रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

कालकुपी - ५ / ५

भविष्यात कालकुपी सापडूनही, तिचा योग्य उपयोग होऊ शकेल याची जराही शाश्वती नसताना मानवाने आज हा खटाटोप करावा का ?  मूळात आपल्याला सापडलेले सर्व ज्ञान, भविष्यातील संस्कृतीस सहज मिळावे आणि त्यांची वेगाने प्रगती व्हावी असे आपल्याला का वाटते ?  किंवा का वाटावे ? अशा प्रकारे भविष्यातील त्या संस्कृतीच्या प्रगतीचे Fast Tracking करून, त्यांना तंत्रज्ञानाचा Crash Course देऊन, एका अर्थाने आपण, त्या भविष्यातील संस्कृतीचा वेगाने नाश होण्याची बीजे तर रोवत नाही ना ?  कुठलीही संस्कृती टिकण्याचा, विकसित होण्याचा निसर्गाने नेमून दिलेला मार्ग टाळून,  आपण त्यांना जो शॉर्टकट देऊ पाहात आहोत, तो खरंच योग्य ठरेल ना ? ---- मागील भागावरून पुढे ----

आपले संपूर्ण आणि सर्व प्रकारचे ज्ञान साठविण्याच्या आणि हस्तांतरीत करण्याच्या काही अभिनव पद्धतींवर देखील संशोधन सुरू आहे. त्यात

१) कृत्रिम DNA चा वापर करून त्यांच्यामध्ये ज्ञान साठविणे आणि कालांतराने ते पुन्हा उपलब्ध करता येणे. https://en.wikipedia.org/wiki/DNA_digital_data_storage

२) वनस्पतींचा ज्ञानसंचयासाठी उपयोग करणे
https://en.wikipedia.org/wiki/Plant-based_digital_data_storage

३) मानवी मेंदूचा वापर करून कृत्रिम पद्धतीने त्यात ज्ञान साठविण्याच्या पद्धती विकसित करणे
http://www.sciencealert.com/scientists-build-an-artificial-neuron-that-fully-mimics-a-human-brain-cell

या आणि अशा प्रकारच्या प्रचंड गुंतागुंतीच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमध्ये विलक्षण यश मिळाल्यास, निकटच्या भविष्यात,  कालकुपीची
निर्मिती, मुद्दामहून करण्याची कदाचित आवश्यकताच राहणार नाही.  कृत्रिम DNA चे मानवामध्ये, इतर प्राण्यांमध्ये रोपण करणे आणि पुनरुत्पादनाच्या माध्यमातून त्या DNA मधील ज्ञान, पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत होत राहणे हा टप्पा देखील गाठला जाऊ शकतो. कदाचित एखाद्या वनस्पतीच्या बीजामध्ये रोपण केलेले ज्ञान सूर्यमालेत सर्वत्र 'रुजू' शकते.  मानवी मेंदूंचे नेटवर्क तयार करून,आवश्यकता असेल त्याप्रमाणे त्या ज्ञानाची देवाण-घेवाण होऊ शकते किंवा आपत्कालीन परिस्थितीत, एका मेंदूतील ज्ञान, विशिष्ट ठिकाणी साठविण्याची व्यवस्था देखील निर्माण केली जाऊ शकते.

प्रचंड मोठा प्रवास  करून आपण उत्क्रांतीच्या या टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे ज्ञानाची, विज्ञानाची, तंत्रज्ञानाची नवनवी आव्हाने आपल्याला खुणावत आहेत. अशा वेळेस एखाद्या आकस्मिक संकटामुळे, Extinction Event मुळे उत्क्रांतीच्या शिडीवर, पुन्हा पहिल्या पायरीपासून आरंभ करावा लागू नये ही इच्छा चुकीची नव्हे.  आपली संस्कृती, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान जपण्याचे, टिकवण्याचे प्रयत्न, प्रत्येक वेळेस नैतिकतेच्या तराजूत तोलले पाहिजेत असे नाही, हे काही प्रमाणात खरे आहे, पण त्याचवेळी 'आपण खरंच शून्यातून सुरुवात केली आहे का' याचा मागोवा घेणे देखील तितकेच आवश्यक आहे.

====

आत्तापर्यंतच्या लेखातून, कालकुपीच्या विविध पैलूंचा, त्यामधील संभाव्य वस्तूंचा आढावा घेताना, कुठेतरी एक धागा प्राचीन संस्कृतीच्या ज्या काही पाऊलखुणा जपल्या गेल्या आहेत, सापडल्या आहेत, तिथे जाऊन मिळतो असे म्हटले तर ते चूक नव्हे. प्राचीन संस्कृतींनी त्यांचा इतिहास दगडाच्या, काहीवेळा धातूच्या माध्यमातून अधिक जपलेला दिसतो.  अनेक प्राचीन संस्कृतीशी निगडीत कथांमध्ये उल्लेख असलेल्या 'चमत्कारांच्या',  वैज्ञानिक प्रगतीच्या, असंख्य खुणा दिसतात. पण त्या वैज्ञानिक प्रगतीचे, तंत्रज्ञानाचे आपल्याला अपेक्षित असलेले नमुने, लिखाण आढळत नाही याचे नक्की काय कारण असावे ?

आधीच्या लेखांकांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे ते तंत्रज्ञान अतिशय सुरक्षित पद्धतीने दडवून ठेवले असावे आणि अजूनही आपल्याला ते सापडलेलेच नाही ?
की अशा एखाद्या सांकेतिक भाषेत, कूटपद्धतीने लिहिले असावे की ते कुणाच्या हातात पडले तरी सहजतेने उमजू नये  ? 
की अशा तंत्रज्ञानाचे  हस्तांतरण योग्य नाही असे वाटल्यामुळे, प्राचीन संस्कृतींनी  त्याची जपणूक जाणीवपूर्वक केली नसावी ?
की परकीय आक्रमणे, युद्ध, नैसर्गिक संकटे झेलताना ते नष्ट झाले असावे ?
की ज्यांच्या हातात ते पडले त्यांनी  केवळ त्यांच्या स्वार्थासाठी त्याचा उपयोग केला असावा ?
की विविध शासनयंत्रणेतील किंवा  व्यापारीवृत्तीच्या ठराविक वर्गाच्या हातात त्याची सूत्रे असावीत ?
आधीच्या लेखांकात विचार केल्याप्रमाणे आपण आज जी कालकुपी जतन करू पाहात आहोत ती भविष्यात योग्य हातात पडून, आपल्याला अपेक्षित असलेल्या प्रगतीचा पाया म्हणून, त्यावेळेच्या संस्कृतीच्या वर्धनासाठी, कल्याणासाठी तिचा उपयोग केला जाईल याची खात्री आज आपण कशी देणार ?  भविष्यात ज्या  व्यक्तीच्या,समूहाच्या हातात ती कालकुपी लागेल, ती व्यक्ती, तो समूह त्या संस्कृतीच्या भल्यासाठी त्या कालकुपीचा वापर करेल हेच कशावरून मानावे ?

असेही घडू शकते की, की अशी एखादी प्राचीन संस्कृती (म्हणजे आपण) होती हे उघडकीस येणे, त्या भविष्यकाळातील संस्कृतीतील, सत्तापदांवर बसलेल्या व्यक्तींना नकोसे वाटेल.

भविष्यात कालकुपी सापडूनही, तिचा योग्य उपयोग होऊ शकेल याची जराही शाश्वती नसताना मानवाने आज हा खटाटोप करावा का ?  मूळात आपल्याला सापडलेले सर्व ज्ञान, भविष्यातील संस्कृतीस सहज मिळावे आणि त्यांची वेगाने प्रगती व्हावी असे आपल्याला का वाटते ?  किंवा का वाटावे ? अशा प्रकारे भविष्यातील त्या संस्कृतीच्या प्रगतीचे Fast Tracking करून, त्यांना तंत्रज्ञानाचा Crash Course देऊन, एका अर्थाने आपण, त्या भविष्यातील संस्कृतीचा वेगाने नाश होण्याची बीजे तर रोवत नाही ना ?  कुठलीही संस्कृती टिकण्याचा, विकसित होण्याचा निसर्गाने नेमून दिलेला मार्ग टाळून,  आपण त्यांना जो शॉर्टकट देऊ पाहात आहोत तो खरंच योग्य ठरेल ना ?

थोडा नकारात्मक पद्धतीने विचार केला असता,  कालकुपीच्या निर्दिष्ट उद्देशांचे जसे लाभ आहेत, तसेच काही तोटेही उद्भवू शकतात हे सहज लक्षात येईल.

====

प्राचीन संस्कृतीच्या पाऊलखुणा आणि कालकुपी यांचा संबंध जोडण्याचे काही प्रयत्न झाले असल्यास, ते पूर्णत: उघड झालेले नाहीत.  'प्राचीन ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान सापडल्यामुळे आजच्या वैज्ञानिक प्रगतीला प्रचंड मोठा रेटा मिळाला; असे घडले असल्यास, त्याबद्दल फारसे काही लिहिले गेलेले नाही. याचा अर्थ तसे घडलेच नसावे असे नाही. तसे काही विशेष सापडले असल्यास, त्याला जगासमोर न येऊ देण्याइतपत शासन यंत्रणा नक्कीच प्रभावी होत्या आणि यापुढेही राहतील.  कुणीही कितीही काही म्हणो, ज्ञान सर्वांसाठी खुले असण्याचा दावा करो, 'इदम्‌ अथर्वशीर्षम्‌ अशिष्याय न देयम्‌' चे विविध प्रयोग, विविध क्षेत्रात, विविध स्तरावर, विविध हेतू मनात ठेवून,  विविध प्रकारांनी होत राहिले आहेत आणि भविष्यातही होत राहतील. 

प्राचीन संस्कृतीने पृथ्वीवर कालकुपीच्या माध्यमातून काही 'तंत्रखुणा' ठेवल्या असल्यास, त्या उत्खननात उघड होऊ शकतात, पण त्यासाठी त्या विवक्षित ठिकाणी उत्खनन शक्य व्हायला हवे. त्याबाबतीत जे सापडेल, जसे सापडेल ते स्वीकारायची मनाची तयारी हवी, भले मग आपल्या सध्याच्या समजूतींना, धारणांना, गृहीतकांना त्या खुणांनी मोठा धक्का दिला तरीही.  पृथ्वीवर न उकललेल्या गूढांची संख्या खूप मोठी आहेच, अगदी Nazca Lines पासून ते पिरमिड्स पर्यंत, कित्येक मंदिरांपासून, पूज्य (Sacred) मानल्या गेलेल्या स्थानांपासून ते प्रकाशात आलेल्या लेण्यांपर्यंत, उध्वस्त किल्ल्यांच्या,इमारतींच्या 'झपाटलेला' असे मानल्या गेलेल्या अवशेषांपासून ते अत्यंत दुर्गम ठिकाणी सापडलेल्या गुंफांपर्यंत आणि निश्चित उपयोग न समजलेल्या अनेक चमत्कारिक वस्तूंपासून ते आपण आपल्या सध्याच्या समजुतींनुसार लेबल लावून मोकळे झालेल्या अनेक artefact पर्यंत. कदाचित त्यातील काही पूर्वीच्या संस्कृतीच्या तंत्रखुणा असू शकतील, काही कालकुपींचे स्थान निदर्शक असू शकतील. आवश्यकता आहे ते ठराविक झापडे झुगारून देण्याची.

आणि प्राचीन कालकुपीच्या खुणा पृथ्वीवरच सापडतील, असे मानण्याचे कारण केवळ इतकेच आहे का, की  बहुमान्य असलेला मानवी संस्कृतीचा, पृथ्वीवरील जीवनाचा इतिहास आपल्याला तसे सांगतो आहे (किंबहुना आपण तशी ठाम धारणा करून घेतली आहे) की 'याआधी कोणतीही संस्कृती आपल्या सध्याच्या (तंत्रज्ञानातील) प्रगतीच्या जवळपासही पोहोचलेली नाही' हा विचार आपण मनोमन स्वीकारला आहे ?

फार दूरचा विचारही न करता, सूर्यमालेतील एखाद्या ग्रहावर (किंवा उपग्रहावर) काही काळासाठी एखादी संस्कृती विकसित होऊन कालांतराने नष्ट झाली नसेल, असे ठामपणे मानण्याचे कोणतेही कारण नाही. चंद्रावर,मंगळावर प्राचीन संस्कृतीच्या खाणाखुणा सापडल्या असतील, तर त्या सर्व पृथ्वीवासीयांपर्यंत पोहोचल्या असत्या हा भाबडा आशावाद आहे. अशा गोष्टी उघडकीस न येऊ देण्याची अशी अनेक कारणे असू शकतात, ज्यांची कदाचित आपण कल्पनाही करू शकत नाही.

माकडापासून निपजलेला मानव ही सर्वसाधारण उत्क्रांतीची प्रक्रिया नसून, या शारीरिक, बौद्धिक प्रगतीमागे, जैवतंत्रज्ञानात अत्यंत प्रगत असलेल्या पृथ्वीबाह्य संस्कृतीने केलेला हस्तक्षेप, त्यांनी जाणीवपूर्वक केलेले प्रयोग कारणीभूत आहेत असे मानणारा एक वर्ग आहे. आणि हा तर्क समूळ नाकारण्याचे कारण नाही. मानवी मेंदूतील गुंतागुंत, मर्कटवर्गातील प्राण्यापेक्षा त्याच्या शरीरात असलेले बदल, त्याला असलेले बुद्धीचे, विविध कलांचे वरदान, पण त्याचवेळी इतर प्राण्यांच्या तुलनेत अतिशय कमकुवत असलेले शरीर, Junk DNA सारखी न उलगडलेली तथ्ये, जगभरातील विविध मानवसमूहांमध्ये प्रचलित असलेल्या  अतिप्राचीन कथा, त्या कथांमधील काही बाबींमध्ये असलेले विलक्षण साधर्म्य या सर्व गोष्टी, एकाप्रकारे नैसर्गिक आणि सर्वसाधारण उत्क्रांतीपेक्षा काहीतरी वेगळ्या गोष्टीकडे, कदाचित विशेष प्रयोगातून घेतलेल्या कृत्रिम झेपेकडे अधिक अंगुलीनिर्देश करतात असे वाटते.

====

ज्ञान कुठल्या माध्यमातून हस्तांतरीत होईल याचे आपले सध्याचे आडाखेच योग्य असतील असे नाही. कुणी सांगावे पृथ्वीवर येणार्‍या विविध प्रारणांच्या माध्यमातून, विविध प्रकारचे ज्ञान पृथ्वीवर येतही असेल. एखाद्या कलावंताला अचानक येणारी स्फूर्ती आणि त्यातून होणारी विलक्षण कलानिर्मितो किंवा एखाद्या वैज्ञानिकाच्या डोक्यात अचानक येणारी कल्पना, त्या कल्पनेने त्याचे झपाटून जाणे आणि नवीन संशोधनाचा पाया घातला जाणे या आणि अशा घटनांमागे, कोण जाणे, दूरवर कुठेतरी, कुणीतरी निर्माण केलेली कालकुपीसारखी एखादी अतिप्रगत ज्ञानाचे जतन करणारी, प्रसारण करणारी, संवर्धन करणारी यंत्रणा देखील असू शकेल.

====

====
समाप्त
====

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा