बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

पृथ्वीबाह्य कुंडली आणि शक्यता - भाग ५

 

Stellarium हे सॉफ्टवेअर वापरुन चंद्रकेंद्रीत कुंडली मांडता येते, ह्याचाच अर्थ 'आपल्या' सूर्यमालेतील कोणत्याही ग्रहावरची कुंडली आपल्याला मांडता यायला हवी. 


====


मानवी वसाहती होऊ शकतील अशी रचना / संरचना असलेला, चंद्रानंतरचा दुसरा ग्रहगोल कोणता; ह्याचे स्वाभाविक उत्तर मंगळ आहे. 

शुक्र हा अतितप्त आहे, 

बुध त्याच्या सूर्यनिकटतेमुळे शब्दश: भाजून निघत असतो,

आणि गुरु व शनि वायुरूप आहेत, 

लघुग्रह, बटूग्रह वा शनिपलीकडच्या ग्रहांचा (अर्थात हर्षल, नेपच्यून व प्लूटो) किंवा गुरु, शनि ह्यांच्या उपग्रहांचा मंगळाइतका अभ्यास झालेला नाही. 


----

पण त्या आधी आणखी एक शक्यता विचारात घ्यायला हवी जी निकटच्या काळात संभवते. 

अवकाशस्थानकात एखाद्या व्यक्तीचा जन्म होणे. 

सध्याचे आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानक (ISS) समुद्रसपाटीपासून ३३० कि.मी. उंचीवरून भ्रमण करते. 

इतक्या उंचीवर पृथ्वीवरील अक्षांश, रेखांश लागू होऊ शकतात का ? 


ह्याच प्रश्नाचा विस्तार केला आणि असे म्हटले की समजा एखादे अंतराळयान मंगळाकडे मार्गक्रमणा करत आहे आणि त्या अंतराळयानातून एक गरोदर स्त्री प्रवास करत आहे, आता जर पृथ्वी सोडल्यापासून साधारण सात महिन्यांनंतर, पण  मंगळाच्या कक्षेपासून बर्‍यापैकी दूर असताना वाटेतच त्या स्त्रीची प्रसूती झाली, तर तिच्या अपत्याची कुंडली तयार करण्यासाठी (पर्यायाने गणितासाठी) कोणती संदर्भचौकट वापरावी ? 


एक अन्य उदाहरण म्हणून New Horizons ह्या मानवरहित अंतराळयानाचे देता येईल. ह्या यानास गुरुची कक्षा ओलांडल्यापासून, शनीची कक्षा ओलांडेपर्यंत १६ महिने लागले होते.

भविष्यात ह्या काळात समागमापासून,प्रसूतीपर्यंत सर्व घटना घडू शकतात. 


ह्याच प्रश्नाचा आणखी विस्तार केल्यास, दोन तार्‍यांमधील (पर्यायाने दोन भिन्न सूर्यमालांमधील) अंतराळात झालेल्या जन्मांबाबत विचार होऊ शकतो. 

----


----

मानवी वसाहतींसाठी चंद्रानंतर सर्वात योग्य आहे मंगळ असा उल्लेख वर केला आहे, आणि त्यामागे कारणेही तशीच आहेत. 


ज्योतिषगणिताच्या व संभाव्य फलिताच्या दृष्टीने विचार केल्यास

मंगळ पृथ्वीपेक्षा आकाराने लहान आहे (पृथ्वीच्या निम्म्यापेक्षा थोडा अधिक) 

मंगळाला परिवलनासाठी (२४ तास ३७ मिनिटे) जवळजवळ पृथ्वीइतकाच वेळ (२३ तास ५६ मिनिटे) लागतो, त्याच्या आसाचा कल (२५॰ ११') पृथ्वीच्या आसाच्या कलाच्या (२३॰ २६') जवळपास आहे. 

त्याचे वर्ष (परिभ्रमण काल) मात्र पृथ्वीपेक्षा बरेच मोठे आहे. (पृथ्वी ३६५ दिवस, मंगळ (पृथ्वीचे) ६८७ दिवस. 

मंगळाला दोन उपग्रह (चंद्र) आहेत. मात्र हे दोन्ही आकाराने बरेच लहान असल्याने त्यांच्यामुळे खग्रास सूर्यग्रहण संभवत नाही. 

मात्र दोन्ही उपग्रहांना मंगळामुळे खग्रास ग्रहण संभवतेच, पण मंगळाच्या एका उपग्रहाला, दुसर्‍या उपग्रहामुळे देखील ग्रहण (पिधान युती - Occultation) लागते. 




ह्या सर्व गोष्टी मंगळावरील ग्रहसाधन, भावसाधन करताना विचार घ्याव्या लागतीलच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कालनिर्णय व फलित ह्या दृष्टीने त्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. 


विशोंत्तरी महादशेसाठी चंद्रच का ? अशा अर्थाची एक पोस्ट नुकतीच प्रकाशित झाली होती, त्यावेळी चंद्र मनाचा कारक, पाण्याचा कारक (मानवी शरीरात असलेले पाण्याचे मोठे प्रमाण) अशा अर्थाची उत्तरे आली होती. पृथ्वीच्या संदर्भचौकटीत ही उत्तरे बरोबर असतीलही, पण मंगळाच्या संदर्भचौकटीत, आपण पृथ्वीचा चंद्र कालनिर्णयासाठी वापरू शकू असे वाटत नाही. मग दशापद्धतीचा कालनिर्णया तिथे वापरता येईल का ? आणि त्यासाठी कोणते बीज वापरायचे ? 


त्यामुळे विशोंत्तरी महादशेसाठी (पर्यायाने कालनिर्णयासाठी) पृथ्वीवर चंद्रच का वापरला जातो; ह्याचे काही अन्य उत्तर आहे का ह्याचा व्यवस्थित शोध घ्यावाच लागेल.  अन्यथा मंगळावर महादशा ठरविताना, बीज म्हणून कोणता एक ठराविक उपग्रह वापरावयाचा की अन्य काही तर्कशास्त्र वापरायचे, ह्याचा निर्णय घेता येईल असे वाटत नाही. 


पृथ्वीकेंद्रीत पत्रिकेत आपण राहू, केतू ह्या पातबिंदूंचा समावेश केला आहे. (पृथ्वीची परिभ्रमण कक्षा जिथे चंद्राच्या पृथ्वीभ्रमण कक्षेस छेदते ते बिंदू)

मंगळकेंद्रीत पत्रिकेत दोन उपग्रहांमुळे, चार पातबिंदू होतील, ह्यांचा विचार कसा करणार ? 


आणि तीन वा त्याहून अधिक उपग्रह असलेल्या ग्रहावर पत्रिका मांडताना किती पातबिंदू विचारात घ्यावे लागतील ? 


पृथ्वीवरील नक्षत्रचक्र व पर्यायाने राशीचक्र हे चंद्राच्या मार्गाशी संबंधित आहे. मंगळाला दोन उपग्रह आहेत, मग इथे राशीचक्र, नक्षत्रचक्र कोणत्या उपग्रहावर आधारित ठरवावे ?  सर्वाधिक निकट असलेल्या, आकाराने, वस्तुमानाने सर्वात मोठ्या असलेल्या ? 

हा जो काही निकष ठरविला जाईल तो इतर सर्व ग्रहांच्या बाबतीत आपण कायम ठेवू शकू का ? 


----


आकाशगंगेत एकमेकांभोवती अथवा अंतराळातील एखाद्या बिंदूभोवती (संयुक्त गुरुत्वमध्य - Barycenter) घिरट्या घालणारे तारकासमूह आहेत. 

उदा. 

द्वैती (Binary) [Sirius अर्थात व्याधतारा], 

त्रैती (Trinary) [Alpha Centauri म्हणजेच आपल्याला सर्वात जवळ असणारा 'मित्र' तारा], 

चतुष्टक (Quadruple) [Rigel अर्थात राजन्य, Capella अर्थात ब्रह्महृदय]

तारकापंचक (Quintuple) [मृग नक्षत्रातील Mintaka]

तारकाषष्टक (Sextuple) [पुनर्वसू नक्षत्रातील अश्विनीकुमारांपैकी एक Castor] 

तारकासप्तक (Septuple) [शर्मिष्ठा तारकापुंजातील AR Cassiopeiae]


ह्यापैकी काही तार्‍यांना स्वत:च्या ग्रहमाला आहेत, काहींना सामयिक ग्रहमाला आहेत. 

इथे ग्रहगणित आणि फलित किती गुंतागुंतीचे होईल, ह्याची सध्यातरी आपण केवळ कल्पनाच करू शकतो. 


दूरच्या ग्रहमाला, तारामाला ह्यांच्यासाठी नक्षत्रचक्र, राशीचक्र हे तर नव्याने रचावे लागेलच, पण अनेक 'सूर्य' असणार्‍या एकापेक्षा अधिक तार्‍यांभोवती घिरट्या घालणार्‍या ग्रहासाठी, अशा ग्रहमालांमध्ये मूळात क्रांतीवृत्त कसे ठरवावे, हाच जटिल प्रश्न असेल. 


----


आत्तापर्यंतच्या ऊहापोहातून काही गोष्टी स्पष्ट होतात प्रत्येक गोलावरचे ग्रहसाधन व भावसाधनच नव्हे, तर कालनिर्णयाची साधने व फलितकथन प्रक्रिया देखील वेगळी असणार आहे. पण ह्याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी ती शून्यातून उभारायला लागेल असे नव्हे. 

ग्रहसाधन, भावसाधन, कालनिर्णय आणि फलितनिश्चिती ह्यांच्यासाठी काहीएक मार्गदर्शक तत्वे अथवा नियम अथवा सूत्रे असणे आवश्यक आहे. 


पृथ्वीवरच्या फलितकथनासाठी, आपण मानवी बुद्धीच्या, मनाच्या, शरीराच्या विविध गुणधर्मांचे, विविध क्षमतांचे, मर्यादांचे Mapping (ह्यासाठी योग्य मराठी शब्द सापडला नाही, मानचित्रण हा योग्य शब्द नव्हे) केले आहे. 

आणि हे Mapping भाव, राशी, नक्षत्रे, ग्रह, योग आदी सर्वांवर झाले आहे. 


हे Mapping करताना जे काही तर्कशास्त्र वापरले गेले आहे ते आपल्याला पूर्णपणे ज्ञात नाही. 

Mapping साठीचे हे तर्कशास्त्र ग्रहांच्या, स्थिर तार्‍यांच्या, तारकापुंजांच्या, 

जन्माशी, स्थानाशी, वेगाशी, कक्षांशी, कक्षाप्रतलांशी, रासायनिक संरचनेशी, वातावरणाशी, चुंबकीय क्षेत्राशी, गुरुत्वाकर्षण वा अन्य ज्ञात-अज्ञात बलांशी, प्रारणांशी अथवा त्या खगोलीय वस्तूच्या अन्य एखाद्या गुणधर्माशी निगडीत असू शकते.  



कदाचित ते तर्कशास्त्र ह्यातील एक वा अनेक घटकांच्या एकत्रित परिणामांशी, मेळ खाणारे देखील असू शकते. 

हे तर्कशास्त्र समजल्याविना, कोणतीही पृथ्वीबाह्य कुंडली (अगदी आपल्या सूर्यमालेतील अन्य ग्रहावरची कुंडली सुद्धा)  मांडल्यावर, तर्कशुद्ध / वास्तवाशी मेळ असणारे फलितकथन निव्वळ अशक्य आहे. 

अन्यथा केवळ निरीक्षण व अभ्यासातून फलितकथन शक्य व्हावे किंवा होईल, असे वाटत असल्यास, त्यासाठी प्रत्येक पैलूचा, खूप खोलवर व कदाचित आणखी कित्येक शतकांचा अभ्यास व्हावा लागेल. 


----


उदा. 

ग्रहांच्या वयाबाबत बुध कुमार, शनि वृद्ध ही धारणा त्या ग्रहांच्या जन्मकथेशी निगडीत आहे, 

म्हणजे आपल्या ग्रहमालेतील शनि ह्या ग्रहाचा 'जन्म' सर्वप्रथम झाला आणि बुध हा सर्वात उशिरा जन्मलेला ग्रह आहे  

असे मानल्यास, 

शनिच्या आणि बुधाच्या पौराणिक जन्मकथांनुसार वास्तवात काय घडले असावे, ह्याचा किमान तर्क करता यायला हवा.

भले मग सध्याच्या खगोलशास्त्रीय ज्ञानानुसार तो सध्या सिद्ध होऊ शको वा न शको. 


किंवा 


चंद्राची चंचलता आणि शनीची स्थिरबुद्धी त्यांच्या भ्रमणमार्गाशी, गतीशी साधर्म्य राखून आहे असे मानल्यास,

शुक्र, हर्षल, नेपच्यून, प्लुटो ह्यांच्या भ्रमणमार्गाचा, गतीचा देखील तसाच संबंध जोडता आला पाहिजे.

म्हणजे हर्षल त्याच्या भ्रमणमार्गावर लोळतलोळत (त्याचा आस जवळजवळ ८३॰ कललेला आहे) सूर्यप्रदक्षिणा करतो, ह्याचा दृश्य परिणाम म्हणजे हर्षलचा अति-तर्‍हेवाईकपणा का ? 


अथवा



जवळजवळ सर्व ग्रह, (पृथ्वीनिष्ठ) क्रांतीवृत्ताशी साडेतीन अंशापेक्षा कमी कोनातून परिभ्रमण करतात, थोडक्यात ते सूर्याभोवती साधारण एकाच प्रतलात भ्रमण करतात, अपवाद केवळ बुध (७॰) व विशेष करून प्लुटोचा (१७॰). ह्या गोष्टींचा त्या ग्रहांच्या गुणधर्माशी काही संबंध जोडता येतो का ?


किंवा 



पृथ्वीसकट इतर सर्व ग्रह घड्याळाच्या विरुद्ध दिशेने परिवलन करतात,मात्र शुक्र, हर्षल व प्लुटो हे तीनच ग्रह घड्याळाच्या दिशेने परिवलन करतात. परिवलनाची ही दिशा आणि ह्या तीन ग्रहांमध्ये विशिष्ट स्थितीत, सुप्त वा प्रकट अवस्थेत असणारा उच्छृंखलपणा, ह्यांचा संबंध आहे असे आपण म्हणू शकतो का ? 


----


प्लुटोचा समावेश बटुग्रहांमध्ये होऊन काही वर्षे लोटली, पण आजही मेदिनीय कुंडलीतच नव्हे, तर व्यक्तिगत कुंडलीतही, आपण प्लुटोचा विचार करतो, कारण प्लुटोच्या फळांची प्रचिती आली आहे, येते आहे. 

पण त्याचवेळी प्लुटोपेक्षा वस्तुमान, आकारमान, गुरुत्वाकर्षण अधिक असलेला Eris आपण विचारात घेत नाही, ह्या मागे काय कारण असावे ? त्याचा उपसूर्यबिंदूदेखील प्रचंड दूर आहे हे ? 


मग त्याच न्यायाने Ceres (ह्या लघुग्रहाचा विचार त्याच स्तरावर का केला जात नसावा ? तो तर पृथ्वीला बराच जवळ आहे. मग त्याच्या बाबतीत त्याचे तुलनेने कमी असलेले वस्तुमान, आकारमान निर्णायक ठरते का ? 


ह्याचा एक अर्थ असा होता का, की फलितासाठी कोणत्या ग्रहगोलांचा विचार करावा, प्राधान्य द्यावे ह्याचे, त्या ग्रहाच्या भौतिक गुणधर्मांशी, खगोलनिष्ठ गुणधर्माशी काहीतरी नाते आहे ? 

आणि असे नाते जर असेल तर अद्याप त्या नात्याचा शोध घेतला गेला नाही आहे. 

किंवा तसा शोध घेतला गेला असल्यास ते नाते सूत्रबद्ध रितीने मांडता आले नाही आहे.


हाच प्रकार धूमकेतूंच्या संदर्भातही सत्य आहे. धूमकेतू दिसल्याच्या आणि तो अशुभसंकेत असल्याचा, वा तदनंतर तत्सम काही घटना घडल्याच्या कथांमध्ये तथ्य असेल, 

तर धूमकेतूचा आकार, त्याची दीप्ती, त्याचा भ्रमणमार्ग हे फलितदृष्ट्या महत्त्वाचे घटक आहेत का हे ठरविण्याचा प्रयत्न झाला आहे का ? 


----


कोणत्याही पृथ्वीबाह्य कुंडलीत, फलितनिश्चितीसाठी, कालनिर्णयासाठी  कोणते ग्रहगोल वा त्यांचा समुच्चय विचारात घ्यावा, कुणाला प्राधान्य द्यावे आदि गोष्टी ठरविताना, भौतिक, खगोलशास्त्रीय तथ्यांशी सांगड घालणार्‍या, अशा प्रकारच्या मार्गदर्शक तत्वांची, नियमांची, सूत्राची आवश्यकता पडणार आहे.  

 

वर म्हटल्याप्रमाणे, आपण ग्रहगोलांवरती, राशींवरती, नक्षत्रांवरती, विविध गुणधर्माचे mapping केले, मात्र त्याचा खगोलशास्त्रीय तथ्यांशी, गुणधर्माशी संबंध जोडण्याचा फारसा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. 

आणि असा प्रयत्न केल्याविना, कोणत्याही पृथ्वीबाह्य कुंडलीच्या फलितनिश्चितीत, फलितकथनात तर्कशुद्ध अचूकपणा आणता येईल असे मलातरी वाटत नाही.  


==========

थोडेसे अवांतर

==========

अवकाशस्थानकात अंतराळयात्री वजनरहित अवस्था (अचूकपणे विचार केल्यास हे सूक्ष्म गुरुत्वाकर्षण असते, शून्य गुरुत्वाकर्षण नव्हे) अनुभवतात, तिथे एखादा जन्म शक्य आहे का ? हा प्रश्न अनेक उपप्रश्नांना जन्म देतो. 

अवकाशस्थानकापर्यंतचा प्रवास एखाद्या गरोदर स्त्रीस जमू शकेल ?

किंवा अवकाशस्थानकात मानवी गर्भाची वाढ व्यवस्थित होऊ शकेल ?  

किंवा अवकाशस्थानकात राहणार्‍या एखाद्या स्त्रीला (समागम होऊन) तिथेच दिवस जाणे शक्य आहे ? 

किंवा बाह्यफलन वा अन्य तंत्राने एखाद्या स्त्रीला तिथे एखाद्या बालकास जन्म देणे जमेल ?

 

ह्या सर्व प्रश्नांची आज ठामपणे उत्तरे देणे शक्य नाही, कारण जीवाचा धोका लक्षात घेता, मानवाच्या संदर्भात असे प्रयोग करण्यासाठी कुठल्याही सरकारला जनमत 'तयार' करावे लागेल.  

पण खासगी क्षेत्रात असे प्रयोग होऊ शकतात. 


आजपर्यंत काही कीटकांच्या, जलचरांच्या संदर्भात असे यशस्वी प्रयोग झाले आहेत आणि त्यांची संतती जगली, वाढली आहे. 

सस्तन प्राण्यांच्या (उदा. उंदीर) बाबतीत, कानाच्या मागे असणार्‍या आणि शरीराचा समतोल राखणार्‍या यंत्रणेबाबत काही त्रुटी निर्माण होत असल्या, किंवा इतरही काही अडथळे असले, तरीही पृथ्वीवर परतल्यावर काही काळाने ह्या त्रुटी काही प्रमाणात कमी होतात असे आढळले आहे. भविष्यकाळात ह्या त्रुटी, अडथळे पूर्णत: दूर करण्यातही यश मिळेल. 


============


=======

समाप्त 

=======

===============


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा