=====================
युद्धार्थं : भाग ८
=====================
मणिमतीच्या विनाशाला कारणीभूत ठरलेल्या त्या भयंकर युद्धाला जवळजवळ पाच सहस्र वर्षे होऊन गेली होती. निवातकवचांच्या कित्येक पिढ्या उलटून गेल्या होत्या.
त्यांनी त्यांच्या इतिहासात ते युद्ध आणि त्यातून मिळालेला धडा, पिढ्यांपिढ्या आणि जाणीवपूर्वक त्यांच्या दीर्घ स्मृतींमध्ये जपला होता. प्रत्येक पिढीला त्या युद्धाची भीषणता आणि त्यामागची कारणे उमगणे आवश्यक होते, त्यांच्या स्वत:च्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी, विलुप्ततेच्या काठावर पोहोचून परत येण्यासाठी करावा लागलेला संघर्ष सुद्धा, प्रत्येक नवीन पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यकच होते. पण तरीही त्यांच्या मनावर उमटलेले ते आघात आता बरेच पुसट होऊ लागले होते.
त्यांचा नोंदवलेला इतिहास त्यांना असे सांगत होता की आरंभीच्या काळात त्यांनी समुद्रतळाखाली जाण्याचा जो निर्णय घेतला, तो त्यावेळेच्या परिस्थितीनुसार योग्यच होता. पण विवरे आणि भुयारांमध्ये जगणे, त्यांच्या अपेक्षेपेक्षा त्यांना बरेच कठीण गेले होते. त्यांच्या मूळ आराखड्यानुसार निर्मिलेल्या अनेक संरचनांमधील त्रुटी त्यांना कालांतराने जाणवू लागल्या होत्या. कित्येक ठिकाणी नियमित स्वरूपातील देखभाल सुद्धा पुरेशी ठरत नव्हती, हे त्यांना लवकर उमगले.
----
तिथे राहण्यास आल्यापासून साधारण चार शतके झाली असतील; तेव्हांच भिंतींना सूक्ष्म तडे जाऊ लागले होते. त्या वेळी नव्याने दिलेले लेपनाचे असंख्य थरही पुरेसे ठरत नव्हते. मग त्यांनी विपरीत परिस्थितीतही टिकाव धरू शकणार्या सूक्ष्मजंतूंचा (extremophile microbes) वापर करून, अशी खनिज संयुगे विकसित केली, ज्यांच्यायोगे भिंतींना जाणारे तडे आपोआप भरले जातील. (८)
पण जसजशी त्यांची संख्या वाढत गेली, तसतशी त्यांना नवनवीन विवरांची, भुयारांची आवश्यकता जाणवू लागली. आरंभीच्या काळात जाणवलेले कालबंधन नसल्यामुळे, नवीन विवरे, भुयारे, गुंफा अधिक सुधारित संरचना योजून, अधिक वेळ घेऊन निर्माण केल्या गेल्या होत्या. स्वाभाविकच त्या मूळ गुंफांपेक्षा अधिक चांगल्या होत्या, सुविधांनी परिपूर्ण होत्या. जुन्या गुंफांत राहणार्या बहुसंख्य निवातकवचांनी नव्या गुंफांत स्थलांतर केले. त्यापूर्वी जुन्या गुंफांतील भिंतींवर त्यांनी त्यांचा इतिहास चित्रित करून ठेवला; जेणेकरून दीर्घ कालावधीनंतर त्या जुन्या गुंफा, निवातकवचांच्या प्राचीन इतिहासाचा एक दृश्य ठेवा ठरावा.
उष्णता नियमनासाठी वापरलेल्या सहकेंद्रित आवरणे असलेल्या नलिकांवर आता आणखी आवरणे चढली होती. तसेच तिथे आवश्यकतेनुसार उघडझाप करणार्या झडपा (adaptive valve) बसविण्यात आल्या होत्या. केवळ समुद्रतळाशी सुप्त अवस्थेत असलेल्या ज्वालामुखींवर आणि पर्यायाने त्याच्या निकट असलेल्या स्थानांवर अवलंबित्व राहू नये, म्हणून त्यांनी भूकंपनांचा आणि सम्पीडविद्युत्रत्नाचा (Piezoelectric crystal) वापर करून स्पन्दविद्युत (Piezoelectric Energy ) निर्माण करण्याची क्षमता प्राप्त केली होती. ही ऊर्जा अल्प प्रमाणात निर्माण होत असल्याने ती पूरक स्वरूपात वापरली जात असे, मुख्य स्रोत म्हणून नव्हे. (९)
आरंभीस त्यांनी त्यासाठी मूळ आराखड्याचाच, त्याच्या अनेक स्तरीय रचनेचाच वापर केला होता. नवीन विवरे खोदताना, प्रत्येक वेळेस सुप्त ज्वालामुखीचे उगम शोधून, तिथे उष्णता कशी उपलब्ध होऊ शकेल ह्याचा विचार करूनच मग त्या आराखड्यातील अनेक स्तरीय कक्षांची, गुंफांची रचना केली जात असे. मात्र नंतरच्या पिढ्यांमधील अनेकांनी मूळ जागेपासून दूर जाण्यापेक्षा, अधिक खोलवर पण सुरक्षित ठिकाणी भुयारे खणण्याला प्राधान्य दिले होते. समुद्रतळाच्या खाली आता भुयारांचे, उपविवरांचे प्रचंड जाळे होते आणि ते दूरपर्यंत पसरले होते.
ह्या दीर्घकाळात आरंभीचा काळ केवळ तगण्याचा होता. पण काही पिढ्यांनंतर, त्यांची प्रगती वेगाने झाली होती. अर्थात ह्या स्थितीला पोहोचण्यासाठी त्यांनी बराच मोठा त्याग करावा लागला होता. त्यांची शारीरिक संरचना , शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता, वर्षानुवर्षे रुजलेल्या सवयीं, अन्न आणि अन्नभक्षण ह्या सर्वांमध्ये आमूलाग्र परिवर्तन होत गेले.
----
मणिमतीच्या विनाशानंतर विस्कटलेल्या लिंग गुणोत्तरामुळे त्यांची सामाजिक रचना पूर्णपणे अस्ताव्यस्त झाली होती; आणि ती एका पुरातन संघर्षाला आणि मोठ्या असंतोषाला कारणीभूत ठरण्याची शक्यता होती. पण ह्या संदर्भात, त्यांच्या नेतृत्वमंडळाने अत्यंत चतुराईने, किरणोत्सर्गाच्या आपत्तीचा वापर करून घेतला. नेतृत्वमंडळाच्या हे लक्षात आले होते की शरीरात भिनलेला आणि पर्यावरणात असलेला किरणोत्सर्ग, असंतोष आणि संघर्ष टाळण्यासाठी, लैंगिक असमतोलाच्या समस्येसाठी इष्टापत्ती ठरू शकतो. तेव्हां त्यांनी जाणीवपूर्वक उर्वरित प्रजेची अशी धारणा होऊ दिली की आपल्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी लैंगिक प्रजननापेक्षा, जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करूनच आपले अस्तित्व टिकवावे आणि वाढवावे लागणार आहे. अन्यथा पुढील पिढ्यांवर किरणोत्सर्गाचे परिणाम अत्यंत तीव्र असतील. ह्या मुळे प्रजनासाठी अनेक स्त्रियांमध्ये योग्य जोडीदार मिळविण्यासाठी जी स्पर्धा सुरू होऊ पाहत होती, ती अकस्मात कमी झाली आणि अनियंत्रित लैंगिक प्रजननाला एका प्रकारे आळा बसला.
जेव्हां ही धारणा प्रजेत रुजली, पसरली आणि ती स्वीकारली गेली, तेव्हां त्यांनी त्यांच्या जैवतंत्रज्ञानातील ज्ञानाचा पूर्ण उपयोग करून घेतला. शिवाय त्या क्षेत्रात नवीन संशोधनाला सुद्धा विशेष उत्तेजन दिले, चालना दिली. किरणोत्सर्गामुळे झालेल्या उत्परिवर्तनांचा अभ्यास करून नियंत्रित जैवतंत्रज्ञान विकसित केले गेले. त्यांनी त्या वेळी जे कठोर निर्णय तातडीने घेतले आणि राबवले, त्यामुळे त्यांना त्यंच्या संख्येतील लैंगिक असमतोलाला अल्पावधीतच आटोक्यात आणणे शक्य झाले.
----
पण तरीही मोठ्या प्रमाणात झालेला किरणोत्सर्ग संसर्ग आणि नंतर लगेचच समुद्रतळाखाली खोलवर, अत्यंत भिन्न पर्यावरणात वास्तव्य करावे लागल्यामुळे अमरारिंनी जे जैवशास्त्रीय भाकित केले होते, ते टळले नाहीच. निवातकवचांच्या शारीरिक संरचनेत प्रत्येक पिढीत सूक्ष्म परिवर्तन होतच गेले. काही अंशी त्यात जैव तंत्रज्ञानाशी संबंधित प्रयोगांचाही हातभार लागला होता. नंतरच्या पिढ्यांमध्ये, विशेषत: जे अधिक खोलवर राहत होते, त्यांच्यात त्या परिवर्तनाचे परिणाम तुलनेने लवकर आणि अधिकाधिक दृग्गोच्चर होऊ लागले. आणखी अनेक गोष्टी त्यांच्या त्या अतिवेगाने होणार्या उत्क्रांतीला कारणीभूत ठरल्या.
त्यातील एक प्रमुख होती अन्न व अन्नभक्षणाच्या सवयी.
समुद्रतळाच्या अन्नसाखळीवर आधारित अशी मणिमतीमधील त्यांची शेते आणि अन्नप्रक्रिया केंद्रे उद्ध्वस्त झाली होती. पण तरीही संचयित केलेले, प्रक्रिया केलेले काही अन्न शिल्लक होते. त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात घटली होती; त्यामुळे त्या संचयित अन्नावर त्यांना काही महिने काढणे शक्य झाले होते, पण त्यावर प्रचंड नियंत्रण असल्यामुळे त्यांना काही प्रमाणात अन्नाचे दुर्भिक्ष जाणवले होते. नंतर शैवालकक्षांचा व त्यात उत्पादित होणार्या अन्नाचा नियमित वापर होऊ लागल्यानंतर, अन्नाचे दुर्भिक्ष कमी होत गेले. पण काही पिढ्यांनंतर तो पर्याय सुद्धा अपुरा पडू लागला होता. मूळात समुद्रतळात खोलवर वास्तव्य केल्यामुळे, त्यांच्या अन्नभक्षणाच्या सवयीत जे आमूलाग्र बदल होत गेले, ते आधीच्या काही पिढ्यांनी स्वीकारले होते.
पण कालांतराने नवीन पिढ्यांतील विद्रोही वृत्तीच्या काही निवातकवचांनी, पूर्वीप्रमाणे समुदतळावर जाऊन जलचरांची शेती करण्यास आरंभ केला. त्याचे परिणाम विलक्षण वेगाने झाले. त्यांच्यात शारीरिक रचनेत इतरांपेक्षा अधिक वेगाने परिवर्तन झाले. तिथे उपलब्ध असणार्या खनिजांचा, वायुंचा सुयोग्य वापर करत, त्यांनी तिथल्या वातावरणाला, पर्यावरणाला, पूरक असणारी आणि तिथे साचणारे उत्सर्जित पदार्थ, त्याज्य पदार्थ, तिथे असणारे सूक्ष्मजंतू , तिथे उपलब्ध असलेले काही अपृष्ठवंशी प्राणी (invertebrates), तिथे वावरणारे, राहणारे काही मासे आणि इतर काही छोटे व नियंत्रित करता येतील असे मोठे जलचर, ह्या सर्वांची जीवनचक्रे एकत्र गुंफत, त्यांच्या वाढत्या संख्येला दीर्घकाळ नियमित स्वरुपात आणि पुरेसे अन्न प्राप्त होईल; अशी एक नवीन आणि गुंतागुंतीची नवीन अन्नसाखळी त्यांनी निर्माण केली होती, त्यांच्यापुरता त्यांनी अन्नाचा प्रश्न सोडविला होता.
पण ह्या अन्नभक्षणाच्या पद्धतींने सुद्धा, त्यांच्या शारीरिक संरचनेत होणार्या विलक्षण परिवर्तनात, मोठ्या प्रमाणात हातभार लावला होता.
एकंदर सर्वच निवातकवचांच्या शरीरांतर्गत असणार्या बहुसंख्य इंद्रियांनी त्या पर्यावरणातील गंधकाच्या, मिथेनच्या आणि अन्य काही घटकांच्या वाढलेल्या परिणामांशी जुळवून घेतले होते. पण ह्या नवीन जलचरांच्या शेतीमुळे, त्या जलचरांच्या शरीरात असणारा आणि रासायनिक संश्लेषणास हातभार लावणारा एक उपयुक्त जीवाणू , त्या निवातकवचांच्या पचनसंस्थेत नांदू लागला.
----
त्या खोल विवरात त्यांच्या शरीरावर पडणारा दाब प्रचंड अधिक होता (१०), शिवाय त्यांच्या नगरीतील प्रकाश मणिमतीच्या तुलनेत अंधुकच होता. आरंभीच्या काळात त्यांना, त्यांच्याकडे असलेली युद्ध-कवचे वापरूनच सतत वावरावे लागे. एका अर्थाने ते कवच त्यांच्या शरीराचा भाग होऊन गेले होते.
तिथल्या अतिअंधूक प्रकाशामुळे, त्यांच्या डोळ्यांचा आकार हळूहळू वाढत गेला. डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी, डोळ्यातच एक पटलही काही पिढ्यांनंतर विकसित झाले.
तिथल्या दाबापासून संरक्षण व्हावे त्यांना हालचाल करणे सोपे व्हावे आणि चयापचयासाठी कमीत कमी ऊर्जा वापरली जावी, म्हणून कदाचित त्यांच्या शरीरातील सापळ्याची, हाडांची घनता वाढली पण तरीही अनेक हाडांची संरचना अधिकाधिक लवचिक होत गेली, कूर्चांचे प्रमाणही वाढले. (११)
मणिमतीत सुद्धा पाण्यात विरघळलेला प्राणवायू (Oxygen) मूळातच कमी होता, पण तिथे त्यांच्या कानामागील कल्ल्यांमधून, त्यांना जो प्राणवायू मिळत होता, तो त्यांची प्राणवायूची गरज भागवत होता. पण आता समुद्रात अधिक खोल गेल्यावर, जेव्हां प्राणवायूचे प्रमाण आणखी कमी झाले आणि संपूर्णपणे निर्माण केलेल्या प्राणवायूवर त्यांना विसंबून राहावे लागले, तेव्हां त्यांच्या शरीरात हळूहळू बदल होऊ लागले. समुद्रतळावर जाण्यची वेळ फारशी येत नसल्याने, ज्यांच्या कानामागच्या कल्ल्यांचा वापर होत नसे, त्यांच्या पुढच्या पिढींमध्ये त्या कल्ल्यांचा हळूहळू लोप होत गेला. पण त्या व्यतिरिक्त एक अनपेक्षित आणि निर्णायक परिवर्तन त्यांच्या नंतरच्या पिढ्यांत होत गेले. ते होते अवायूश्वसन (Anaerobic Respiration) (१२).
पूर्वीसुद्धा क्वचितप्रसंगी ते अवायूश्वसन (Anaerobic Respiration) करत असावेत, कारण त्यांच्या दीर्घस्मृतीत, तसे तुरळक उल्लेख होते. त्यावेळी त्या क्षमतेचा विशेष वापर करण्याची वेळ येत नसावी. पण आता ती क्षमता अधिक कार्यक्षम होऊ लागली होती. कल्ल्यांचा लोप होऊ लागल्यावर, त्यांच्या शरीरात सुप्तावस्थेत असणारी काही जनुके (genes) सक्रिय होऊ लागली. त्यानंतर त्यांच्या अंतर्श्वसनयंत्रणेत आणि श्वसनासंबंधीच्या त्यांच्या बाह्य इंद्रियातही पुन्हा एकदा विलक्षण परिवर्तन होत गेले. त्यांच्या नाकाचे कार्य गौण होऊ लागले होते आणि नाकाचा आकार लहान होत गेला. काही पिढ्यांनंतर तर त्यांच्यातील कित्येकांच्या नाकाच्या जागी केवळ दोन छिद्रे उरली होती.
शरीरात भिनलेला आणि आरंभीच्या काळात सहावा लागणारा किरणोत्सर्ग आणि नंतर पर्यावरणात झालेल्या प्रचंड परिवर्तनाचा अटळ परिपाक, अनुवंशिक उत्परिवर्तनात (Genetic mutations) होणे अस्वाभाविक नव्हते. कित्येक पिढ्यानंतर त्यांच्या अनेक गुणसूत्रात आणि शारीरिक आणि आंतरिक संरचनेत, जे स्थायी स्वरुपाचे परिवर्तन झाले, ते त्या परिस्थितीत अटळच होते.
त्यांच्या रक्ताचा रंग आणि रक्तातील घटकही पालटत गेले. सुरुवातीस त्यांच्या रक्ताच्या रंगात फिकटशी जांभळी छटा आली (१३) . विरघळलेला प्राणवायू वाहून नेण्याची त्या रक्ताची क्षमता प्रचंड वाढली होती.
त्यांच्या त्वचेचा रंग सुद्धा बदलत गेला आणि त्यात निळसर-काळसर झाक वाढू लागली. त्यांच्या शरीरावर, शरीराला घट्ट चिकटून असणारे जे कवच सदैव असायचे, त्यामुळे कवचातील प्रथिनांचे व खनिजांचे संश्लेषण त्यांच्या त्वचेच्या पेशींमध्येच होऊ लागले. आणखी काही शतकांनी ते कवच जणू त्यांच्या शरीराचा अविभाज्य भागच झाले होते. काही पिढ्यांनंतरची संततीच्या त्वचेवर जन्मत:च कठीण थर दिसू लागले. कदाचित त्यामागे जैवतंत्रज्ञानाचा हात असावा, पण त्याची माहिती गुप्त ठेवली गेली होती.
त्यांच्या शरीरावरील केस हळूहळू नाहीसे होत गेले. आता त्यांच्या त्वचेला एखाद्या धातूसारखा गुळगुळीतपणा आला होता.
त्यांच्या डोक्याचा, चेहर्याचा आकार बदलला. जबड्याची, दातांची रचना बदलली. सर्वांचीच शारीरिक उंची कमी होत गेली होती, पण जे कधीही विवर सोडून बाहेर पडले नाहीत, त्यांची शारीरिक उंची तर अधिकच वेगाने कमी होत गेली.
मर्यादित टेलीपथी (दूरमनोसंप्रेषण) ची क्षमता त्यांच्यात पूर्वीपासून सुप्त स्वरूपात असावी. पण त्यांच्या नव्या नगरीत संपर्क साधण्याची प्रभावी यंत्रणा नसल्याने आणि त्यांच्या मेंदूत, चेतासंस्थेत जे परिवर्तन होत गेले त्यानंतर, ती शक्ती आता अधिक वेगाने आणि तीव्र पद्धतीने विकसित होऊ लागली होती. ह्याच काळात त्यांच्या मेंदूतील संवेदन व संप्रेषणाशी निगडित भाग अधिक विकसित झाला आणि मेंदूचा आकारही काही प्रमाणात वाढू लागला. वाढत्या मेंदूला सामावून घेण्यासाठी, स्वाभाविकच त्यांचे डोकेही बरेच मोठे होऊ लागले.
काही निवातकवचांची टेलीपथी तर इतकी विकसित झाली होती की त्यांना संवाद साधण्यासाठी बोलावे लागत नसे. त्यांच्या मनातील विचार ते थेट दुसर्याच्या मनात प्रक्षेपित करू शकत होते.
ह्याच सुमारास एक विलक्षण गोष्ट घडली. त्यांच्यातील एक विद्रोही तरुणांचा गट, कुतुहलापोटी समुद्रात विविध ठिकाणी आणि विविध स्तरांवर भ्रमण करून आणि काही काळ व्यतित करून परत आला. त्यानंतर, गेल्या पाच सहस्रकांमध्ये न घडलेली गोष्ट घडली....
---------------------------------------
सहलेखक : विकास द. बापट आणि बिंग को-पायलट
=======================
अवांतर :
(८) Self Healing Concrete आणि Biomineralization किंवा Microbial mineralization ह्या विषयी इंटरनेटवर सविस्तर माहिती उपलब्ध आहे. ज्यांना स्वारस्य आहे; ते ती शोधू शकतात.
(९) Piezoelectric crystal चा वापर करून सर्वसाधारणत: अल्पप्रमाणात ऊर्जानिर्मिती होऊ शकते. अशा 'रत्नाचा' प्रकार कोणता आहे, त्यावर किती दाब पडत आहे, त्यावर निर्माण करता येणार्या ऊर्जेचे मान ठरत असले, तरीही सर्वसाधारणत: त्या ऊर्जेचे मान माईक्रोज्यूल्स मध्ये मोजता येईल इतकेच असते. अर्थात अधिक मोठ्या स्तरावर ऊर्जानिर्मिती करण्यासाठी, त्या 'रत्नांचे' सतत आकुंचन, प्रसरण आवश्यक आहे. शिवाय अशा 'रत्नांचा' एक विशेष विन्यास (e.g. 3D arrays / Stacked structures) निर्माण करावा लागेल आणि निर्माण झालेली ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी तितक्याच उत्तम प्रकारची साधने (e.g. Supercapacitors) लागतील. अधिक माहिती इंटरनेटवर.
(१०) सर्वसाधारणत: (अर्थातच पृथ्वीवर) समुद्रसपाटीवर वातावरणाचा भार (दाब --> एकक bar) एक असे धरले, तर जसजसे आपण समुद्रात खोल जातो, तसतसा साधारण प्रत्येक १०.३ मीटरनंतर हा भार १ एककाने वाढतो, असे निरीक्षण आहे. अर्थात अन्य काही घटक ह्या गणितावर परिणाम करतात (उदा. तापमान, क्षारता, स्थानिक गुरुत्वाकर्षण आदि).
अधिक कुतुहल असणार्यांसाठी :
१ bar (बार) = १,०१,३२५ Pa (पास्कल) = ७६० mm Hg (पारा) = १४.६९६ psi (Pounds per Square Inch).
१ पास्कल = १ N/m^2 (न्यूटन प्रति चौ.मी.)
उपलब्ध माहितीनुसार, समुद्रातील दाब पुढीलप्रमाणे आहे :
भरतखंडालगत ३०० ते ४०० बार,
अमेरिकेजवळ कित्येकदा ६०० बार पर्यंत,
Mariana Trench च्या मुखाजवळ साधारण ६०० बार,
'Challenger Deep' ह्या नावाने ओळखल्या जणार्या Mariana Trench मधील सर्वात खोल ठिकाणी १०८६ बार,
Tonga Trench मधील सर्वात खोल ठिकाणी तो १०८० बार इतका आहे,
Philippine Trench मध्ये १०५४ बार
Kuril–Kamchatka Trench : १०५० बार
Kermadec Trench : १००५ बार आदि.
'Challenger Deep' पर्यंत काही जण विशेष 'जलयाना'त बसून जाऊन आले आहेत; मात्र Scuba Diving चा विक्रम केवळ ३३२.३५ मीटर्सचा, (अर्थात दाब साधारण ३० बार) चा आहे. कोणतेही साधन न वापरता, श्वसननियंत्रणाचे विशेष कौशल्य वापरून २५३ मीटर्स, (साधारण २४.५६ बार) इतक्या खोल समुद्रात जाऊन आल्याचे केवळ एक उदाहरण आहे; आणि त्यांचे दुष्परिणाम काय झाले त्यांची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.
ह्यावरून निवातकवचांच्या नव्या नगरीत किती दाब सहन करावा लागत असावा ह्याची साधारण कल्पना येऊ शकते. थोडक्यात, विवरात राहणाऱ्या निवातकवचांवर पृथ्वीवरील सर्वात खोल समुद्राइतका भार सातत्याने पडत होता.
(११) समुद्रात खोलवर राहणार्या जीवांमध्ये घडणारे परिवर्तन (अर्थात Deep-sea adaptations ) ही एक सर्वसामान्य गोष्ट आहे. ह्या मध्ये जैवप्रकाश, मोठे डोळे, लवचिक शरीर, शरीरातील सापळ्यात होणारे परिवर्तन, तात्पुरते छद्मरुप (Camouflage) आदि अनेक गोष्टींचा समावेश होतो. तिथला दाब, तापमान, प्रकाशाचा अभाव आदि गोष्टींमुळे हे घडते; असे सध्याचे विज्ञान सांगते. समुद्रतळापेक्षाही अधिक खोल जागी गेल्यावर जी उत्क्रांती झाली त्यात ह्या पैकी काही गोष्टी निवातकवचांमध्ये घडल्या असे इथे दाखविले आहे.
(१२) अवायूश्वसन (Anaerobic Respiration) : प्राणवायू विरहित श्वसनास ‘अवायु-श्वसन’ असे म्हणतात. श्वसनासाठी जेव्हां उपलब्ध प्राणवायू पुरेसा पडत नाही, तेव्हां चयापचय क्रियेसाठी अतिशय प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे चयापचय क्रियेसाठी आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्याचे काम काही पेशी करतात. ह्या प्रक्रियेत पेशीतल्या साखरेचे (ग्लुकोजचे) विघटन करून ही ऊर्जा मिळवली जाते. ह्याविषयी इंटरनेटवर भरपूर माहिती उपलब्ध आहे. ही प्रक्रिया सामान्यतः सूक्ष्मजीवांमध्ये आढळते, पण विपरीत परिस्थितीमुळे कदाचित, पण मोठ्या जीवांमध्ये दुर्मिळ असणारी ही क्षमता निवातकवचांनी आत्मसात केली.
(१३) Hemocyanin (Coppe based) नावाचे एक प्रथिन अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये आढळते. ह्याच्यामुळे रक्ताला काहीशी जांभळी छटा येते. ह्या प्रथिनाची प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता हिमोग्लोबिनपेक्षा कमी आहे, पण Hemocyanin रक्तातील विशिष्ट पेशींमध्ये असण्याची गरज नसल्याने, अर्थात ते रक्तद्रवात थेट सामावू शकत असल्याने, अतिशीत तापमानात आणि जिथे प्राणवायू मर्यादित प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो, अशा ठिकाणी ते हिमोग्लोबिनपेक्षा अधिक उपयुक्त ठरते. त्याचे काही लाभ असले तरीही एकंदर त्याचे तोटे अधिक आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे अशा प्रण्यांच्या हालचाली तुलनेने संथ असतात.
========================
=====
क्रमश:
=====


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा