला सांगितला. 

मातलीने त्याला सांगितले की पुलोमा आणि कालकी ह्या दोन असुर स्त्रियांनी दीर्घकाळ तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून ते नगर प्राप्त केले आणि  असा वर मागितला की त्यांच्या पुत्रांना देव, राक्षस आणि सर्पलोकातील कुणीही मारू शकणार नाही वा दु:खही  देऊ शकणार नाही. त्यांनी  ब्रह्मदेवांकडे असेही मागितले की त्यांचे नगर अतिशय रमणीय असेल आणि ते विविध रत्नांनी परिपूर्ण असेल, समृद्ध असेल. तसेच ते आकाशगामी असेल, अर्थात आकाशातच भ्रमण करेल आणि ह्या नगराचा नाश कोणतेही  देव-देवता, यक्ष, गंधर्व, सर्प, राक्षस वा अन्य असुर, ह्यापैकी कुणीही करू शकणार नाही. (४) 

तेव्हां ब्रह्मदेवांनी त्यांच्या इच्छेनुरुप  सर्व गुणांनी युक्त, समृद्ध, रोगरहित असे आकाशगामी नगर त्यांना दिले. त्या नगराचे नाव हिरण्यपूर असे होते आणि तिथे देवांना प्रवेश वर्ज्य होता. कालकेय आणि पौलोम नामक असुर त्या नगराचे रक्षणकर्ते होते. 

मातली म्हणाला "फार पूर्वीच ब्रह्मदेवांनी, एका मानवाच्या हातून ह्या नगराचा विनाश होईल असे योजले होते. त्यामुळे तू वज्रास्त्राचा पुनश्च उपयोग कर आणि  ह्या नगराचा विनाश कर."

मातलीकडून त्या नगराचा इतिहास जाणल्यानंतर, अर्जुनाने मातलीस त्यांच्या रथास त्या नगराकडे नेण्यास सांगितले. मग अर्जुन मातलीला म्हणाला "माझ्याकडील अस्त्रांचा उपयोग करून, देवांचा द्वेष करणार्‍या त्या पापी असुरांचा आणि हिरण्यपूराचा, मी आता विनाश करेन. 

मातलीने त्यांच्या रथास हिरण्यपुराच्या जवळ नेताच त्या असुरांची एक सेना विचित्र वस्त्रे, आभूषणे आणि शरीरकवचे परिधान करून, विविध रथात बसून युद्धासाठी सज्ज झाली. अत्यंत वेगाने त्यांनी अर्जुनावर त्यांच्या विविध शस्त्रांचा मारा सुरू केला. त्यावेळी अर्जुनाने त्याची सर्व शस्त्रविद्या, अस्त्रविद्या वापरत, सतत रथाला फिरता ठेवत, बाणांचा वर्षाव करत आणि त्यायोगे त्या असुरांना भ्रमित करत लढण्यास प्रारंभ केला. त्यामुळे कुंठीत आणि भ्रमित झालेले ते असुर परस्परांशीच लढू लागले आणि अर्जुनाच्या बाणांचेही लक्ष्य होऊ लागले. 

जेव्हां त्या असुरांच्या लक्षात आले की ह्या युद्धात आपली बरीच हानी होत आहे, तेव्हां त्या असुरांनी पुन्हा त्यांच्या नगरात प्रवेश केला. तदनंतर त्यांची माया वापरून त्या नगराचे कधी भूमीवर, कधी समुद्रात तर कधी आकाशात असे भ्रमण होऊ लागले. ते कधी सरळ उडत होते तर कधी तिरके होऊन उडत होते. तेव्हां अर्जुनाने अनेक अस्त्रांचा वापर करून, त्या नगराचा मार्गच पूर्णपणे रोखला, तसेच त्याचे आकाशातील भ्रमणही थांबवले. अशा रितीने ते नगर एका जागी कुंठित झाल्यावर, अर्जुनाने दिव्यास्त्रांचा वापर करून, त्या नगरावर असे प्रहार केले की अंतिमत: ते नगर भग्न होऊन पृथ्वीवर कोसळले. 

ते नगर पृथ्वीवर कोसळताच, मातलीने त्यांच्या रथास अत्यंत वेगाने पृथ्वीतलावर आणले आणि त्यांच्या कोसळलेल्या नगरासमोर उभे केले. अर्जुनाला असे दिसले की त्या असुरांची एक विशाल कवचधारी सेना, त्याच्याशी लढण्यासाठी पूर्णपणे सिद्ध आहे. त्यांचे मुकुट,कवच आणि ध्वज अतिशय विचित्र होते. त्यावेळी अर्जुनाला वाटले की सामान्य अस्त्रांचा वापर करून ह्यांचा पराभव अशक्य आहे, तेव्हां अर्जुनाने क्रमक्रमाने अत्यंत तेजस्वी दिव्यास्त्रांचा वापर करत, त्यांच्यावर आक्रमण करण्यास आरंभ केला. पण काही वेळाने अर्जुनाने ताडले की ते असुर युद्धकलेत अतिशय कुशल आहेत आणि ते अस्त्रविद्येतही निपुण आहेत. अर्जुनाला वाटले की हे युद्ध असेच सुरू राहिले तर कदाचित आपलाच पराभव होण्याची शक्यता आहे. 

तेव्हां अर्जुनाने रुद्राचे स्मरण करून, जगाच्या कल्याणासाठी साह्यभूत होण्यासाठी, त्याची प्रार्थना केली आणि रुद्रास्त्र नामक एका घोर दिव्यास्त्राला, त्याच्या धनुष्यावर बाण चढवून आवाहन केले. (५) 

त्या अस्त्राला बाणावर अभिमंत्रित करताच, तीन मस्तके, तीन मुखे, नऊ डोळे, सहा भुजा असलेला आणि अग्निप्रमाणे प्रदीप्त शिरोभाग असणारा व सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेला, लपलपत्या जिभेचा एक महानाग अर्जुनाच्या दृष्टीस पडला. ते पाहताच अर्जुनाने त्रिनेत्र महादेवाचे स्मरण करत आणि समस्त असुरसेनेचा विनाश करण्याचा संकल्प करत, ते अस्त्र असुरसेनेवर सोडले. 

त्या अस्त्रप्रयोगानंतर अगणित चित्रविचित्र प्राणी आणि राक्षस निर्माण झाले आणि त्या असुरसेनेचा वध करू लागले. त्याचवेळी अर्जुनाने त्याच्या धनुष्यावरूनही बाणांचा वर्षाव केला. एकत्रितरित्या होणार्‍या ह्या सर्व आक्रमणामुळे, भूमीवरील तसेच आकाशगामी असलेले असंख्य असुर नष्ट झाले आणि भूमीवर कोसळले. 

केवळ एका अस्त्रप्रयोगाने, भूमीवर कोसळणारे आकाशगामी असुर आणि त्या असुरसेनेचा विनाश पाहून, स्तिमित झालेल्या अर्जुनाने पुन्हा एकदा, त्रिपुरांतक महादेवांना मनोमन वंदन केले. त्या असुरसेनेचा विनाश होताच असंख्य स्त्रिया विलाप करत त्या भग्न झालेल्या नगरातून बाहेर आल्या आणि ज्यांचे पती,पुत्र,पिता मारले गेले होते त्यांच्यासाठी त्या शोक करू लागल्या. 

त्या दोन्ही युद्धातील अर्जुनाचा पराक्रम पाहून हर्षित झालेल्या मातलीने अर्जुनाची सुयोग्य स्तुती केली.  

नंतर अर्जुनाला प्रसन्नचित्त पाहून मातलीने त्यांच्या रथास तात्काळ इंद्रलोकाच्या दिशेने नेले. इंद्रलोकात परतल्यावर दोन्ही युद्धांचा संपूर्ण वृत्तांत मातलीने इंद्रदेवांना कथन केला. तेव्हां इंद्रदेवांनी सुद्धा अर्जुनाची विविध प्रकाराने प्रशंसा केली. त्याचवेळी त्यांनी अर्जुनाला असेही सांगितले की ह्या पुढे होणार्‍या युद्धांमध्ये ह्या अस्त्रांचा प्रयोग, अत्यंत सावध राहून आणि स्थिरबुद्धीने करायचा आहे, हे तुझा चित्तात सदैव राहो. 

त्यानंतर अर्जुनाने काही काळ इंद्रलोकात व्यतीत केला. पण अर्जुन देहाने इंद्रलोकात वावरत असला तरी त्याचे मन परतीच्या प्रवासाचा विचार करत आहे, हे इंद्रदेवांनी ताडले. तो स्वत:हून विचारत नसल्याने, त्यांनी अर्जुनाला सांगितले की आता त्याने  पृथ्वीवर परतावे. पडत्या फळाची आज्ञा घेत, अर्जुन इंद्रदेवांच्या  रथात बसून, वनात राहणार्‍या आपल्या भावांकडे परतला. 

अर्जुनाने इंद्रलोकात आणि युद्धात जो काळ व्यतीत केला, त्या काळात पृथ्वीवर उणीपुरी पाच वर्षे लोटली होती ! 

---------------------------------------

सहलेखक : विकास द. बापट आणि बिंग को-पायलट

=======================

अवांतर : 

(४)

विज्ञानात, तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीच्या पार्श्वभूमीवर, जलाधिष्ठित नगरे किंवा आकाशगामी नगरे ह्या केवळ कल्पनांच्या भरार्‍या आहेत, असे मानण्याचे कोणतेही कारण मला दिसत नाही.  

माझ्या vidnyansrushti ह्या ब्लॉग मधल्या एका लेखांकात मी लिहिलेले एक वाक्य इथे पुनश्च उद्धृत करत आहे. 'विज्ञानाचा आणि पर्यायाने तंत्रज्ञानाचा उगम, विकास, वापर व लोप ही वारंवार घडणारी प्रक्रिया आहे.' 

अव्याहतपणे चालणार्‍या ह्या चक्रीय प्रगतीचा आणि तदनंतरच्या विनाशाचा उद्देश, सध्या आपल्याला ज्ञात नाही; म्हणजे तसे काही अस्तित्वातच नाही, असे ठामपणे मानणे वा ठासून सांगणे, हे एकाप्रकारे मानवी बुद्धीचे औद्धत्य आहे.  शिवाय, ह्या चक्रीय आवर्तनाच्या विविध टप्प्यांवर, दरवेळेस उलगडलेले, ज्ञात झालेले विज्ञानच जर  भिन्नभिन्न असू शकते, तर शोधले गेलेले, ज्ञात झालेले तंत्रज्ञान वेगवेगळे असणे, ही काही फारशी अचंबित करणारी गोष्ट ठरू नये.

(५) साध्याशा दिसणार्‍या बाणाने इतके प्रचंड परिणाम करणारे अस्त्र कसे काय असू शकते, हा प्रश्न प्रचंड वेगाने होत असलेल्या तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे खरंतर संपुष्टातच आला आहे; आणखी काही शतकांनी तर असा प्रश्न निव्वळ अज्ञानमूलक ठरण्याचा संभव आहे. 

Voice Activated Weapons (वाण्युत्प्रेरितास्त्रे ?)  ही आजच्या तंत्रज्ञानाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट नाही. Neural Interface for Weapon Activation (or Thought Activated Weapons) (चेतोत्प्रेरितास्त्रे ?/ मानसोत्प्रेरितास्त्रे ?) चे तंत्रज्ञान सुद्धा काही दशकात प्रत्यक्षात येईल, अशी चिन्हे आहेत. निसर्गाच्या शक्तींना, पंचमहाभूतांच्या अविष्कारांना,  आपण आपल्या कामासाठी आजही वापरतो. 

पोलादी पटलामागे विकसित झालेल्या आणि वापरण्याजोग्या असलेल्या काही पंचमहाभूताधारित शस्त्रांची माहिती ,पुरेसा आणि योग्य दिशेने शोध घेतला तर, अर्धवट स्वरुपात का होईना, पण मिळू शकते. आज त्या पंचमहाभूतांच्या मानवनिर्मित अविष्कारांमध्ये  कदाचित पुरेशी अचूकता नसेल, त्यांचे परिणाम आज कदाचित अनियंत्रित असतील, पण निकटच्या काळात नियंत्रण आणि वर्धनक्षमता (Scalability) ह्या दोन्ही गोष्टी साध्य होतील, ह्यात मला तरी शंका वाटत नाही. 

पण मूळ प्रश्न, केवळ त्या अस्त्रांची क्षमता साध्य करणे हा नसून, रामायण, महाभारत आणि इतर तत्सम पुराणैतिहासिक ग्रंथातून त्या अस्त्रांचा वापर करण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचा आणि कुणाच्या हाती त्या अस्त्रांचे नियंत्रण असावे, ह्याची पात्रता ठरविण्याचा अधिक आहे. 

ह्या वा तत्सम ग्रंथांमधून, जेव्हां ह्या अस्त्रांच्या हस्तांतरणाचे उल्लेख येतात, तेव्हां ज्याला हस्तांतरण करायचे आहे, त्याची पात्रता तर जोखली जातेच; पण हस्तांतरण करताना आणि नंतरही बहुसंख्य वेळा त्या अस्त्रासंबंधीचे नियम,संयम ह्यांचा उल्लेख स्पष्टपणे दिसतो. क्वचितप्रसंगी अस्त्रांचा नियमापलिकडे जाणारा अयोग्य प्रयोग हा दंडास,शिक्षेस, शापास कारणीभूत ठरल्याचे उल्लेखही आढळतील. मात्र इंद्रलोकातून परतल्यावर, अर्जुनाने त्याच्या भावांसमोर सादर केलेली अस्त्रविद्येची  प्रात्यक्षिके, केवळ चेतावणीवर (पर्यायाने केवळ कानउघाडणीवर) निभावल्याचा उल्लेख आहे. 

दुर्दैवाने,आज ह्या नैतिक चौकटींचाच अभाव असल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. अशावेळी केवळ निरीक्षणाच्या भूमिकेत राहू इच्छिणार्‍या; काही 'अमानवी' (आणि कदाचित पृथ्वीहितैषी) शक्तींचे लक्ष तिथे वेधले जाईल, ही शक्यता कुठल्या आधारावर नाकारावी ? 

========================

=====

क्रमश: 

=====

रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

युद्धार्थं : भाग २

 



=====================

युद्धार्थं : भाग २  

=====================

अकस्मात रथाने दिशा बदलली आणि समुद्राकडे बघण्यात दंग असलेला अर्जुन सावध झाला. मणिमती आता निकट होती.


मातलीने तो रथ अधरदिशेने नेण्यास आरंभ केला.

आता थोड्याच वेळात निवातकवचांची निवासस्थाने दृष्टीस पडतील हे जाणून युद्धघोष करण्यासाठी अर्जुनाने त्याचा देवदत्त शंख वाजवला. तो प्रचंड शंखध्वनी आकाशात गुंजला. त्या शंखध्वनींची कंपने समुद्रातही पोहोचल्यामुळे, समुद्रातील कित्येक जलचर भयभीत होऊन स्तब्ध झाले; काही शक्य होईल तिथे लपले. 

मातलीने रथाचा वेग वाढवला आणि तो थेट मणिमती नगरीच्या दिशेने समुद्रात झेपावला. रथाच्या गडगडाटी ध्वनीने संपूर्ण मणिमती दुमदुमली. आकाशातील विजेच्या कडकडाटासारखा तो आवाज ऐकून दानवांना वाटले — स्वतः इंद्रदेवच युद्धासाठी आले आहेत! क्षणभर ते उद्विग्न झाले, भयभीतही झाले.

तरीही विविध शस्त्रे हातात घेऊन, ते दानव प्रतिकारासाठी सिद्ध झाले. घाईघाईत त्यांनी मणिमतीची मुख्य द्वारे बंद केली; जेणेकरून कोणीही आतले काहीही पाहू शकणार नाही.

त्याचवेळी विविध शस्त्रांनी सज्ज होऊन आणि नाना प्रकारची स्वसंरक्षणाची साधने धारण करून, मणिमतीची दारे उघडून असंख्य निवातकवच बाहेर आले. ते पाहून मातलीने रथ इतक्या वेगाने आणि अशा प्रकारे हाकला की, रथाची दिशा आणि त्याची गती ह्याबाबत शत्रुसैन्यात संभ्रम निर्मण झाला. 

अतिशय विकृत स्वर आणि रुप असलेल्या निवातकवचांच्या योद्ध्यांचे असंख्य समूह तिथे उत्तेजित होऊन आरोळ्या ठोकू लागले. त्यांचा एकत्रित कलकलाट इतका भीषण होता की त्या कलकलाटांच्या कंपनांनी, समुद्रतळ जणु ढवळून निघाला. समुद्रातील विशालकाय मासे देखील अतिशय वेगाने पोहू लागले, उसळू लागले. 

काही क्षणातच तीक्ष्ण बाणांचा वर्षाव करत असंख्य निवातकवच अर्जुनाच्या  दिशेने धावले. अर्जुनाने चोख प्रत्युत्तर दिले. अर्जुनाच्या  बाणांनी अनेक निवातकवच मृत्युमुखी पडू लागले, तेव्हां निवातकवचांमधील अनेक महारथींनी अर्जुनाच्या रथाला घेरले आणि विविध शस्त्रांनी त्याच्यावर प्रहार केले. धनुर्विद्येतील सर्व कौशल्य पणाला लावून, अर्जुनाने त्या सर्वांचा यशस्वी प्रतिकार केला आणि अल्पावधीतच त्यांचे आक्रमण मोडून काढले. 

मातली हा अत्यंत कुशल सारथी होता. इंद्रदेवांच्या त्या रथाला, सर्वदिशांना प्रवास करण्यासाठी सहस्त्रावधी गती होत्या आणि तरीही मातली तो रथ उत्तमप्रकारे नियंत्रित करत होता. त्याने रथाला विविध दिशांना फिरविले; त्या भ्रमणामुळे, तसेच रथाचा प्रभावक्षेत्रात येऊन अनेक निवातकवचांचा नाश झाला. 

ते घनघोर युद्ध बराच काळ आणि वेगवेगळ्या स्तरावर सुरू राहिले (२). 

अर्जुनाला त्याच्या धनुविद्येतील कौशल्यांसोबत, नुकत्याच प्राप्त झालेल्या अस्त्रविद्या सुद्धा वेळोवेळी वापराव्या लागल्या. तरीही, अधूनमधून असे प्रसंग येत की अर्जुन चहूबाजूंनी निवातकवचांकडून घेरला जात असे; पण अशा प्रत्येक प्रसंगी  मातलीने रथसारथ्यातील कौशल्य पणाला लावून, अर्जुनाचे रक्षण केले. 

निवातकवचांना अदृश्य होणे, भूमीखाली दडणे आणि आकाशगमन करणे आदि तंत्रविद्या अवगत होत्या. त्यामुळे अनेकदा, अर्जुनाला त्यांच्याशी लढणे कठीण जात होते. विशेषत: जेव्हां निवातकवचांनी विविध मार्गांनी 'मायायुद्ध' आरंभ केले, तेव्हां अस्त्रविद्येतील सर्व आयुधे वापरूनही विजय मिळविणे कठीण वाटू लागले. 

अखेर, निवातकवचांच्या संपूर्ण सैन्याचा एकाच वेळी नाश करण्यासाठी, मातलीने अर्जुनाला इंद्रवज्र वापरण्याची सूचना केली. तो वज्रप्रहार होताच निवातकवचांची सर्व माया एकाएकी नष्ट झाली आणि असंख्य निवातकवच खाली कोसळले. 

निवातकवचांच्या त्या महाविनाशासह, युद्ध संपुष्टात आले तेव्हां, त्या रणभूमीवर सर्वत्र शवांचा,आयुधांचा,उद्ध्वस्त रथांचा खच पडला होता. 

अर्जुनाने इंद्रदेवांच्या रथात बसूनच, मणिमती नगरात प्रवेश केला. त्याला निवातकवचांच्या अनेक स्त्रिया आक्रंदून रडताना दिसल्या. शोक, विलाप करणार्‍या त्या स्त्रियांना ज्या क्षणी अर्जुनाचा रथ दिसे; त्या क्षणाला त्या सर्व स्त्रिया आपापल्या रत्नजडित घराच्या दिशेने धाव घेत.  

त्या अद्भुत नगराला पाहून अर्जुनाने मातलीला विचारले की "ह्या नगरात देव का राहत नाहीत ?" 

त्यावर मातलीने पूर्ण घटनाक्रम सांगितला — फार पूर्वी मणिमतीवर देवांचेच स्वामित्व होते. मात्र निवातकवचांनी तपश्चर्येच्या माध्यमातून, ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि देवांशी होणार्‍या प्रत्येक युद्धात अजेय असण्याचा वर मिळवला. त्या नंतर  देवांना पराभूत करून त्यांनी मणिमती बळकावली. स्वाभाविकच व्यथित झालेल्या इंद्रदेवांनी ब्रह्मलोकी जाऊन, निवातकवचांना पराभूत करण्यासाठी उपाय विचारला. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले की तुझे दुसरे रुप असणारा कुणीतरी, निवातकवचांचा पराभव करेल. 

हा कथाभाग सांगून मातली अर्जुनाला म्हणाला "म्हणूनच इंद्राने तुला सर्व शस्त्रास्त्रे देऊन, त्याच्यासारखे रूप देऊन  आणि स्पष्टपणे उद्दिष्ट सांगून इथे पाठविले." (३) 

इंद्रलोकात परतण्यासाठी रथाने जेव्हां झेप घेतली, तेव्हां अर्जुनाचे मनात अनेक विचार आणि प्रश्न थैमान घालत होते....

---------------------------------------

सहलेखक : विकास द. बापट आणि बिंग को-पायलट

=======================

अवांतर : 

(२) ह्या युद्धाचे सविस्तर वर्णन महाभारतात आहे. त्यातील अनेक शस्त्रांचा व युद्धातील घटनांचा, त्यांच्या वर्णनाचा अर्थ जशास तसा न घेता, ''समुद्रकुक्षिमध्ये असणारे नगर' पर्यायाने  'समुद्रगर्भातले युद्ध' हा सूचक संदर्भ लक्षात घेऊन, ह्या युद्धास समजून घेणे अधिक उपयुक्त ठरेल. 

(३) कुंतीच्या पोटी इंद्राच्या मंत्राने अर्जुनाचा जन्म होतो; ह्या कथाभागामागे, हे सुद्धा एक उद्दिष्ट असेल का ? 

========================

=====

क्रमश: 

=====


===============================

अस्वीकृती / अस्वीकरण / Disclaimer 

===============================

ह्या काल्पनिक विज्ञानकथेतील मूळ संकल्पना आणि कथावस्तूसाठी (Plot), तसेच  कथाविस्तारासाठी पुरवलेल्या / वापरलेल्या अनेक कल्पना माझ्या असल्या, तरी कथावस्तुची मांडणी, कथाविस्तार, काही संवाद व संदर्भ आदि बहुतांश कथाभाग, हा यांत्रिक बुद्धिमत्तेच्या साहाय्याने, मायक्रोसॉफ्टच्या बिंग को‑पायलट ए.आय. च्या माध्यमातून लिहिला आहे.

ह्या कथेत काही पुराणैतिहासिक संदर्भ वापरले आहेत. काही ठिकाणी असे संदर्भ जसेच्या तसे न वापरता, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून पुनर्कल्पित केले आहेत. ह्या मागे मूळ ग्रंथ, कुणाच्याही परंपरा, श्रद्धा किंवा श्रद्धास्थानांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नाही. हे संदर्भ केवळ विज्ञानकथेला पोषक ठरावेत ह्या उद्देशाने वापरले आहेत.

ह्या शिवाय काही सत्यघटना, देश‑प्रदेश‑नगर‑गावांची नावे किंवा ऐकीव घटना कथेत गुंफल्या आहेत; त्यामागे केवळ आणि केवळ कथेला रंजक करण्याचा प्रयत्न आहे, अन्य कोणताही हेतू नाही.

ह्या कथेतून कोणतेही असत्यकथन रुजविणे, प्रस्थापित करणे किंवा कोणताही उद्देश साधणे — अशा दिशेने माझा हा प्रयत्न नाही. ह्या कथेचा कोणताही भाग प्रत्यक्षात तसाच (किंवा साधारण तसाच) घडला आहे, असे सुचविण्याचा माझा हेतू नाही.

ह्या कथेचा वापर करून कुणीही, कुठल्याही प्रकारचा/चे भ्रम पसरविला/ले, विपरीत निष्कर्ष काढले किंवा तत्सम कृती केल्या, तर त्याचे संपूर्ण उत्तरदायित्व संबंधित व्यक्तीचे / व्यक्तीसमूहाचे राहील.

ह्या कथेत आढळणारे प्रसंग, पात्रे, व्यक्तिरेखा, संस्था, संघटना किंवा स्थळे आदि, कुठल्याही स्वरुपात  प्रत्यक्षातील व्यक्ती, समूह, संस्था, संघटना, देश, प्रदेश, नगर किंवा गाव ह्यांच्याशी पूर्ण किंवा अंशतः साधर्म्य दाखवित असल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. अशा साधर्म्यावरून कोणतेही निष्कर्ष काढणे किंवा कृती करणे, हा वाचकाचा स्वतःचा निर्णय असेल; त्याचे उत्तरदायित्व माझे नसेल.

सोबतचे चित्र केवळ प्रातिनिधिक स्वरुपाचे समजावे.

तळटीप: 

विस्तारभयास्तव, ह्या विज्ञानकथेला अधिक रंजक करणे टाळले आहे; त्यामुळे निदान काही परिच्छेदात तरी, आपण विज्ञानकथा वाचत नसून एखाद्या विज्ञान माहितीपटाची प्रतिलिपि (Transcript of a Science Documentary), वाचत आहोत, असे वाचकांना वाटण्याची शक्यता आहे. 

विकास दत्तात्रेय बापट

=====================






शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५

युद्धार्थं : भाग १

 



=====================

युद्धार्थं : भाग १ 

=====================

काही सहस्र वर्षांपूर्वी

....

इंद्रलोकातील आकाशाकडे अर्जुन एकटक पाहत होता. त्याला इथे येऊन बराच काळ लोटला होता. आता त्याला द्रौपदीची, आपल्या भावांची वारंवार आठवण येऊ लागली होती. 

गंधर्वांच्या सुरेल गाण्यांनी, अप्सरांच्या नृत्यांच्या लयबद्ध हालचालींनी आणि स्वर्गीय वैभवाने वेढलेला असूनही — त्याने मनाला कोणत्याही मोहपाशात अडकू दिले नव्हते.

ह्या काळात विश्वावसु गंधर्वाचा पुत्र, चित्रसेन त्याचा जिवलग मित्र झाला होता. कदाचित कुठल्याशा अंतर्प्रेरणेतून, अर्जुनाने चित्रसेनाकडून नृत्य व गायन ह्या दोन्ही कला उत्तमरित्या अवगत करून घेतल्या होत्या. पण ह्या कला आत्मसात करताना वा त्यापूर्वीही अर्जुनाने त्यांचे लक्ष मूळ ध्येयावरून कधीच ढळू दिले नव्हते. 

त्याच्या ह्या एकाग्रतेचे आणि चिकाटीचे फळ म्हणजे — देवगणांनी  हातचे न राखता,शक्य त्या सर्व प्रकारच्या शस्रविद्या, अस्त्रविद्या त्याला शिकविल्या होत्या, प्रदान केल्या होत्या. अर्जुनाचे लक्ष्य अत्यंत स्पष्ट असल्यामुळे, त्याने अनेक  विद्या केवळ प्राप्त केल्या नव्हत्या, तर त्यात नैपुण्यही मिळविले होते. 

अर्जुनाच्या अस्त्रशस्त्रविद्याप्राप्तीकडे, त्याच्या प्रगतीकडे इंद्रदेव स्वत: लक्ष ठेवून होते. जेव्हां त्यांना असा विश्वास वाटला की अर्जुन त्याच्या उद्दिष्टांमध्ये पूर्ण यशस्वी झाला आहे, तेव्हां एक दिवस ते स्वत:हून त्याला भेटायला  आले. 

त्यांनी अर्जुनाच्या मस्तकावर हात ठेवला आणि अत्यंत प्रसन्नमुद्रेने ते अर्जुनाला म्हणाले :

"हे वीरा, आता देवगण सुद्धा तुला युद्धात हरवू शकणार नाहीत, तर मनुष्यलोकात तुला कोण हरवणार ? तू आता अजिंक्य झाला आहेस, अजेय झाला आहेस. भविष्यकाळातही अस्त्रयुद्धात तुझ्यासम दुसरा कोणी होणार नाही." 

इंद्रदेव पुढे म्हणाले —

"हे धनंजया, तू जी पंधरा विशेष अस्त्रे प्राप्त केली आहेस, त्या योगे तू पाचही प्रकारच्या युद्धविद्यांमध्ये इतका निपुण झाला आहेस की तुझ्यासारखा आता कुणीही नाही. तुला अस्त्र चालविता येते, परतही बोलावता येते, अस्त्राची पुनरावृत्तीही सुद्धा करता येते. तू प्रायश्चित्ताचा आणि प्रतिघाताचा मार्गही जाणतोस. त्यामुळे आता तुझ्यासमोर, एक मोठे कार्य पार पाडण्याची वेळ येऊन ठेपली आहे." (१)

त्यावर अर्जुन देवराज इंद्राला म्हणाला "मी करू शकेन, असे कोणतेही योग्य कार्य मी पार पाडेनच, असे समजा."

त्यावर इंद्रदेव हसले. "तिन्ही लोकांमध्ये असे कोणतेच कार्य नाही, जे तू करू शकणार नाहीस."  

नंतर इंद्रदेव म्हणाले "निवातकवच नामक दानव माझे शत्रू आहेत आणि त्यांचे आश्रयस्थान समुद्राच्या गर्भात आहे.  त्यांची संख्या आता तीन कोटी इतकी वाढली आहे. त्या सर्वांचे रुप,बल आणि तेज एकसारखे आहे. असे समज की त्यांचा पराभव, हीच माझी गुरुदक्षिणा आहे." 

असे सांगूम इंद्रदेवांनी मोरपंखी रंगासारख्या दिव्य तेजाने झळकणारा एक रथ, मातली नावाच्या सारथ्यासह अर्जुनास दिला. नंतर त्याच्या मस्तकावर विशिष्ट शिरस्त्राण बांधले आणि स्वत:च्या अंगावर असलेल्या विभूषणांसारखीच, सर्व विभूषणे अर्जुनाला  दिली. त्यासोबतच एक अभेद्य कवच, त्यांनी अर्जुनाच्या अंगावर चढविले . नंतर अर्जुनाच्या गाण्डीव धनुष्यावर एक अजर प्रत्यंचा चढविली गेली. 

इंद्रदेवांनी दिलेल्या त्या रथात आरुढ होऊन मातलीसह अर्जुन तिथून निघाला. त्या रथाच्या आवाजाने जागृत झालेल्या इतर देवतांनी त्याला रथ घेऊन जाण्याचे कारण विचारले. 

अर्जुनाने प्रयोजन सांगितल्यावर त्या सर्वांनी, अर्जुनाला अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या आणि युद्धघोषासाठी एक शंख दिला. तेव्हां कवचधारी अर्जुन रथात बसून, त्या देवदत्त शंखासह, युद्धाचा विजयी होण्याचा ठाम निश्चय करून तिथून निघाला. 

आकाशमार्गे प्रवास करत तो रथ एका समुद्रतीरावर पोहोचला. तिथे पोहोचल्यावर आणि नंतरही समुद्रावरून आकाशमार्गे तो रथ प्रवास करत असताना, त्या अथांग समुद्राची विविध रुपे न्याहाळण्यात अर्जुन तल्लीन झाला होता. समुद्राच्या रौद्र रुपाकडे त्याची दृष्टी खिळून राहिली होती. 

निवातकवचांची 'मणिमती' नगरी आता निकट येत होती.... 

---------------------------------------

सहलेखक : विकास द. बापट आणि बिंग को-पायलट

=======================

अवांतर : 

(१)

इथे युद्धाच्या पाच विद्या इंद्रदेवांनी स्वत: सांगितल्या आहेत त्या अस्त्र (शस्त्र) चालविणे, ते परत घेणे, त्याच अस्त्राची (शस्त्राची) पुनरावृत्ती करणे, प्रायश्चित्त (निर्दोष प्राणीवध झाल्यास त्याला पुनर्जीवित करणे) व प्रतिघात (पराभूत झालेले अस्त्र (शस्त्र) पुनरुज्जिवित करणे) अशा आहेत.  

भगवान परशुरामांनी 

अमुक्त (हातात शस्त्र धरूनच कराता येते असे युद्ध   उदा. तलवार ) , 

मुक्तामुक्त (जे शस्त्र हातात धरून वापरता येते व फेकूनही मारता येते अशा शस्त्राने केलेले युद्ध  उदा. भाला), 

मुक्त किंवा पाणिमुक्त (हातातून मुक्त झाल्यावरच ज्या शस्त्राचा उपयोग होतो, त्या श्स्त्राने केलेले युद्ध  उदा. चक्र), 

यंत्रमुक्त (कोणत्याही यंत्राच्या वा साधनाच्या साह्याने केलेले युद्ध   उदा. धनुष्य-बाण, गोफण)  

आणि 

मंत्रमुक्त (नैसर्गिक शक्तींचा उपयोग करून केलेले युद्ध   उदा. अस्त्रविद्या)

असे युद्धाचे प्रकार दिले आहेत.

अन्य एका ठिकाणी (जामदग्न्य धनुर्वेद) ढोबळमानाने तंत्रयुद्ध (शारीरिक बलाचा वापर करून केलेले युद्ध), यंत्रयुद्ध (साधन  / शस्त्र वापरून केलेले युद्द), मंत्रयुद्ध (मंत्रांचा प्रयोग करून केलेले युद्ध, अस्त्रयुद्ध )  असे प्रकार दिले आहेत. 

========================

=====

क्रमश: 

=====

===============================

अस्वीकृती / अस्वीकरण / Disclaimer 

===============================

ह्या काल्पनिक विज्ञानकथेतील मूळ संकल्पना आणि कथावस्तूसाठी (Plot), तसेच  कथाविस्तारासाठी पुरवलेल्या / वापरलेल्या अनेक कल्पना माझ्या असल्या, तरी कथावस्तुची मांडणी, कथाविस्तार, काही संवाद व संदर्भ आदि बहुतांश कथाभाग, हा यांत्रिक बुद्धिमत्तेच्या साहाय्याने, मायक्रोसॉफ्टच्या बिंग को‑पायलट ए.आय. च्या माध्यमातून लिहिला आहे.

ह्या कथेत काही पुराणैतिहासिक संदर्भ वापरले आहेत. काही ठिकाणी असे संदर्भ जसेच्या तसे न वापरता, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून पुनर्कल्पित केले आहेत. ह्या मागे मूळ ग्रंथ, कुणाच्याही परंपरा, श्रद्धा किंवा श्रद्धास्थानांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नाही. हे संदर्भ केवळ विज्ञानकथेला पोषक ठरावेत ह्या उद्देशाने वापरले आहेत.

ह्या शिवाय काही सत्यघटना, देश‑प्रदेश‑नगर‑गावांची नावे किंवा ऐकीव घटना कथेत गुंफल्या आहेत; त्यामागे केवळ आणि केवळ कथेला रंजक करण्याचा प्रयत्न आहे, अन्य कोणताही हेतू नाही.

ह्या कथेतून कोणतेही असत्यकथन रुजविणे, प्रस्थापित करणे किंवा कोणताही उद्देश साधणे — अशा दिशेने माझा हा प्रयत्न नाही. ह्या कथेचा कोणताही भाग प्रत्यक्षात तसाच (किंवा साधारण तसाच) घडला आहे, असे सुचविण्याचा माझा हेतू नाही.

ह्या कथेचा वापर करून कुणीही, कुठल्याही प्रकारचा/चे भ्रम पसरविला/ले, विपरीत निष्कर्ष काढले किंवा तत्सम कृती केल्या, तर त्याचे संपूर्ण उत्तरदायित्व संबंधित व्यक्तीचे / व्यक्तीसमूहाचे राहील.

ह्या कथेत आढळणारे प्रसंग, पात्रे, व्यक्तिरेखा, संस्था, संघटना किंवा स्थळे आदि, कुठल्याही स्वरुपात  प्रत्यक्षातील व्यक्ती, समूह, संस्था, संघटना, देश, प्रदेश, नगर किंवा गाव ह्यांच्याशी पूर्ण किंवा अंशतः साधर्म्य दाखवित असल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. अशा साधर्म्यावरून कोणतेही निष्कर्ष काढणे किंवा कृती करणे, हा वाचकाचा स्वतःचा निर्णय असेल; त्याचे उत्तरदायित्व माझे नसेल.

सोबतचे चित्र केवळ प्रातिनिधिक स्वरुपाचे समजावे.

तळटीप: 

विस्तारभयास्तव, ह्या विज्ञानकथेला अधिक रंजक करणे टाळले आहे; त्यामुळे निदान काही परिच्छेदात तरी, आपण विज्ञानकथा वाचत नसून एखाद्या विज्ञान माहितीपटाची प्रतिलिपि (Transcript of a Science Documentary), वाचत आहोत, असे वाचकांना वाटण्याची शक्यता आहे. 

विकास दत्तात्रेय बापट

=====================




रविवार, १२ मार्च, २०२३

तीन नियम

 .



=============
तीन नियम
=============

म्हणींना कुणीतरी 'अनुभवांच्या खाणी' असे म्हटले आहे; आणि ते शंभर टक्के सत्य आहे. म्हणी काय किंवा वाक्‌प्रचार काय, बर्‍याचदा ते अनुभवातूनच आलेले असतात, काळाच्या कसोटीवर टिकलेले असतात. कमी शब्दात व्यक्त होईल, सहज लक्षात राहील, थोडासा नादमय, असा आशय एखाद्या वाक्यात, एक-दोन ओळीत व्यक्त झाला की कालांतराने त्याला म्हणीचे किंवा वाक्‌प्रचाराचे रुपडे लाभते. हा आशय क्वचित तत्वज्ञानाकडे झुकणारा असतो, अर्थगर्भ असतो, सुभाषिताचे रूप धारण करतो; तर काही वेळा खिल्ली उडविण्यासाठी वापरता येईल, इतका थिल्लरही असतो आणि काही वेळा चक्क एखादा नियम असल्याप्रमाणे अनुभवासही येतो. त्यामुळेच बहुतेकवेळा, स्थळ, काळ आणि परिस्थिती ह्या तीनही प्रांतात त्या आशयाचा, पर्यायाने त्या म्हणीचा वा वाक्‌प्रचाराचा  वावर अतिशय सहजतेने होत राहतो. 

रोजच्या आयुष्यात, क्वचित विशिष्ट प्रसंगात, जसा म्हणींचा, वाक्प्रचारांचा अनुभव येऊन, त्यांच्यावर नव्याने मोहोर उमटत राहते, तसेच विज्ञानाच्या क्षेत्रात काही असिद्ध नियमांचा अनुभव अधूनमधून येत राहतो. लौकिक अर्थाने असे नियम सिद्ध न होता देखील, ह्या नियमांची सार्वकालिकता, नित्य नव्याने जाणवत राहते. 

------

आपल्याला ज्ञात असलेल्या विज्ञानात व ज्ञात विज्ञानावर, 'विशिष्ट नियमांचा संच' आणि त्यातही 'तीन नियमांचा संच', ह्या संकल्पनेचा एकंदरच मोठा प्रभाव आहे. 

न्यूटनचे गतीसंबंधित तीन नियम, 
केप्लरचे ग्रहगतीचे तीन नियम, 
ऊष्मागतिकीचे (Thermodynamics) तीन नियम, 
यंत्रमानवाच्या वागणुकीचे तीन नियम 
आदि. 

आर्थर सी क्लार्क ह्या जगप्रसिद्ध विज्ञान लेखकाचे असेच तीन नियम प्रसिद्ध आहेत. त्याच्या लिखाणात, साहित्यात, हे नियम विविध ठिकाणी प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष रूपात आले आहेत, डोकावले आहेत. मूळ नियम अर्थातच इंग्लिशमध्ये आहेत, पण त्यांचा भावानुवाद करायचा झाल्यास तो काहीसा असा असेल : 

------
****

१) "जेव्हां एखादी प्रथितयश शास्त्रज्ञ असलेली, अनुभवसंपन्न व्यक्ती असे म्हणते की 'हे शक्य आहे', तेव्हां बहुतांश वेळा, त्या शास्त्रज्ञाचे ते प्रतिपादन, सत्य ठरण्याचीच शक्यता असते.  तसेच जेव्हां ती शास्त्रज्ञ व्यक्ती असे म्हणते की 'हे अशक्य आहे', तेव्हा ती व्यक्ती बहुतांश वेळा चुकीचीच असते.  "
(==> भविष्यकाळात त्या शास्त्रज्ञाचे प्रतिपादन चुकीचे ठरताना दिसते.)  

२) "शक्‍यतेच्‍या मर्यादा शोधण्‍याचा एकमेव मार्ग म्हणजे, त्‍या शक्यतांच्या पलीकडे असलेल्या, अशक्यतेच्या प्रांतात थोडेसे भ्रमण करणे. "

३) "कोणतेही पुरेसे प्रगत तंत्रज्ञान, हे जादूपासून वेगळे करता येत नाही. "
(दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, पुरेसे प्रगत तंत्रज्ञान हे, त्या तंत्रज्ञानाच्या तुलनेने मागास असलेल्या कोणत्याही समूहासाठी, एखाद्या जादूसारखेच [किंवा चमत्कारासारखेच] असते.)

****
------

ह्या नियमांबाबत मर्यादित प्रमाणात ऊहापोह झाला आहे. ह्या नियमांचे मूळ धुंडाळण्याचा, त्यांचा प्रवास शोधण्याचा प्रयत्न झाला आहे,  तसेच नियमांमागची क्लार्कची भूमिका देखील ह्या ना त्या प्रकारे उलगडण्याचाही प्रयत्न झाला आहे. 

------

====

नियम क्रमांक १ 
१) जेव्हां एखादी प्रथितयश शास्त्रज्ञ असलेली, अनुभवसंपन्न व्यक्ती असे म्हणते की 'हे शक्य आहे', तेव्हां बहुतांश वेळा, त्या शास्त्रज्ञाचे ते प्रतिपादन, सत्य ठरण्याचीच शक्यता असते.  तसेच जेव्हां ती शास्त्रज्ञ व्यक्ती असे म्हणते की 'हे अशक्य आहे', तेव्हा ती व्यक्ती बहुतांश वेळा चुकीचीच असते.  (==> भविष्यकाळात त्या व्यक्तीचे प्रतिपादन चुकीचे ठरताना दिसते.)  

====

नियम क्रमांक एकचे दोन भाग आहेत आणि विज्ञानाच्या आजवरच्या इतिहासाला व्यवस्थित अभ्यासले तर हे ही लक्षात येईल की, हे दोन्ही भाग सातत्याने अनुभवास येत राहिले आहेत. 

नियम क्रमांक १ च्या  पूर्वार्धात, अध्याहृत असलेली पृच्छा आहे, 'अमुक अमुक गोष्ट शक्य आहे का ?'  ही पृच्छा अर्थातच विज्ञानाशी निगडीत आहे; पण त्याच बरोबर ती बऱ्याचअंशी अज्ञाताशी संबंधित आहे. 

'अज्ञात विज्ञान' वा 'अज्ञातांचे विज्ञान' हा विज्ञानाचा असा भाग आहे, जो केवळ भविष्यकाळाचा वेध घेणाऱ्या वैज्ञानिकांनाच नव्हे, तर विज्ञानाशी संबंधित कुठलेही प्रकटीकरण करणाऱ्या सर्व व्यक्तींना सदैव खुणावत असतो. 
भविष्यकाळात गम्य होईल, साध्य होईल अशा आज अज्ञात असलेल्या विज्ञानाशी संबंधित कल्पनाचित्रे  रंगविणे, हा विज्ञानाशी संबंधित कलाविष्कार करणाऱ्यांचा आवडता छंद आहे. असा विज्ञानप्रेमी कलाकार त्याच्या अभिव्यक्तीच्या माध्यमातून विज्ञान आणि कला ह्यांची सरमिसळ करत, कल्पनेच्या भराऱ्या मारत जेव्हां व्यक्त होतो; तेव्हां भलेही तो कलाविष्कार विज्ञानाच्या चौकटीबाहेर जात असला वा वैज्ञानिक तथ्यांशी क्वचित फारकत घेत असला, तरीही त्यास मोठ्या प्रमाणावर लोकाश्रय लाभत आला आहे. 

पण कलाविष्कार म्हणून अशा कल्पनांच्या भराऱ्या मारणे आणि एखाद्या वैज्ञानिकाने त्याला असलेल्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या जोरावर, आज असाध्य असलेली एखादी गोष्ट साध्य आहे अशी शक्यता वर्तविणे ह्यात महदंतर आहे. 
वैज्ञानिकाचे उत्तर हे बहुतांश वेळी, ज्ञात असलेल्या विज्ञानाच्या सशक्त पायावर, संशोधनांच्या संभाव्य दिशांवर आणि त्याने केलेल्या चिंतनावर विसंबून असते.  

त्यामुळेच, नियम क्रमांक १  च्या पूर्वाधात उल्लेख असलेले 'हे शक्य आहे' हे होकारार्थी उत्तर बहुतांशी वेळी प्रत्यक्षात उतरते. 

अगदी अर्वाचीन काळापुरती उदाहरणे शोधायची ठरविल्यास, लिओनार्दो दा विंची, जुल्स व्हर्न आदि द्रष्ट्यांसोबतच, काही शतकांपूर्वीच्या कोपर्निकस, ब्रुनो, गॅलिलिओ, न्युटन ह्या वैज्ञनिकांपासून ते अगदी निकटच्या भूतकाळातील आईनस्टाईन, हॉकिंग सारख्या प्रज्ञावंत वैज्ञानिकांपर्यंत, ह्या पूर्वाधातील उत्तराचा अनुभव कधीनाकधी आला आहे. 
अगदी विषयवार जरी विचार केला तरीही ह्याची प्रत्यक्षातील उदाहरणे विलक्षण आहेत.  काल विस्फारण (Time Dilation), गुरुत्वीय भिंग (Gravitational lense), गुरुत्वाकर्षण लहरी (Gravitational Waves), कृष्णविवरासंबंधीची अनुमाने, (सामान्य) सापेक्षता सिद्धांत (General Theory of Relativity) आदि गोष्टी कालांतराने प्रत्यक्ष अनुभवास आल्या आहेत.

त्यामुळे नियम क्रमांक १ च्या पूर्वार्धाबद्दल  फारसा वाद असण्याचे कारण नाही.

------

नियम क्रमांक १ च्या उत्तरार्धाबद्दल तसेच म्हणता येणार नाही.
ह्याची अनेक कारणे आहेत. 

कितीही तर्कशुद्ध विचार करत असले, त्यांची सार्वजनिक जीवनातील प्रतिमा कशीही असली, तरीही बरेचसे वैज्ञानिक, मनुष्यस्वभावातील अपरिहार्य लक्षणांवर, दोषांवर क्वचितच मात करू शकतात.  त्यामुळे वेळप्रसंगी, ते षड्‌रिपुंच्या आहारी जाणे ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. 

तत्कालिन ज्ञान व प्रस्थापित धारणा, पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन, एखाद्या विचारसरणीशी असलेली दृढ निष्ठा, स्वभावातील काही त्रुटी, परिस्थितीजन्य निष्कर्ष वा निर्णय, ह्या व अशा अनेक गोष्टी आहेत, जिथे तर्कशुद्ध विचारसरणी मागे पडते आणि इतर गोष्टी मानवी मनाचा ताबा घेतात, तर्कसंगत दृष्टिकोन, विश्लेषणाची नैसर्गिक प्रवृत्ती इथे सहजपणे मात खाते. ह्यातून आईनस्टाईन आणि हॉकिंग सारखे प्रज्ञावंत देखील सुटू शकलेले नाहीत. 'Spooky action at a distance' आणि 'Higgs Boson Doomsday' ही अनुक्रमे त्याचीच उदाहरणे आहेत. 

काही विशिष्ट परिस्थितीत, अशा वैज्ञानिकांचा आणि त्यांच्या समर्थकांचा एक कंपू देखील निर्माण होतो. अशा कंपूच्या तीव्र धारणांमुळे, वर्चस्ववादी भूमिकांमुळे, आधिकारिक स्थानांमुळे , कितीतरी वेगळे दृष्टिकोन (जे कदाचित योग्य असू शकतील, वैज्ञानिक प्रगतीत महत्त्वाचा सहभाग नोंदवू शकतील) मागे पडल्याची उदाहरणे देखील आहेत. 

ह्या व्यतिरिक्त, व्यावसायिक, राजकीय हितसंबंध आणि त्या अनुषंगाने असलेले प्रचारगट हे देखील अशा वैज्ञानिकांकडून 'हे अशक्य आहे' प्रकारची उत्तरे वदवून घेत असावेत, अशी शक्यता नाकारता येणार नाही. 
'Science advances one funeral at a time' असे सुप्रसिद्ध वैज्ञानिक मॅक्स प्लॅंकचे एक विधान आहे. थोडे कठोर असले तरीही ह्या विधानात तथ्य असावे,  अशा काही गोष्टी विज्ञानाच्या इतिहासात आढळतात. असे असूनही, हे विधान व्यक्तीस्तरावर न घेता, रुढ झालेल्या वैज्ञानिक धारणा, कल्पनांच्या संदर्भाने घेतले तर अधिक उचित ठरेल. 
प्रचलित आणि कालबाह्य होऊ पाहणार्‍या किंवा भविष्यातील वैज्ञानिक प्रगतीत अडसर ठरू शकणार्‍या जुन्या धारणा, कल्पना लोप पावल्या नाहीत, तर अनेकदा नव्या कल्पनांचा विकास खुंटतो.  

'हे अशक्य आहे' ह्या ऐवजी 'हे कसे शक्य होऊ शकेल' किंवा 'अमुक कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कोणत्या दिशेने अधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे'; अशा प्रकारच्या चर्चांसाठी आवश्यक पार्श्वभूमीच निर्माण होऊ शकली नाही (किंवा क्वचित, निर्माणच होऊ दिली नाही) , तर ती कल्पना प्रत्यक्षात येण्याची शक्यता अधिकच धूसर होत जाते.

------

ह्या नियमाच्या अनुषंगाने सुप्रसिद्ध विज्ञानकथा लेखक आयझॅक आसिमोव्ह ची एक टिप्पणी आहे आणि ती टिप्पणी क्लार्कच्या नियमातून झिरपणार्‍या मोकळेपणाच्या विरोधात जाऊन, काहीशी 'विज्ञानपोथीनिष्ठ' होत असली, तरीही ती आवर्जून विचारात घेण्यासारखीच आहे. पहिल्या नियमाच्या उत्तरार्धात 'बहुतांश वेळा' अशा अर्थाचा शब्दप्रयोग (original : very probably) वापरला गेला आहे, त्या संदर्भात ही टिप्पणी आहे. 

"When, however, the lay public rallies round an idea that is denounced by distinguished but elderly scientists and supports that idea with great fervour and emotion – the distinguished but elderly scientists are then, after all, probably right."

त्या टिप्पणीचा भावानुवाद काहीसा असा होईल :  

'तथापि, प्रथितयश आणि अनुभवसंपन्न शास्त्रज्ञांनी मूळातून नाकारलेल्या, त्याज्य मानलेल्या एखाद्या कल्पनेला, सामान्य जनता जर भावनाशील होऊन, उत्कटतेने कवटाळत असेल, पाठिंबा देत असेल, तर अशा वेळेस ते प्रथितयश आणि अनुभवसंपन्न शास्त्रज्ञ, बहुदा योग्य असतात.'    
ह्या टिप्पणीत देखील 'बहुदा' हा शब्द वापरला गेला आहे, ही नोंद घेण्यासारखी बाब आहे !

------
****

====
नियम क्रमांक २ 
२) शक्‍यतेच्‍या मर्यादा शोधण्‍याचा एकमेव मार्ग म्हणजे, त्‍या शक्यतांच्या पलीकडे असलेल्या, अशक्यतेच्या प्रांतात थोडेसे भ्रमण करणे. 
====

हा नियम विज्ञानातील वाङमयीन वा दृकश्राव्य कलाकृती 
आणि 
ज्ञात वा अज्ञात विज्ञान, 
ह्यांच्या परस्परसंबंधावर भाष्य करतो. 

विज्ञानकथा, विज्ञानकादंबर्‍या, विज्ञानपट आणि विज्ञानमालिका ह्या दीर्घकालीन प्रवासाचा आरंभ बराच जुना आहे. अगदी दुसर्‍या शतकात त्याची मूळे आढळतात असा दावा केला गेला आहे. 

आता आपल्याकडे, अनेकांना विविध कारणांमुळे, पौराणिक कथातील तथ्य आणि आलंकारिक वा अन्य कारणामुळे समाविष्ट झालेले मिथ्य ह्यांची सरमिसळ पचत नाही.  अतिशयोक्ती, महिमावर्धन टाळल्यास, प्रक्षिप्त भाग बाजूला सारल्यास अशा कथांमध्ये काही निखळ (विज्ञाननिष्ठ) सत्य असू शकेल ही गोष्ट, त्यांना अपेक्षित असलेले पुरावे न सापडल्याने मान्यच होत नाही. आणि म्हणून असे लोक, अनेक पौराणिक कथांची वर्गवारी कविकल्पना वा काही वेळा चक्क विज्ञानकथा म्हणून करतात; आता हा प्रकार जर विचारात घेतला, तर विज्ञानकथांचा उगम थेट पौराणिक काळातच नेता येईल !!

कथा, कादंबरी, नाटक, चित्रपट, शृतिका वा मालिका वा अन्य कोणत्याही स्वरूपात विज्ञान कलाकृती असली, तरीही त्या कलाकृतीला, विज्ञानकल्पनांच्या प्रांगणात भरारी मारणे टाळता येत नाही. किंबहुना विज्ञान वाङमयाचा वा दृकश्राव्य माध्यमातील त्याच्या सादरीकरणाचा, तोच मूळ हेतू असतो. 

आज ज्ञात असलेल्या विज्ञानाच्या खिडकीतून बाहेर डोकाविल्याशिवाय किंवा त्या उंबर्‍याच्या पलीकडे पाऊल टाकल्याविना, त्या लेखनाला, सादरीकरणाला अपेक्षित यश मिळणे अवघडच असते. पण यशापलीकडेही, हे सादरीकरण बरेच काही देऊन जाते. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्या सादरीकरणात डोकावलेल्या असीम इच्छा. आज ज्ञाताच्या उंबर्‍यापलीकडे असलेल्या विज्ञानाच्या अविष्कारांना प्रत्यक्षात उतरविण्याची मनीषा. ही मनीषा देखील विज्ञानाच्या आजपर्यंतच्या प्रगतीला काही अंशी उपयुक्त ठरली आहे. 

प्रत्यक्षात न उतरलेल्या, पण मनात झिरपलेल्या अशा अनेक वैज्ञानिक कल्पना, संकल्पना ज्ञात विज्ञानाच्या चौकटीच्या मर्यादा स्पष्ट करतातच, पण त्याच सोबत त्या चौकटीबाहेरची आणि पहिल्या नियमात उल्लेखलेली 'हे शक्य आहे' ची चौकट विस्तारायलाही कारणीभूत ठरू शकतात. 

एखाद्या विज्ञान कलाकृतीतले, अशक्यतेच्या प्रांतातील हे भ्रमण, जेव्हां ज्ञात विज्ञानाच्या ठोस पायावर उभे असते, तेव्हां त्या कलाकृती अधिक चांगल्या वठण्याची शक्यता वाढते. पण तरीही विज्ञानाचा ठोस पाया आहे म्हणून ती कलाकृती रुक्ष होईल, त्या कलाकृतीची रंजकता कमी होईल असे नव्हे. कलाकृतीची रंजकता ही, प्रामुख्याने कलाकृतीची निर्मिती होत असतानाच्या, हाताळणीवर अधिक अवलंबून असते, ह्याचा प्रत्यय वारंवार आला आहे. 
ज्ञात विज्ञानाच्या चौकटीला ओलांडणारे हे भ्रमण, 

भविष्यातील अपेक्षित वैज्ञानिक प्रगतीला स्पर्श करणारे असतेच (Back to the Future [trilogy], The Martian, Interstellar, I Robot आदि). 

पण काही वेळा ते भ्रमण वैज्ञानिक प्रगतीच्या अनपेक्षित आणि अनवट वाटा चोखाळणारे, आज असाध्य वाटणार्‍या वाटांवरचे देखील असू शकते (X-Files, Star Trek, Terminator [trilogy], Lucy आदि). 

कित्येकदा ते सैद्धांतिक भौतिक शास्त्राच्या कल्पनांना मांडणारे, रुजविणारे असते (Déjà Vu, Predestination, The Butterfly Effect आदि) 

आणि 

काही वेळा, विज्ञानाच्या प्रगतीचा प्रवास, अंतिमत: तत्त्वज्ञानाच्या प्रांगणातच जाऊन पोहोचणार आहे, हे सुचविणारे देखील असते (Matrix [trilogy], Gattaca, Source Code, The Island)

--
टीप : 2001 A Space Odyssey आणि Rendezvous with Rama चा उल्लेख आणि त्यांची वर्गवारी इथे मी जाणीवपूर्वक टाळली आहे.
--

अशक्यतेच्या प्रांतातील अशा भ्रमणाला मानवी कल्पनेच्या आणि तत्कालीन स्वीकारार्हतेच्या मर्यादा असतात. 

त्या ही पलीकडे गेलेल्या गोष्टींची मग चेष्टा होते, टवाळी होते. ही चेष्टा कधी पौराणिक कथांमधील वैज्ञानिक संदर्भांच्या वाट्याला येते, तर कधी प्रमाणाबाहेर ताणलेल्या Ancient Aliens सारख्या संकल्पनांच्या वाट्याला. अशा वेळेस मग उपलब्ध असलेली तथ्ये देखील मिथ्य वाटू लागतात. मग ज्या गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत आणि ज्या गोष्टी आपल्या मनात रुजलेल्या तत्कालीन संदर्भांशी मेळ खात नाहीत, त्यांचे प्रमाणाबाहेर सुलभीकरण केले जाते किंवा त्यांची स्पष्टीकरणासाठी संपूर्ण अतार्किक मांडणी केली जाते. आणि नंतर ती मांडणीच योग्य आहे, अशी हाकाटी इतक्या उच्चरवात वा प्रसिद्धीतंत्र वापरून केली जाते, की त्या चेष्टा होणार्‍या संकल्पनांच्या समर्थनार्थ उठणारे आवाज हळूहळू क्षीण होत जातात. 

प्रस्थापितांच्या वर्चस्वाच्या ह्या स्वाभाविक दोषातून, विज्ञान देखील सुटलेले नाही.

------
****

====
नियम क्रमांक ३ 
३) कोणतेही पुरेसे प्रगत तंत्रज्ञान, हे जादूपासून वेगळे करता येत नाही. 
====

जादू, न उलगडणारे चमत्कार, स्पष्टीकरण न सापडलेल्या घटना, अद्‍‌भुताच्या प्रांतातच शक्य होऊ  शकतील अशा अनेक गोष्टी,  ह्या मानवी इतिहासाचा आणि वर्तमानाचाही अविभाज्य भाग आहेत. 

ह्या तथाकथित चमत्कारांमागे त्यावेळी (आणि क्वचित आजही) न उमगलेले, न उलगडलेले विज्ञानच असते, असे ठामपणे प्रतिपादन करण्यासारखी परिस्थिती निश्चितच आहे. पण चमत्कार, जादू हे तसेच राहावेत अशी एका मोठ्या वर्गाची इच्छा असते.  त्या मागे असतात स्वार्थाने परिप्लुत झालेले हितसंबंध व लपविलेली, मूक ठेवलेली आर्थिक, सामाजिक कारणे. 

अर्थात काही व्यक्तींनी केलेले 'चमत्कार' वास्तविक अर्थाने, निखळ सत्यही असू शकतात. क्वचित प्रसंगी असे चमत्कार, वैज्ञानिक निरीक्षणांखाली होऊनही, विज्ञानास त्यातील तथ्य, त्यामागचे अज्ञात विज्ञान पूर्णपणे उलगडणे शक्य होत नाही, ह्याची मोजकी उदाहरणे आहेत. चमत्कार करणार्‍या व्यक्तीस दैवजात वा त्याच्या उपासनेमुळे वा गुरुच्या अनुग्रहामुळे लाभलेल्या काही सिद्धींचा त्यामध्ये वाटा असतो. 

सिद्धी म्हणजे तर शेवटी काय ? तर आज अज्ञात असलेल्या विज्ञानाच्या माध्यमातून गवसलेली विलक्षण शक्ती. 

मानवी मनात विलक्षण शक्ती आहे आणि त्याचा अनुभव वारंवार आला आहे. संमोहन विद्या (Hypnotism), दूरसंवेदना (Telepathy), पराचलन (Telekinesis) आदिंचे प्रयोग वैज्ञानिक निरीक्षणाखाली झाले आहेत आणि ते हातचलाखी वा फसवणूक म्हणून नाकारता येत नाहीत.  दुसर्‍या शब्दात सांगायचे तर दिव्यत्वाच्या वर्तुळात सामावणार्‍या, मनाच्या शक्तींचे हे व अन्य प्रयोग, अंतिमत: काही सिद्धींच्या माध्यमातूनच प्रत्यक्षात उतरतात.  अशा वेळेस 'दिव्यत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती' हे म्हणणे किंवा तदनुषंगिक कृती करणे म्हणजे प्रतिगामित्व किंवा अंधश्रद्धा नव्हे हे तथाकथित पुरोगामी आणि 'अंधाश्रद्ध' (आंधळी अश्रद्धा असणारे) व्यक्तींनी लक्षात घेतले तर, अंधश्रद्धेच्या नावाखाली हिंदू श्रद्धांचे निर्मूलन करण्याचे प्रयत्न, काही प्रमाणात तरी कमी होऊ शकतील. स्वाभाविकच विनाकारण होणारे काही संघर्षही टळतील.  

------ 

आणि तरीही कर्मठ विज्ञाननिष्ठ होऊन ज्ञात विज्ञानाच्या चौकटीतच  विचार करायचा झाल्यास, पुढील प्रसंगाचा अवश्य विचार करावा. 

एरिक वॉन डॅनिकनच्या काही पुस्तकात एका कल्पित प्रसंगाचा उल्लेख, वेगवेगळी रुपे घेत आला आहे.
 
अत्यंत प्रगत झालेल्या पृथ्वीवरील एक अंतराळ मोहिम, एका पृथ्वीसदृश ग्रहावर जाऊन ठेपते.  ह्या ग्रहावर जेव्हां अंतराळवीर उतरतात तेव्हां त्यांना असे आढळते की तिथे एक अत्यंत अप्रगत मानवसदृश प्रजाती वास करून आहे. ते अंतराळवीर ह्या प्रजातीत वावरतात. त्या प्रजातीला, आवश्यक असल्यास त्यातील निवडक लोकांना विविध संस्कृतींचे, शास्त्रांचे, शस्त्रांचे, विज्ञानाचे आवश्यक तितकेच ज्ञान टप्प्याटप्प्याने देत राहतात. वेळप्रसंगी त्यांच्यातील स्त्रियांशी शरीरसंबध ठेवून संकरित आणि अधिक बलवान, बुद्धिमान संततीही जन्मास घालतात. ह्या व अशा अनेक गोष्टी साधत, त्या प्रजातीचा सांस्कृतिक, वैज्ञानिक उत्क्रांतीच्या वाटेवरचा प्रवास घडविला जातो. 

कालांतराने हे अंतराळवीर जेव्हां त्यांची मोहिम आवरती घेतात, तोवर त्या प्रजातीच्या मनात त्यांची 'देव' म्हणून प्रतिष्ठापना झालेली असते. त्यांनी दाखविलेल्या अनेक वैज्ञानिक अविष्कारांचे चमत्कार झालेले असतात. कालांतराने त्या अंतराळवीरांच्या निवासाचे, वावराचे कित्येक संदर्भ, त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा ठेवा, त्यांनी मागे सोडलेल्या गोष्टी त्या प्रजातीत कथारुपाने रुजतात. पुढल्या कित्येक पिढ्यांपर्यंत त्या गोष्टींमध्ये, तथ्यांमध्ये, अनेक बर्‍यावाईट, सत्यासत्य संदर्भांची, सरमिसळ होत राहते. 

Stargate नावाच्या एका विज्ञानपटात आणि स्टारट्रेक ह्या विज्ञानमालिकेच्या काही भागात, अशाच प्रकारच्या संकल्पनेचा अत्यंत प्रभावी वापर करण्यात आला आहे. 

मानवी इतिहासातील वसाहतीकरणाचे वेगवेगळे प्रसंग व त्या प्रसंगांच्या वेळी वसाहतीकरण करणार्‍या प्रगत जमातींचे वर्तन व स्थानिक जमातींचा त्या संबंधाने प्रतिसाद, त्यांच्या प्रतिक्रिया विचारात घेतल्या, तरीही डॅनिकनच्या काहीशा एककल्ली वाटणार्‍या विचारामागील पार्श्वभूमी लक्षात येऊ शकेल. 

------

ह्या तिसर्‍या नियमावरही काही नोंद घेण्यासारख्या टिप्पण्या झाल्या आहेत.
 
वरवर तिसर्‍या नियमाच्या विरोधात वाटणारी, पण प्रत्यक्षात त्या नियमाला एकाप्रकारे पुष्टी देणारी, एक टिप्पणी अशी आहे  : 

'कोणतेही तंत्रज्ञान, जे जादू वाटत नाही ते अद्याप पुरेसे प्रगत झालेले नाही.'  ('Any technology distinguishable from magic is insufficiently advanced.' -- Barry Gehm - Chemistry Professor and Science Contributor) 

--

आणखी एक उल्लेखनीय टिप्पणी आहे, Michael Shermer ह्या प्रसिद्ध 'संशयवादी' (Sceptic / Skeptic) व्यक्तीची. : 

कोणतीही पुरेशी अतिप्रगत असलेली पृथ्वीबाह्य प्रजाती वा अतिदूरच्या काळातील अतिप्रगत झालेली मानव प्रजाती आणि देव ह्यात भेद करता येणार नाही. 
('Any sufficiently advanced extraterrestrial intelligence or far-future human would be indistinguishable from God.')

एकापरीने ही टिप्पणी डॅनिकनच्या दाव्याला बळ देणारी आहे. 

------
------

ह्या तीन नियमांच्या अनुषंगाने, एका मुलाखतीत क्लार्कला विचारण्यात आले होते की 
'पुढील काळात तुमच्या लेखनात आणखी काही नियमांचा समावेश होऊ शकेल का ?'  त्यावेळी क्लार्कने दिलेले उत्तर, त्याच्या तीन नियमांच्या परिपूर्णतेच्या दृष्टीने अतिशय चपखल होते. 
“As three laws were good enough for Newton, I have modestly decided to stop there.”

प्रत्यक्षात मात्र, (उपलब्ध माहीतीनुसार,) नंतरच्या काळात आणखी एक नियम त्याच्या खात्यात जमा करण्यात आला, ज्याचा प्रत्यय आपण रोजच्या जीवनात, टी.व्ही. वरील चर्चांमध्ये, परिसंवादांमध्ये, वादांमध्ये, इतकेच काय तर, फेसबूकवर देखील नित्यनेमाने घेतो. 

“For every expert, there is an equal and opposite expert.”

:-) 

====

तळटीपा : 

१) पहिला नियम सध्याच्या कोणत्याही प्रसंगाला वा विशिष्ट शास्त्रज्ञाला, व्यक्तीला वा त्यांच्यासारखा विचार करणार्‍या फेसबूक वा अन्य समूहाला लागू होतो असे कुणाला वाटल्यास, तो योगायोगच समजावा, असा काही माझा आग्रह नाही.   :-) 

२) कृपया हा लेख केवळ आणि केवळ तीन नियमांच्या संदर्भानेच वाचावा.  त्या नियमकर्त्याच्या वैयक्तिक आयुष्याचे संदर्भ जोडून, ह्या लेखाचे तर्‍हेतर्‍हेचे अर्थ काढू नयेत, ही विनंती.

३) ह्या लेखावरील विषयाला धरून केलेल्या सर्व प्रकारच्या टिप्पण्यांचे स्वागत आहे. अर्थातच शिव्या वा शिवराळ भाषा अपेक्षित नाही.   :-)  

४) हा लेख माझ्या,  https://vidnyansrushti.blogspot.com/ ह्या ब्लॉगवर देखील आहे, ज्यांना स्वत:चे नाव लपवून टिप्पणी करावयाची असेल, प्रतिवाद करायचा असेल , ते तिथे टिप्पणी करू शकतात  :-)  

====